Saturday, November 26, 2011

तुझे नी माझे नाते अनामिक

मायबोलीच्या २०११ च्या दिवाळी अंकाचा विषय होता, "नाते संबंध" आणि मित्रांच्या आग्रहा खातर काही तरी सुचतय का बघु म्हणून आचानक एक नातं मनात आलं.
नातं जे सर्वात पवित्र तरीही खुप नाजुक, जे अनेकांना कळालच नाही, अगदी संत महंत देखिल हे नातं समजवून सांगताना भरकटलेले दिसले. असं हे नातं म्हणजे मैत्रीच, नुसतं मैत्रीच नाही तर स्त्री आणि पुरुष यांच्यातिल मैत्रीच. काही करंटे तर असंही म्हणतात की स्त्री आणि पुरुषात निखळ मैत्री असुच शकत नाही. असं म्हणणार्‍याच्या लक्षातही येत नाही की तेही ह्याच नात्याची नकळत पुजा करतात. ह्याच मैत्रीच्या प्रतिक म्हणजेच "राधा-कृष्णा". आधी राधा मग कृष्ण...जे नातं मंदिरात पुजलं जातं ते निखळ आणि पवित्र असल्या शिवाय का?

कृष्ण समजायला जेवढा कठीण तेवढंच हे नातं सुद्धा. श्री कृष्णाच्या म्हणे सोळा सहस्त्र बायका होत्या पण देवळात मात्र हा राधे सोबत. काही लोक राधेला श्री कृष्णाची पत्नी मानतात (हींदी विकी वर कुणा महाभागाने ते तसं लिहील आहे) तर काही म्हणतात की ती त्याची प्रेयसी होती. राधा ही एक विवाहीत स्त्री होती आणि कान्हा हा तिच्या पेक्षा वयाने खुप लहान होता. ती कृष्णाची ना प्रेयसी होती ना पत्नी होती, ती होती त्याची प्राण प्रिय मैत्रीण, जिवश्य कंठश्य सखी.

स्त्री-पुरुषातली ही निखळ मैत्री काही लोकांना कळत नाही, कारण त्यांनी अयुष्यात निखळ मैत्री कधी केलीच नाही, आणि मैत्री केली नाही म्हणजेच त्यांनी कधी निस्सीम प्रेमही केलं नाही.

राधा-कृष्णतल नातं म्हणजे निखळ मैत्रीच नातं, एकमेकां वरील प्रेमाचं नातं, एकमेकां वरील विश्वासाच नातं, एकमेकां वरच्या भक्तीच नातं, जितकं जवळच असुन तितकच अंतर ठेवणारं हे नातं... हे नातं जितकं सोप तितकच अवघड.
मी जेंव्हा जेंव्हा राधेकृष्णाच्या नात्याला प्रियकर आणि प्रेयसीचं रुप दिलेल पाहतो तेंव्हा तेंव्हा मला ओरडुन सांगावस वाटतं की ह्या नात्याच्या असा अपमान करु नका, कृष्ण-राधेला असं कलंकीत करु नका. "मैत्री" अलौकीक आहे, मैत्री अनमोल आहे, पवित्र आहे, त्याचा असा विपर्यास करू नका...

कविता पुर्ण झाली... नावही दिलं आणि माझंच माझ्या लक्षात आलं की मैत्रीच नातंच मुळी अनामिक असतं. हे पाण्या सारखं असतं, कुठल्याही नात्याच रुप घेणारं, कुठला ही आकार घेणारं, सगळ्यांना आपल्यात सामावुन घेणारं. जेंव्हा पाणी वाहत तेंव्हा ती असते "धारा" आणि ते जेंव्हा स्थिर होतं तेंव्हा ती होते "राधा", स्थिर आणि अचल, मैत्री सारखी. आपलीच कविता आपल्याच विचारांना नव रुप देउन जाते, राधा होऊन जाते...
 राधेच हे मनोगत, माझ्या मैत्रीच मनोगत आहे...

पुसते जग हे मला
नाते अपुले कोणते
न बोलले कुणी जरी
प्रश्न नयनी जाणते

ओढ लागते मना
ऐकू येता पावरी
श्वास हे दुणावती
नजर होई बावरी

तुझाच रंग घेऊनी
कुणी आभाळ रंगले
तू तमास स्पर्शता
नभ चांदण्यांनी शिंपले

आसमंती तूच रे
आत्मछंदी तूच रे
अंतरंगी तूच रे
मर्मबंधी तूच रे

गोपिकांचे प्रेम हे
श्याम रास खेळतो
आर्जवास राधेच्या
चक्रधारी भाळतो

ऐकू येते स्पंदनी
साद घालती वेणू
मी अशी गं नाचते
न पाहते कुणी जणू

नाते हे निष्पाप रे
का कुणी न जाणते?
ह्या जगाच्या नीतीला
नाव द्यावे कोणते?

नाव देता नात्याला
बंधनात बंधते
नाते अनामिक हे
नात्यांची वेस लांघते

- सत्यजित.

