Tuesday, June 23, 2009

शिवाजी महाराज की जय!!! (बालपोवाडा)

टप, टप, टप, टप चाले
घोडा शिवाजी राजांचा
शिवबांनी पार उडविला
धुव्वा रे मुघलांचा

बाळकडु स्वभिमानाचे
जिजा बाळ शिवाला पाजे
आईच्या गर्भात नसते
कुणीच कुठले राजे

स्वराज्य स्थापना करीन म्हणाला...
धरिली रायेश्वरावर रक्ताची धार
वय कोवळे ते हुंदडण्याचे
चौदा,पंधरा फार तर फार

मावळ्यांची फौज बनवली
हे वंशज प्रभू रामाचे
देश, देव अन धर्म रक्षिण्या
ठाकले उभे शिवाजी राजे

ते वाघांचे बछडे होते
अन एक सिंहाचा छावा
बलाढ्य शत्रूला नमविण्या
रचिला गनिमी कावा

रक्षण दिन दुबळ्यांचे
वर्तन माणुसकीला साजे
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
सांगती शिवाजी राजे

हर हर महादेव!!!

सत्यजित.

सांग का घडतो गुन्हा?

पाहणे माझे तुला,
सांग का घडतो गुन्हा?
खेळ ना नजरेचे असती,
निमिषी तू पुन्हा पुन्हा?

सांग मी मग काय पाहू?
काय असे नजरेस दावू?
मग अशी वळणार नाही
पाहण्या तुजला पुन्हा

मी पापण्यांना पांघरुनी
पाहणे जगास टाळले
अंतरंगी साठलेल्या
टाळु कसे कोवळ्या उन्हा?

पाहणे स्पर्षाने असते
पाहणे गंधाने असते
पाहणे पंचेद्रियांनी
छंद माझा का गुन्हा?

तेजोगोलाने न पहावे
तर चंद्र ही उरता सुना
पाहणे माझे तुला,
सांग का घडतो गुन्हा?

-सत्यजित.

पोळपाट आणि लाटणं (बालकविता)

लाटणं म्हणाल पोळपाटाला
कशास रे तुझी इतकी मिजास?
रोज रोज पोळ्या लाटुन
मीच का करावी तुला मसाज?

पोळपाट म्हणालं..
तुला लाटता यावं म्हणून
मी उपडा पडुन रहातो
पोळी नाही, तवा नाही,
मी तर जमिन पहात रहातो

लाटण्याला कळालं त्याच
चुकीचं होतं वागणं
कधीच नाही भांडत म्हणून
पोळपाट आणि लाटणं

-सत्यजित

Monday, June 22, 2009

मंत्रमुग्ध....

तुझ्या सवे घालवलेला प्रत्येक क्षण हा स्वप्ना सारखा असतो, पण म्हणुन स्वप्न थांबत नाहीत ना! तिथेही तुच असतेस सदैव.

अवेळी कधीही... अशी तुझी याद यावी
मी जगल्या स्वप्नांना... पुन्हा जाग यावी

तू नकळत माझा हात धरलास आणि लक्षात येताच... अलगद सोडवुन घेतलास हळुवार, अगदी पारिजात वेचावा ना... तसा. तू हात सोडवुन घेतलास पण तुझा स्पर्श ? तू तसाच गोंदवुन गेलीस...

माझी ती अवस्था न माझी मला कळावी
तू दिल्या पाकळ्यांची पुन्हा कळी व्हावी

माझ्या नजरेत गुंतलेली तुझी नजर... तू केसांत माळलेल्या गजर्‍या प्रमाणे हळुवार सोडवुन घेतलीस खरी....पण तुझ्या नजरेने कोरल्या कवितांच काय?

तुझे शांत डोळे मुक्या वासराचे
त्या नयनांची भाषा मला का कळावी ?

आपल्यातला हा अबोला कित्ती काही बोलतो नाही?... तुझ्याशीही आणि माझ्याशीही... माझ्या स्वगतावर तुझं असं दचकणं, मी माझ्या मनातल्या मनात केलेल्या धारिष्ट्यावरही तुझं जोवघेंण लाजणं... सारंच कसं अद्भुत... सारंच कसं अद्वैत...

आज कळे भावनांना कधी शद्ब नसतात
ह्या शब्दांनी भावनांची नुसती वकालत करावी

मग मनाच्या कोर्टात भावनांचा खटला चालू होतो. ह्रुदयाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केल जातं आणि विचारल जातं, की तू असा का वागतोस? तू असा का बहकतोस... ती येता? त्या वकिल शब्दांना आरोपी मन अबोल उत्तरं देत.. आणि हे शब्दच मग आरोपीच वकिलपत्र घेतात.. आणि अगदी तेंव्हाच एक कविता जन्म घेते...

तुझे ते इथे तिथे उगा काही बाही पहाणे
तू गुंतलेली अनंतात, मी वसंताच्या गावी

तुझ्या मनातली हुरहुर लपवण्यासाठी, तू कुठल्याश्या विचारात गुंतली आहेस असं भासवण्याची तुझी धडपड.... हातातल्या पुस्तकांवर तुझी नजर खिळलेली आणि हळुवार तुझ्या बटांना रागवणारे... तुझे प्रेमळ हात... तू डोळ्यांच्या कोनातुन माझ्या हलचाली निहाळत रहातेस, मी डोळ्यांतल्या मनातून तुला निहाळत रहातो. डोळ्यांना डोळे भिडले नाहीत तरी आपल्या नजरा सदैव जुळलेल्या...

तुझ्या पदरांवर होती, फुले फुलली गुलाबी
का वाटे माझ्या हातांची फुलपाखरे व्हावी?

तू डवरलेली जुई.... तू बहरलेला परिजात... तू अंग चोरुन बसलेली... दवओली श्रावण पहाट...
तू अशीच बसुन रहा मी असाच हरवत जाईन, तुझे हे नजरेचे खेळ.. असाच पिसा होउन पाहीन...

तू अबोला सोडत म्हणालीस... "निघुया?"

मी माझ्याशीच हसत म्हणालो, आत्ता?
मी तर कधीचाच निघालो कुठल्याश्या गावी...

अवेळी कधीही ... अशी तुझी याद यावी
मी जगल्या स्वप्नांना.. पुन्हा जाग यावी ....

-सत्यजित.

Tuesday, June 2, 2009

तुझी आठवण...

पाउस आतला
एकांती मातला
बरसती धारा
निरंतर

कोरडे भिजणे
वाळले रुजणे
फुलण्याची ओढ
अनामिक

बुद्वुदा जलाचा
अवनी तनुचा
उरतो कितीसा?
क्षणातीत

-सत्यजित.