Saturday, September 10, 2011

एक रसग्रहण - भय इथले संपत नाही

मला ही कविता म्हणजे एक विरह गीत जाणवते...त्यात वेडं प्रेम जाणवतं. इतर रसग्रहणात गॅप आहेत .. बर्‍याचदा एक कडवं/ओळ आणि त्या नंतरच्या कडव्यात/ओळीत कवि ट्रॅक चेंज करतो असं लिहीलं आहे. पण ही एक कविता आहे, गझल नाही. कविता स्फुरताना असं होत नाही. कविता पहील्या ओळी पासुन शेवटच्या ओळी पर्यंत एक विचार उलघडत जाते.. त्यात भावनेचा ओघ असतो, त्या प्रत्येक कडव्यात प्रत्येक ओळीत भावनेची गुंफण असते. एका ओळी मागे किती मोठी कहाणी असते हे कवीच सांगु शकतो. प्रचंड एकवटलेल्या भावनांनी एक ओळ स्फुरते, ती तुमच्या पर्यंत पोहचली तर ठीक, नाहीतर ती निर्बोध होते. अशा एकवटलेल्या भावना उलगडुन सांगणं कवीला जड जातं, जे म्हणायच आहे ते पुर्ण एकाच वेळी सांगता येईल हे सांगता येणे अवघड. आणि येवढं उलगडुन सांगायचं होत तर मग कविता कशाला लिहीली असती? स्मित
कवि जे लिहितो ते त्याच्या अनुभवातुन, ती त्याची अनुभुती ती वाचकाच्या अनुभवाशी जुळेल का? आणि नाही जुळली तर तिची गोडी कमी होईल. जसं "गोड आवडतं" म्हंटल की तुम्हाला साखर सुचेल, कुणाला बासुंदी, तर कुणाला जिलेबी, इथे सगळेच गोड आवडणारे एकमत होतात, तरी प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या, पण "जिलेबी हे गोड आवडत" म्हटल की बाकी तुटले. म्हणुन कविने कविता उलगडुन सांगु नये म्हणतात ते ह्याच साठी.. मग ती काहीं साठी निर्बोध ठरते तर काहीं साठी अर्थपुर्ण पण मग तित अनुभुती नाही. ती कविता वाचणार्‍याची होत नाही ती कविचीच रहाते. जी ओळ अनुभुती देते ती कविता आणि जे अर्थ स्पष्ट करते ते गद्य... अस मला वाटतं. पण ज्यांना अनुभुती मिळत नाही आणि जेंव्हा इतर शहाणे त्यांना हेटाळतात तेंव्हा लोक कविते पासुन दुर जातात. म्हणुनच बरेच लोक मला कवितेतल काही कळत नाही, कविता माझा प्रांत नाही, म्हणत कविते पासुन दुर जातात, अशा साठी कविता दुसर्‍यांनी उलगडुन सांगण गरजेच असत. किंवा कविने हिंट देणं गरजेचं आहे. पण जो तो आपल्या अनुभवाने समृद्ध असतो, माझा अनुभव तुम्हाला द्यावा कसा? त्यात अध्यात्म हे असं आहे की ते सगळी कडे फिट होतं, पण अध्यात्म सगळ्यांन झेपत नाही आणि रुचतही नाही. आकाशा कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म जमिनी कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म.. जो देवाशी एकरुप झाला त्याला चोहीकडे तोच दिसतो. पण तो आम्हाला कसा दिसावा? .. तसंच कवितेच.. पण तरी काही ठिकाणी उलगडुन सांगणं गरजेच.. आपला आनंद शेअर करावा.. स्मित तोच मीही करतो आहे..

ही ग्रेसची कविता एका प्रियकराच मनोगत आहे... हे एक विरह गीत आहे. ज्यांना काहीच अनुभुती मिळाली नाही त्यांच्या साठी मी माझी अनुभुती प्रकट करण्याचा प्रयत्न करतो, कदाचीत इतर कविता वाचताना त्यांना अनुभुती कशी घ्यावी हे कळेल... स्मित

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

किती काळ लोटून गेला, किती वर्ष उलटुन गेली तरी तुझी आठवण आली की श्वासांचा वेग वाढतो, काळिज धडधडु लागत. माझ्या मनातल कुणाला कळेल का याची भीती वाटू लागते. ते क्षण डोळ्या समोर तसेच उभे रहातात. अजुन किती वर्ष मी हे ओझं घेउन जगायचं? आणि तू आताही समोर आलीस तर... छे.. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते.