जरुर वाचा मायबोली दिवाळी अंक : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2011/index.html

Saturday, September 10, 2011

एक रसग्रहण - भय इथले संपत नाही

मला ही कविता म्हणजे एक विरह गीत जाणवते...त्यात वेडं प्रेम जाणवतं. इतर रसग्रहणात गॅप आहेत .. बर्‍याचदा एक कडवं/ओळ आणि त्या नंतरच्या कडव्यात/ओळीत कवि ट्रॅक चेंज करतो असं लिहीलं आहे. पण ही एक कविता आहे, गझल नाही. कविता स्फुरताना असं होत नाही. कविता पहील्या ओळी पासुन शेवटच्या ओळी पर्यंत एक विचार उलघडत जाते.. त्यात भावनेचा ओघ असतो, त्या प्रत्येक कडव्यात प्रत्येक ओळीत भावनेची गुंफण असते. एका ओळी मागे किती मोठी कहाणी असते हे कवीच सांगु शकतो. प्रचंड एकवटलेल्या भावनांनी एक ओळ स्फुरते, ती तुमच्या पर्यंत पोहचली तर ठीक, नाहीतर ती निर्बोध होते. अशा एकवटलेल्या भावना उलगडुन सांगणं कवीला जड जातं, जे म्हणायच आहे ते पुर्ण एकाच वेळी सांगता येईल हे सांगता येणे अवघड. आणि येवढं उलगडुन सांगायचं होत तर मग कविता कशाला लिहीली असती? स्मित
कवि जे लिहितो ते त्याच्या अनुभवातुन, ती त्याची अनुभुती ती वाचकाच्या अनुभवाशी जुळेल का? आणि नाही जुळली तर तिची गोडी कमी होईल. जसं "गोड आवडतं" म्हंटल की तुम्हाला साखर सुचेल, कुणाला बासुंदी, तर कुणाला जिलेबी, इथे सगळेच गोड आवडणारे एकमत होतात, तरी प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या, पण "जिलेबी हे गोड आवडत" म्हटल की बाकी तुटले. म्हणुन कविने कविता उलगडुन सांगु नये म्हणतात ते ह्याच साठी.. मग ती काहीं साठी निर्बोध ठरते तर काहीं साठी अर्थपुर्ण पण मग तित अनुभुती नाही. ती कविता वाचणार्‍याची होत नाही ती कविचीच रहाते. जी ओळ अनुभुती देते ती कविता आणि जे अर्थ स्पष्ट करते ते गद्य... अस मला वाटतं. पण ज्यांना अनुभुती मिळत नाही आणि जेंव्हा इतर शहाणे त्यांना हेटाळतात तेंव्हा लोक कविते पासुन दुर जातात. म्हणुनच बरेच लोक मला कवितेतल काही कळत नाही, कविता माझा प्रांत नाही, म्हणत कविते पासुन दुर जातात, अशा साठी कविता दुसर्‍यांनी उलगडुन सांगण गरजेच असत. किंवा कविने हिंट देणं गरजेचं आहे. पण जो तो आपल्या अनुभवाने समृद्ध असतो, माझा अनुभव तुम्हाला द्यावा कसा? त्यात अध्यात्म हे असं आहे की ते सगळी कडे फिट होतं, पण अध्यात्म सगळ्यांन झेपत नाही आणि रुचतही नाही. आकाशा कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म जमिनी कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म.. जो देवाशी एकरुप झाला त्याला चोहीकडे तोच दिसतो. पण तो आम्हाला कसा दिसावा? .. तसंच कवितेच.. पण तरी काही ठिकाणी उलगडुन सांगणं गरजेच.. आपला आनंद शेअर करावा.. स्मित तोच मीही करतो आहे..

ही ग्रेसची कविता एका प्रियकराच मनोगत आहे... हे एक विरह गीत आहे. ज्यांना काहीच अनुभुती मिळाली नाही त्यांच्या साठी मी माझी अनुभुती प्रकट करण्याचा प्रयत्न करतो, कदाचीत इतर कविता वाचताना त्यांना अनुभुती कशी घ्यावी हे कळेल... स्मित

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

किती काळ लोटून गेला, किती वर्ष उलटुन गेली तरी तुझी आठवण आली की श्वासांचा वेग वाढतो, काळिज धडधडु लागत. माझ्या मनातल कुणाला कळेल का याची भीती वाटू लागते. ते क्षण डोळ्या समोर तसेच उभे रहातात. अजुन किती वर्ष मी हे ओझं घेउन जगायचं? आणि तू आताही समोर आलीस तर... छे.. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते.

किती संध्याकाळी आपण एकत्र घालवल्या. दिवस रेटारेटीत निघुन जातो पण सांज उतरलीकी त्या सार्‍या आठवणी सध्याकाळी एकवटतात. प्रेमाच खरा अर्थ तुच तर मला शिकवलास, तु नेहमी म्हणायचीस, प्रेम हे बंदीशी सारख आहे, एकदा का ती बंदिश आपण आळवू लागलो की मग कुणाच भान रहात नाही. गात रहावं आणि भान विसरुन एकरुप व्हाव. जे आळवलं ते प्रेम कसलं, जे एकरुप होऊन आळवलं जातं तेच प्रेम.. तेच तुझे शब्द मनात रेंगाळत रहातात एखाद्या बंदीशी प्रमाणे. मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

हा चंद्र म्हणजे तुच ना.. हे चांदण तुझा झरा होउन वाहतं आहे आणि हे तुझ्या जाणिवांचं स्नान मला घालतं आहे. ही माझ्या आजुबाजूची धरती, हे जग ही सारी माया आहे. तू सत्य आहेस, तू शास्वत आहेस... माझं जगण ही जगणं नसुन एक विरक्ती आहे. तू माझं सर्वस्व आहेस ....हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया

तुला आठवतंय किती तास झाडा खाली हातात हात गुंतवुन बसायचो, किती स्वप्न रंगावायचो. कधी मी तुझ्या मांडीवर डोकं ठेउन निजायचो तर कधी तू माझ्या, कधी डोळे मिटले जायचे, कधी मिठी विरघळायची, कधी अधरांना अधर मिळायचे..मग जाणवायची ती फक्त स्पंदन... मग तिही एकरुप होत विरघळून जायची. जगाच भान आणि स्वत:ची जाणिवच नाहीशी व्हायची, जशी योग्याची योग निद्राच.. असा किती वेळ निघुन जायचा कुणास ठाऊक पण भानावर येताच.. हाताच्या मुठी पुन्हा घट्ट व्हायच्या... विलगण्या साठी. उद्या पुन्हा इथेच भेटायचं वचन देत आपण पुन्हा मिठीत विरघळुन जायचो, नुसतं शरिराने वेगळं व्हायला.. झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

किती भोळे होतो आपण, सारी स्वप्नं खरी होतील असं वाटायच ना आपल्याला. हे जग आहे, त्याच्या प्रथा आहेत, त्या प्रथांची कुंपणं आहेत ह्याची जाणिवच नव्हती... ते क्षण नाजुक होते खरे पण ते नाजुक का ते आत्ता कळत आहे, लोकं नाजुक वय का म्हणायचे तेही आत्ता कळतय, त्या नाजुक वयातिल घाव खोल होतात हेच खरं.. . मन अस वार्‍या सारखं सैरभैर किंवा वार्‍या पेक्षाही चंचल की वार्‍यचीही खोडी काढुन पळुन जाता येईल इतकं चंचल, पण तितकच भोळं.. त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती

तारूण्यांचा जोश असा की क्षितीजं ही पदाक्रांत कराता येतिल असा विश्वास, आणि त्यातच हे वेडं वय प्रेमाची जाणिव घेउन येत. भरतीच पाणी जसं किनारे व्यापत खोलवर शिरतं तसच हे प्रेम तारुण्याच्या दारावर भरती होऊन येत आणि अयुष्य व्यापुन जातं.. क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

"माझं तुझ्यावर प्रेम आहे..." येवढ हे हळवं वाक्य सारं अयुष्य व्यापुन गेलं. "जे कधीच संपणार नाही, जे कधीच सरणार नाही अस आपलं प्रेम..सार्‍या जगाशी भांडुन, कुणाची पर्वा न करता मी तुझा/तुझी होईन" हे वचन त्या चार शब्दात होत. आता सारं सारं तू होतिस, श्वासातिल वारं तू होतिस....तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला

पण तेंव्हा समाजची भीती होती, रुढी आड येणार ह्याची कुठे ना कुठे जाणिव होतिच. परिस्थिती मुळे प्रभुरामा पासुन विलगलेल्या सितेला प्रभूरामांचा शेला हा विश्वास देत होता की , "राम येणार, सार्‍या विपदा पार करुन येणार, समुद्र लांधुन येणार, सार्‍या अडचणींवर मात करत येणार.. फक्त माझ्या साठी, आमच्या प्रेमासाठी.. राम येणार... याच विश्वासाने प्रभुरामाचा शेला तिने पांघरुन घेतला असेल, त्यात रामाच्या प्रेमाची उब तिला मिळाली असेल.. तसेच तुझे शब्द ... सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

जसं भाविकांस देवाच दर्शन होण्या पुर्वी देऊळ दिसत असतं, तेच त्याच ध्येय असतं. त्याला विश्वास असतो की देउळ गाठलं की देव हा भेटणारच. तस प्रत्येक प्रेम करणार्‍याच लग्न हे ध्येय असतं एक मंदिर असतं जेथे प्रेमाची पुर्ती होणार असते. ह्या मंदिराची वाट किती खडतर असली तरी एकमेकांच्या साथीने मंदिर गाठुच येवढा दृढ निश्चय होता पण आपण मंदिर गाठण्या पुर्वीच खांब फोडुन आलेल्या दानवाला तू देव समजुन बसलिस तो नृसिंह नाही गं, तो तुझा देव नाही तु जेथे जातेस ते तुझे देऊळ नाही.... देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब

तुझ्या ओंझळीत जे आहे तो देव नाही हे तुला ही माहीत आहे, तुझे कावरेबावरे डोळे, आक्रोश करते अश्रू मला सांगत आहेत की तू माझी आहेस आणि मी तुझा... हा आक्रोश, हा आवेग, हे तुफान परिस्थिती पुढे इतक हतबल झालं आहे की मी तुझ्या पापणी वरला एक उरला सुरला थेंब होउन राहीलो आहे. एकदा का तो पापणीवरुन घरंगळला की त्याचं त्या डोळ्यांशी काही नातं नाही, तो उरतो फक्त पाणी होऊन.. थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

तू नाहीस... तू माझी नाहीस म्हणजे मीही नाही. मला अस्थित्वच नाही. झाडापासुन विलगलेलं फुल, पाण्या पासुन विलगलेलं कमळ आता फक्त देवावर वाहण्या पुरतं उरतं आणि मग निर्माल्य होतं, मी तर संध्येच्या पुजेतल कमळ त्याच निर्माल्य होण्यास आता कितीसा वेळ, तरीही मी शृंगार केला आहे कुणाच्या चरणी वाहण्यासाठी... संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने

काय करणार? जगावं तर लागलच, मी ही लग्नाच्या बेडित अडकलो, मीही कुणाचा झालो.. पण फक्त देहाने.. मी मनाने तुझा होतो आणि तुझाच आहे. हे भोग, हा आनंद फक्त देहा पुरता, ह्या जाणिवा ही फक्त देहा पुरत्याच... देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

लग्न झालं, मुल झाली, संसार सुखात आहे.. पण ही पंचेंद्रीये आजुन तुझ्या जाणिवा कुरवाळत आहेत, तुझा स्पर्श, तुझा गंध, तुझ रुप, तुझ्या अधरांची चव, तुझा आवाज अजुनही ह्या इंद्रीयांत तसाच जिवंत आहे. छान गाणं संपल तरी मन ते गुणगुणत रहातं तशी माझी इंद्रिय तुझी संवेदना गुणगुणत आहेत तरीही दु:ख आहेच... स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे

मी काही केल्या तुला विसरु शकत नाही... हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

माझी कर्तव्यं मी पार पाडली आहेत, आता वाटतंय की पुरे झालं हे आता जिवन. पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तुझं होऊन जावं. बस झालं ना.. आता लवकर लवकर हे अयुष्य संपू दे, पुढल्या जन्मी मी तुझा होईन, तु माझी होशील.. हे खरच होईल? का कुणास ठाउक, सारं धुसर आहे.. पण मला परातायची घाई लागली आहे मला विश्वास आहे तू मला भेटशील, हे अवेळी असेल कदाचीत.. पण मला परतु दे..
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई

हे जिवन हे एक जंगल आहे, भरपुर झाडं आहेत इथे, पण तुझ्याविना ती सारी निष्पर्ण आहेत. तू नाही तर वंसत नाही फक्त आहे ती पानझड... मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

पुढल्या जन्मी आपण पुन्हा एकमेंकांचे होऊ कधीच न विलगण्या साठी..

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

-- ग्रेस

अपनी अनुभुती अपने पास.. नंथींग व्रॉंग इन इट.. हॅप्पी कविता रिडींग..!!!

खर तर ग्रेस यांच्या कवितेत 'आई' न शोधता सापडते ह्याही कवितेच तसच...  तरी मला जे सुचल ते लिहीलं

-सत्यजित.

Sunday, July 31, 2011

हॅप्पी गटारी....थर्रा देशी, आला बाबा... (विडंबन)

सलिल आणि संदिपची माफी मागुन.. दुर देशी गेला बाबा....

यू ट्युब मधील ह्या गाण्याच्या विडीओ मध्ये सलिल म्हणतो...
"अशीच एक गोष्ट आहे जी आपल्याला कळत नाही पण लहान मुलांना जाणवते."
अशीच बापाची व्यथा कळलेल्या मुलाचे मनोदय सांगणारं, मन पिळवटुन टकणार हे विडंबन आहे. हॅप्पी गटारी....!!!

थर्रा देशी, आला बाबा, घेई फैलावर आई
अख्खी बाटली पोटात, तरी घरी आला बाई

असा चकणा बेचव कसाबसा पचवला
बार भिंतीत बसुन अख्खा खंबा रिचवला
"आता पुरे रे बेवड्या" कुणी म्हणतच नाही

कशासाठी कोण जाणे देती ड्राय डेला सुट्टी ?
कोणी ढोसायाला नाही…कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
ग्लास ठेवले मांडून … परि बाटलीच नाही

दिसे खिडकीमधुन बार सारे, दिशा दाही
बार उघडले तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी – मुठीमध्ये नोट नाही

अख्खी बाटली पोटात, तरी घरी आला बाई....

आज घरोघरी गटारी झाली.. घरोघरी श्रावणाचे आगमन जोरात झाले.. आता एक महिना मन मारुन श्रावण पाळणार्‍यांना समर्पित.

-सत्यजित.

Friday, July 8, 2011

ग्लोबल वॉर्मींग ड्रावं-ड्रांव... ड्रूक... ( बालकविता )

एक बेडु़क होता करत ड्रांव ड्रावं
"बेडुक दादा असं काय करताय रावं?"

'पाऊस नाही आला, आलाय मला राग
जरा गाऊन बघतो, मी मेघ-मल्हार राग'

"अरे बेडुक दादा, असा चिडुन नको गाऊस
नाहीतर येणार नाही, कधीच पाऊस"

'ढग नाही, वारा नाही, पाऊस पडत नाही
तुमच्या घरी नळ आहे तुमच अडत नाही'

'अरे..
बघ जरा टीव्ही लाऊन, काही बातमी देतात काय?
मासा काल म्हणत होता ग्लोबल वॉर्मींग हाय'

'ग्लोबल वॉर्मींग, ग्लोबल वॉर्मींग....ग्लोबल वॉर्मींग
आता हे आणि काय?'
"अरे दादा, आभाळातला एसी बंद पडला हाय"

"म्हणुन बाबांनी नवा बसवुन घेतलाय एसी"
'पुन्हा तुम्ही तुमचं बघा, आमची ऐशी-तैशी'

"मग काय करू? सांगतो, एसी लाऊ नका"
' नको, आम्ही प्राणि कुणा त्रास देतो का?"

'येवढच एक निरोप जाउन बाबांना तू सांग
सगळ्या प्राण्यांची, आमची येवढीच आहे मांग

तळ्या मधे, नदी मधे टाकू नका कचरा
सगळ्या सांड पाण्याचा नीट करा निचरा

प्लास्टीकच्या पिशव्या तुम्ही वापरु नका
उघड्यावरती कचरा कधीच टाकू नका'

"आत्ताच जाउन सांगतो तुझा निरोप
पण बेडुक दादा तू रागावू नकोस"

पुन्हा बेडु़क करू लागला ड्रांव.. ड्रावं...
"आता काय झालं? असं काय करताय रावं?"