किती संध्याकाळी आपण एकत्र घालवल्या. दिवस रेटारेटीत निघुन जातो पण सांज उतरलीकी त्या सार्‍या आठवणी सध्याकाळी एकवटतात. प्रेमाच खरा अर्थ तुच तर मला शिकवलास, तु नेहमी म्हणायचीस, प्रेम हे बंदीशी सारख आहे, एकदा का ती बंदिश आपण आळवू लागलो की मग कुणाच भान रहात नाही. गात रहावं आणि भान विसरुन एकरुप व्हाव. जे आळवलं ते प्रेम कसलं, जे एकरुप होऊन आळवलं जातं तेच प्रेम.. तेच तुझे शब्द मनात रेंगाळत रहातात एखाद्या बंदीशी प्रमाणे. मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

हा चंद्र म्हणजे तुच ना.. हे चांदण तुझा झरा होउन वाहतं आहे आणि हे तुझ्या जाणिवांचं स्नान मला घालतं आहे. ही माझ्या आजुबाजूची धरती, हे जग ही सारी माया आहे. तू सत्य आहेस, तू शास्वत आहेस... माझं जगण ही जगणं नसुन एक विरक्ती आहे. तू माझं सर्वस्व आहेस ....हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया

तुला आठवतंय किती तास झाडा खाली हातात हात गुंतवुन बसायचो, किती स्वप्न रंगावायचो. कधी मी तुझ्या मांडीवर डोकं ठेउन निजायचो तर कधी तू माझ्या, कधी डोळे मिटले जायचे, कधी मिठी विरघळायची, कधी अधरांना अधर मिळायचे..मग जाणवायची ती फक्त स्पंदन... मग तिही एकरुप होत विरघळून जायची. जगाच भान आणि स्वत:ची जाणिवच नाहीशी व्हायची, जशी योग्याची योग निद्राच.. असा किती वेळ निघुन जायचा कुणास ठाऊक पण भानावर येताच.. हाताच्या मुठी पुन्हा घट्ट व्हायच्या... विलगण्या साठी. उद्या पुन्हा इथेच भेटायचं वचन देत आपण पुन्हा मिठीत विरघळुन जायचो, नुसतं शरिराने वेगळं व्हायला.. झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

किती भोळे होतो आपण, सारी स्वप्नं खरी होतील असं वाटायच ना आपल्याला. हे जग आहे, त्याच्या प्रथा आहेत, त्या प्रथांची कुंपणं आहेत ह्याची जाणिवच नव्हती... ते क्षण नाजुक होते खरे पण ते नाजुक का ते आत्ता कळत आहे, लोकं नाजुक वय का म्हणायचे तेही आत्ता कळतय, त्या नाजुक वयातिल घाव खोल होतात हेच खरं.. . मन अस वार्‍या सारखं सैरभैर किंवा वार्‍या पेक्षाही चंचल की वार्‍यचीही खोडी काढुन पळुन जाता येईल इतकं चंचल, पण तितकच भोळं.. त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती

तारूण्यांचा जोश असा की क्षितीजं ही पदाक्रांत कराता येतिल असा विश्वास, आणि त्यातच हे वेडं वय प्रेमाची जाणिव घेउन येत. भरतीच पाणी जसं किनारे व्यापत खोलवर शिरतं तसच हे प्रेम तारुण्याच्या दारावर भरती होऊन येत आणि अयुष्य व्यापुन जातं.. क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

"माझं तुझ्यावर प्रेम आहे..." येवढ हे हळवं वाक्य सारं अयुष्य व्यापुन गेलं. "जे कधीच संपणार नाही, जे कधीच सरणार नाही अस आपलं प्रेम..सार्‍या जगाशी भांडुन, कुणाची पर्वा न करता मी तुझा/तुझी होईन" हे वचन त्या चार शब्दात होत. आता सारं सारं तू होतिस, श्वासातिल वारं तू होतिस....तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला

पण तेंव्हा समाजची भीती होती, रुढी आड येणार ह्याची कुठे ना कुठे जाणिव होतिच. परिस्थिती मुळे प्रभुरामा पासुन विलगलेल्या सितेला प्रभूरामांचा शेला हा विश्वास देत होता की , "राम येणार, सार्‍या विपदा पार करुन येणार, समुद्र लांधुन येणार, सार्‍या अडचणींवर मात करत येणार.. फक्त माझ्या साठी, आमच्या प्रेमासाठी.. राम येणार... याच विश्वासाने प्रभुरामाचा शेला तिने पांघरुन घेतला असेल, त्यात रामाच्या प्रेमाची उब तिला मिळाली असेल.. तसेच तुझे शब्द ... सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