"अरे,खुप आनंद झाला म्हणुन गातो आहे गाणं
वेड्या सारखे वागतात मोठे, एक बाळ शहाणं'
आहे एक बाळ शहाणं...
निरोप सांगणार ना रे बाळांन्नो..? :) '

ड्रांव, ड्रावं, ड्रांव ड्रावं-ड्रांव ड्रावं-ड्रांव... ड्रूक..
ड्रांव, ड्रावं, ड्रांव ड्रावं-ड्रांव ड्रावं-ड्रांव... ड्रूक...

-सत्यजित.

Tuesday, July 5, 2011

आधारवड

कितीदा तपासुन पाहीली होती फांदी
या वेळी अख्ख झाडच उन्मळून पडलं आहे
गेल्या खेपेस वादळ तरी होत...
आता मात्र.. मी निरखून घेणार आहे
झाड, त्याची मुळं, त्याची फांदी
आजुबाजूची जमिन,
गेल्या दहा वर्षाचे हवामानाचे आराखडे
पण मग सहाशे फुट खोल पाण्याचा साठा?
शेवटी काय अजुन एक कारण राहुन जाईलच
There is nothing called stability,
it is just ability to survive.
एका पायावर तोल सांभाळायचा म्हंटलं
की दोन पायांवरही अस्थिर वाटायला लागतं

-सत्यजित.

Thursday, June 30, 2011

काळ देहासी आला खाऊ

कधी तरी बोलावं आपणच आपल्याशी
कधी तरी एक संवाद साधावा आतल्याशी

तेच व्याप, तेच शाप
तेच पुण्य, तेच पाप
माझ्याच विचारांना मीच होतो पारखा
खरच जगतो का मी आतल्या सारखा?
किती वेळा रेटत जातो मी उगाच आपला मुद्दा
माझ्याच विचारांचा माझ्याच पाठीत गुद्दा

निजताना असते स्वप्नांची भीती
जागताना स्वप्ने तुटण्याची भीती
भीती...? नुसती भीती नाही..
दबक्या पावलांच्या वाटांनी गाठता येणारे
महाल रचलेत मी...
या वाटेत लागतात काही उन्मळूंन पडलेले आधारवड
तर काही घट्ट पारंब्या रोवून उभे असलेले स्थितप्रज्ञ
त्यावरिल चिमण्यांची कधी किलबिल, तर कधी आक्रोश

आधारवड, किलबिल, आक्रोश, चिमण्या... सारे मी ठरवलेले : स्मित :
माझं घेणं ना देणं त्या चिमण्यांशी ना आधारवडांशी
मला हवाय म्हणून, मी केलेला आक्रोश
मला हवाय म्हणून, मी केलेली किलबिल

आता त्याच्याशी संवाद होत नाही, वाद होत जातात
तरिही अजुन एक दिवस काळ आणून ठेवतो हातात
म्हणतो... बघ जमलं तर अजून एक दिवस प्रयत्न कर
"अरे.. काळ आहे मी
प्राण घेतो, तुझ्या सारख्या मृतात्म्यांच काय करू मी?
मला साद हवी आहे तुझी, प्राण नको"
मी हसतो... "आज टळला ना, उद्या पाहू" म्हणतो...

-सत्यजित

Thursday, June 9, 2011

पाऊसमय कोकणसय

माझ्या कोकणची माती
जशी अत्तराची खाण
नभरस कोसळता
देते सुगंधाचं वाण

आला मेघराज नभी
धरा कुंकवाची डबी
हिरवं सोनं लेउनिया
दिसे नववधू छबी

गोड लागतो खायला
ऐन उन्हाचा व्यायला
बाळंतपण लेकीचं
लागे काळजी आयेला

आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
उफाळल्या दर्यासंगे
डोलू लागतील माड

हरवता पायवाटा
गावे तेरडा टाकळा
नाही कुणाचंच भय
रवळनाथाचा हा मळा

घेता पागोळ्या ओच्यात
त्यात मिळे पारिजात
मळा मेंदीभरले हात
त्यात तरारेल भात

नभं थेंबानी चुंबता
लाज लाजली लाजाळू
तिला छेडते आबोली
किती किती गं मायाळू

बघ सरेल श्रावण
मग येईल भादवा
माहेरवाशी गौवरया
बाळा गातील जोजवा

माझ्या मायेच्या डोळ्यात
कसा वाहू लागे झरा
असा पाउस पाउस
येतो कोकणच्या घरा...

-सत्यजित.

Saturday, June 4, 2011

संधीसाधू पाऊस

एक ओली छत्री,
बस मध्ये चढली
तशीच ओली निथळती
सीट वरती दुमडली
खिडकी बाहेर, दारावर
काचांवरल्या धारांवर
धावत्या तरुंच्या पारांवर
खाबांवरल्या तारांवर...
इथे तिथे पसरलेल्या नजरा
आल्या होत्या भानावर

सारे पारधी साव़ज झाले...
निवांत बसले सावध झाले
इतके सावध की...
कुणी सांगुन खिसा कापावा इतके बेसा­वध

पुढच्या माना अचानक
करु लागतात व्यायाम
किमान दोनशे अंशात फिरली नाही
तर मानेच काय काम?

मागचे पुढे, पुढचे मागे
एक ओझरती झलक... आणि उगाच त्रागे..

हा पाऊस काही पहीला नव्हता
तरी इतका मोहक पाहीला नव्हता
बावर्‍या सावळ्या नभांवर
ओघळताना पाहिला नव्हता

ओढणी इतकी सावधान
बिलगून बसली होती छान
हात तिला दाटवती ,
"अगं किती बिलगशील, आहे का भान?"

कुठून येतोय हा मृदगंध?
जो, तो पहात होता
तिच्या ओढणीला बिलगुन
वारा नकळत वहात होता

हळुवार पाऊसही
तिला पाहताच धावला असेल
पावसाला पाहुन असा
वाराही कावला असेल

त्यात छत्री होती तकलादू
पाऊस पाहतो संधी साधू
ढगांत ध्यानस्त बसलेला
विरघळुन जातो ढोंगीसाधू

मी तर एक साधा माणुस
पण नभांनी तरी सावरायच?
मा़झ्याकडे जर असता पाऊस
तर कठीणच होतं आवरायच...

आता मेलो तरी चालेल
पण एकदा मला वर जायचय
तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

- सत्यजित

Wednesday, June 1, 2011

पुन्हा कालचा पाउस

आत्ता पावसाळा येईल
मन पुन्हा ओलं होईल
छत्री उघडू उघडू म्हणता
चिंब चिंब होऊन जाईल

कुणी तरी पावसा कडे
डोळे लाउन पहातंय
मळभ दाटल्या डोळ्यांचं
मन मात्र गातय

पाउस कधी मुसळधार
पाउस कधी रिपरीप
पाउस कधी संततघार
पाउस कधी चिडीचीप

आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस

खोल आठवणीचं बीज
अंकुरून येतं मनावर
वसंतात छाटलं असलं
तरी मन नसतं भानावर !

-सत्यजित

Tuesday, April 19, 2011

रांगोळीशी नातं..

किती सवय असतेना आपल्या
नाती जोडत जाण्याची
एका ओळीत चार ठिपके दिसले
की त्यात रेघ पाहण्याची

ठिपक्यांची रांगोळी, ठिपक्यांची चित्र
न जोडलेले ठिपके, किती विचित्र?
कधी वाटतं, पुसाव्यात सगळ्या रेषा
पुन्हा करावेत ठिपके स्वतंत्र

पण स्वतंत्र ठिपक्यांमध्ये रंग भरता
येत नाहीत, असं मला उगा वाटतं
हातात घट्ट धरलेले हात आणि
ठिपके जोडण्याचा पुन्हा हट्ट

ओळीतले बगळे, ढगांचे आकार
असंबंधातुन होतं काहीसं साकार
एक अनामिक ओढ, एक वेडी उर्मी
जोडत जावे ठिपके पुन्हा एक आकार

खरचं का, ठिपक्यांच्या रांगोळी
सोपी असते म्हणुन शिकवलीस?
की रंगाची आणि नात्यांची समज
अलगद होती रुजवलीस?...
अलगद होती रुजवलीस...

-सत्यजित.

Thursday, April 7, 2011

तुकड्यांनाही महत्व आहे

सोडुन आले स्वप्ने सारी डोळ्यांच्या काठांवर
अजुनही फुलतिल वसंत काही सोडलेल्या वाटांवर

भळभळत्या जखमांतून अश्रू अखंड वाहत राहतात
ते भळभळणारे अश्रू पिउन जखमा भरत जातात

आणि, माझ्या वाटेवरती धरू लागतो मोहर
वसंत दारी थाप देतो, मागतो माझा बहर

डोळ्यांच्या तळी हळूच दाटू लागतात स्वप्ने
पुन्हा एक काचेचं घर, पुन्हा नशीबी जपणे

या वेळी मी निवडुन घेते फक्त रंगीत काचा
नव्या वाटेवर करीन म्हणते कॅलीडोस्कोप त्याचा

तुकड्यांनाही महत्व आहे फक्त रंगीत असायला हवेत
मोठे मोठे सोडुन देउन छोटे सोबत घ्यायला हवेत

-सत्यजित

Thursday, March 17, 2011

असतेस घरी तू जेंव्हा.. (विडंबन)

नसतेस घरी तू जेंव्हा ह्या अप्रतिम कलाकृतीची सदह्रुद्य क्षमा मागुन, संदीप आणि सलिल मला मोठ्या मनाने क्षमा करतिल येवढीच इच्छा.

असतेस घरी तू जेंव्हा
जिव विटका विटका होतो
रागातून उठती त्रागे
बनियान फाटका होतो

छत फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो,
मी जरा निद्राधीन होता
हा सांड घोरका होतो.

येतात मुली दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीतून पाहुन त्यांना
मी असाच अगतिक होतो.

तव मिठीत म़ळमळणाऱ्या
मज स्मरती घामट वेळा,
भासाविन भूत दिसावे
मी तसाच स्तंभित होतो

तू सांग अरे मग काय
मी तोडू या घरदारा?
विटलेला जीव उदास
कल्ईसम भुर्र्भुर्र उडतो.

ना अजुन झालो गोटा
ना भणंग अजुनी झालो,
तुजपाहुन तगमग होते
तुजपाहून जन्मच अडतो.


वरिल विडंबनातिल सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत, तरीही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास निव्वळ मुर्खपणा समजावा. :)

Monday, March 14, 2011

थोडासा बादल, थोडासा पानी, और इक कहानी...