जसं भाविकांस देवाच दर्शन होण्या पुर्वी देऊळ दिसत असतं, तेच त्याच ध्येय असतं. त्याला विश्वास असतो की देउळ गाठलं की देव हा भेटणारच. तस प्रत्येक प्रेम करणार्‍याच लग्न हे ध्येय असतं एक मंदिर असतं जेथे प्रेमाची पुर्ती होणार असते. ह्या मंदिराची वाट किती खडतर असली तरी एकमेकांच्या साथीने मंदिर गाठुच येवढा दृढ निश्चय होता पण आपण मंदिर गाठण्या पुर्वीच खांब फोडुन आलेल्या दानवाला तू देव समजुन बसलिस तो नृसिंह नाही गं, तो तुझा देव नाही तु जेथे जातेस ते तुझे देऊळ नाही.... देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब

तुझ्या ओंझळीत जे आहे तो देव नाही हे तुला ही माहीत आहे, तुझे कावरेबावरे डोळे, आक्रोश करते अश्रू मला सांगत आहेत की तू माझी आहेस आणि मी तुझा... हा आक्रोश, हा आवेग, हे तुफान परिस्थिती पुढे इतक हतबल झालं आहे की मी तुझ्या पापणी वरला एक उरला सुरला थेंब होउन राहीलो आहे. एकदा का तो पापणीवरुन घरंगळला की त्याचं त्या डोळ्यांशी काही नातं नाही, तो उरतो फक्त पाणी होऊन.. थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

तू नाहीस... तू माझी नाहीस म्हणजे मीही नाही. मला अस्थित्वच नाही. झाडापासुन विलगलेलं फुल, पाण्या पासुन विलगलेलं कमळ आता फक्त देवावर वाहण्या पुरतं उरतं आणि मग निर्माल्य होतं, मी तर संध्येच्या पुजेतल कमळ त्याच निर्माल्य होण्यास आता कितीसा वेळ, तरीही मी शृंगार केला आहे कुणाच्या चरणी वाहण्यासाठी... संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने

काय करणार? जगावं तर लागलच, मी ही लग्नाच्या बेडित अडकलो, मीही कुणाचा झालो.. पण फक्त देहाने.. मी मनाने तुझा होतो आणि तुझाच आहे. हे भोग, हा आनंद फक्त देहा पुरता, ह्या जाणिवा ही फक्त देहा पुरत्याच... देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

लग्न झालं, मुल झाली, संसार सुखात आहे.. पण ही पंचेंद्रीये आजुन तुझ्या जाणिवा कुरवाळत आहेत, तुझा स्पर्श, तुझा गंध, तुझ रुप, तुझ्या अधरांची चव, तुझा आवाज अजुनही ह्या इंद्रीयांत तसाच जिवंत आहे. छान गाणं संपल तरी मन ते गुणगुणत रहातं तशी माझी इंद्रिय तुझी संवेदना गुणगुणत आहेत तरीही दु:ख आहेच... स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे

मी काही केल्या तुला विसरु शकत नाही... हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

माझी कर्तव्यं मी पार पाडली आहेत, आता वाटतंय की पुरे झालं हे आता जिवन. पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तुझं होऊन जावं. बस झालं ना.. आता लवकर लवकर हे अयुष्य संपू दे, पुढल्या जन्मी मी तुझा होईन, तु माझी होशील.. हे खरच होईल? का कुणास ठाउक, सारं धुसर आहे.. पण मला परातायची घाई लागली आहे मला विश्वास आहे तू मला भेटशील, हे अवेळी असेल कदाचीत.. पण मला परतु दे..
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई

हे जिवन हे एक जंगल आहे, भरपुर झाडं आहेत इथे, पण तुझ्याविना ती सारी निष्पर्ण आहेत. तू नाही तर वंसत नाही फक्त आहे ती पानझड... मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

पुढल्या जन्मी आपण पुन्हा एकमेंकांचे होऊ कधीच न विलगण्या साठी..

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

-- ग्रेस

अपनी अनुभुती अपने पास.. नंथींग व्रॉंग इन इट.. हॅप्पी कविता रिडींग..!!!

खर तर ग्रेस यांच्या कवितेत 'आई' न शोधता सापडते ह्याही कवितेच तसच...  तरी मला जे सुचल ते लिहीलं

-सत्यजित.

No comments:

Post a Comment