तेच ठिकाण, तीच टेकडी... तो कधीचा तिथे पोहचला आहे, आणि तिला, उशीर झाला आहे. ती निघाली आहे... सारखा फोन, तिचं नक्की येण्याच वचन...आणि दाटून आलेला पाउस.

रंग उधळती संध्याकाळ, सोसाट्याचा वारा, पावसाची चाहुल, मिलनाची ओढ आणि चलबिचल मन... अजुन काय लागतं कविता सुचायला? ही ओळचं एक कविता आहे.
पण आता पाउस आला तर ती कशी येणार? ती येईल नक्की येईल, पण भिजेल ना ती.. इतकी कोमल, इतकी सुंदर... आणि तिला इतका त्रास? आणि इतका त्रास, कुणासाठी? फक्त माझ्यासाठी ...
प्लिज.... प्लिज... प्लिज... हे घनांनो आता बरसू नका, थोडा वेळ थांबा... तिला एकदा इथे येउ देत मग काय थयथयाट घालायचा आहे तो घाला.. पण थोडा वेळ थांबा... तू जगाचा पाउस असशील पण माझा पाउस तर तीचं आहे... माझी सखी...

तो मनातल्या मनात घनांना विनवणी करतो आहे, आळवणी करतो आहे आणि तेवढ्यात पावसाचा एकच थेंब त्याच्या गालावर पडतो... असहाय्य...अस्वस्थ मनाला तेवढसं पुरे आहे.
विनवणीचे सुर रागत बदलतात... तो त्या घनांनाच दोष देतो की माझी इतकी सुंदर प्रेयसी बघुन तुमचाही तोल ढळला आहे.. म्हणूनच इतके अधीर होताय... शोभत नाही हे तुम्हाला...

इतका राग, इतकी अस्वस्थता पण पाउस म्हणजे "रोमांस".. ज्याला पावसात रोमँटीक वाटतं नाही त्याला प्रेम तरी कसं होईल? हा तर प्रेमवेडा आहे.. मगास पासुन गुणगुणत असलेल्या गाण्याचे सुर तसेच तरंगतायत त्याच्या मनात... तुमने इश्क का नाम सुना है... हमने इश्क किया है... इमली से खट्टा इश्क..इश्क.. ( वाह रे रेहमान...!!)
सुरांचं आणि काळजातल्या भावनांच मिलन झालं की कविता आपसूकच उमलते... आणि अशीच गुणगुणलेली ही कविता...

कॄष्ण घनांनो बरसू नका रे
सखीस माझ्या भिजवू नका रे

माझा येणार साजण... रिमझीम
पायातील पैंजण... रिमझीम
हातातील कंकण... रिमझीम
ओठातील गुणगुण... रिमझीम... ... ...

सर सर येते तुझीच रे सर
सलतील तिज हे थेंबांचे शर
स्व:तास इतके रिझवू नका रे ... सखीस माझ्या...

झोंबेल तिज हा शितल वारा
कोमल कांती निळा शहारा
स्व:तास इतके झुकवू नका रे... सखीस माझ्या

माझ्याहूनही तुलाच हुरहूर
आवर तुझीही आतूर भुरभूर
दिलाचे चोचले पुरवू नका रे... सखीस माझ्या

तिचा पदर ना थेंबाचे घर
तिचे अधर ना फुलांचे दल
उगाच स्वप्ने उजवू नका रे... सखीस माझ्या

रंग उधळते तुझे नभांगण
भुलेल तुज हा माझा साजण
भास मनात हा रुजवू नका रे ... सखीस माझ्या

-सत्यजित.

Sunday, March 13, 2011

पाकीजा

उमराव शोधाताय की शोधताय नरगिस
इथे पाकीजा शब्दच मुळी खोटा आहे,
वेड्यांन्नो हा फक्त कोठा आहे

उदरात काय पेक्षा पदरात काय
इथे फायद्याच्या सौद्यातही तोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

चेहरा नाही ना मोहरा नाही
सारा बंद निनावि लखोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

कायद्याचा देव, वायद्याचा देव
पुजलेला देव देखिल थोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

न दिव्यात वात, ना मदतीचा हात
इथे पैसा फक्त मोठा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

अंगाला रंग रंगाला अंग
अंगाचा संग वांझोटा आहे
काय शोधतोस खुळ्या हा कोठा आहे

-सत्यजित.

’येते हं’

अजुनही ह्रुदयात गोंदली आहे तुझी नी माझी पहीली भेट
बावरलेली नजर तुझी ह्रुदयात शिरली होती थेट
मनात दाटल्या भावनांच ओठी येता झाल गाणं
ह्रुदयानी छेडल्या सुरांच मनात असच तरळत रहाणं
वाटल होत तेंव्हा तुझे हात हाती घ्यावेत
वाटल होत तेंव्हा तुझे हात मुठीत घट्ट धरावेत
मग म्हंटल जाउ दे!
नाहीच भरल हातानी मन तर ह्रुदयानी काय करावे?
माझं ह्रुदय म्हणता म्हणता उनाड पाखरु झालं
तुझ्या भाळी आठ्या बघताच पुन्हा भानावर आल
आता तुझी नजरही जरा सावरली
मीही माझी स्वप्न आवरली
तू 'येते हं' म्हणताच माझी स्वप्न बावरली!
’येते हं’ या शब्दांनी सारं आकाश भरुन गेलं
’येते हं’ या शब्दांना आज उभं तप सरुन गेलं
तू ’येते हं’ म्हणुन पुन्हा कधीच आली नाहीस
तुझी नी माझी राहीली भेट पुन्हा कधीच झाली नाही
आजुनही मनात सल आहे तुझी मला साथ नाही
मीही खुळ्या मनाला समजवतो
अरे वेड्या ... एकदा गोंदलं कधी जात नाही..


-सत्यजित

Friday, March 4, 2011

टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...

आई बाबांचं घड्याळ झालंय
टीक टीक, टीक टीक, टीक टीक
क्षणा क्षणाला चालली असते
कीट कीट, कीट कीट, कीट कीट

वाजले सात, चालवा हात
वाजले आठ, गृहपाठ
सहाला उठून शाळेत जायचं
सातच्या आत घरात यायचं

वाजणार म्हणुन आईचा गजर
वाजले म्हणुन बाबांचा गजर
कशाला हवाय घड्याळाला गजर
गजरा आधी हेच हजर

घड्याळ तेवढं चालत असतं
घड्याळा शिवाय चालत नाही
वेळे आधी, वेळे नंतर
काही सुद्धा मिळंत नाही

चंद्रावरती देखिल मजला
दिसतात दोन काटे
सूर्याचे देखिल केलेत ह्यांनी
मोजुन बारा वाटे

इतक्याच वाजता सुर्योदय
इतक्याच वाजता चंद्रोदय
मागे पुढे झालं तर
त्यांची देखिल नाही गय

जगणं म्हणजे सारखं
घड्याळ पहात राहणं
जगणं म्हणजे क्षणांचा
हिशोब घालत रहाणं

Success Is Life बेटा
Success म्हणजे खेळ नाही
Time is Money बेटा
घालवायला वेळ नाही

माझ्याशी बोलावं तर
वेळ फुकट जातो?
माझा वेळ जावा म्हणुन
खेळणी विकत घेतो

खेळणी नकोयत मला
आता पैसे हवे आहेत
आईबांबांचे थोडे क्षण
विकत घ्यायचे आहेत

माझ्यासाठी पैसे नको
थोडे क्षण इनवेस्ट करा
जीवना पुढे धावणारं
घड्याळ अ‍ॅडजेस्ट करा...

प्लिज तेवढं... तुमचं घड्याळ अ‍ॅडजेस्ट करा...

टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...
टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...

-सत्यजित.

Wednesday, February 16, 2011

साजन गये परदेस....

पापण्यांत जपले मी
मेघ तुझ्या डोळ्यातले
वाहू कधी दिले नाही
भाव तुझ्या मनातले

दारातून पाहते मी
पाऊस गं दूरातला
डोळ्यातून वाहू लागे
अबोल पाउस आतला

होऊ लागले पिवळे
पान गुलाबी कोवळे
पुसाया अश्रू माझे
मेघ गालावरती ढळे

सांग कितीदा आखू मी
तू लांधलेली वेस
वेशीच्या अल्याड माझा
आपलासा परदेस

कुठली ती वाट सांग
मज तुजपाशी नेई?
वाटाड्या वाटूलीशी
असं वैर का गं घेई?

आळले नाहीत मेघ
जरी भेगाळली धरा
माझा पाचोळा वाहण्या
तुझाच असावा वारा

-सत्यजित.

Saturday, January 8, 2011

सराईतपणे जगण्याच कसब मला दे..

सरल्या क्षणांना सराईतपणे विसरण्याचं कसब मला दे...
उरल्या क्षणांना सराईतपणे जगण्याचं कसब मला दे !

पाउस का पडतो? फुले का फुलतात? झूले का झुलतात?
दुःखा पलिकडे जगण्याची एकतरी सबब मला दे !

जरी झाली नाही थोर, दे पावलांत जोर, चालेन म्हणतो...
स्वप्नांना पावलं, पावलांना स्वप्न थोडी अजब जरा दे !

उरल्या क्षणांना सराईतपणे जगण्याच कसब मला दे

-सत्यजित.

Sunday, January 2, 2011

अगदी तस्सं...

जिवनमूल्यांच गाठोडं बांधुन
पाठीवर त्याचं ओझं वहात
अखंड चाललेली पायपिट
कुठल्याश्या टप्प्यावर
गाठोडं उलगडून बघायचं
आणि फक्त जमेच्या फुल्ल्या मारायच्या
टप्पा?...
ईप्सीत माहीत नसताना उगाच
विश्रांतीच्या क्षणांना टप्पा म्हणायचं
म्हणजे कसं जगल्या सारखं वाटतं

मग हे ओझं वहायचंच कशाला?
पालक म्हणुन मुलांच्या खांद्यावर द्यायला...
मन या नसलेल्या अवयवाला
काहीतरी दुखणं नको का ?... नसलेलं का असेना..
वयातही न आलेल्या मुलीला विचारतोच ना..
"सासरी जाउन कसं व्हायचं तुझं?"
अगदी तस्सं...

-सत्यजित.

आस्तिक की पराधीन

मी तुझ्या समोर हात जोडुन
जेंव्हा तुझ्या डोळ्यात पहातो
पहातो तू काही खुणावतोस का?
तूझे डोळे नेहमी सारखेच
प्रेमळ आणि निश्चल
मी तुझ्या डोळ्यात पहात रहतो
मला वाटतं तू हसलास
मला वाटतं तू फ़सलास
मग कधीतरी कुठेतरी
घडतं मना विरुद्ध
मी धावत येतो तुझ्या कडे
तुझ्या समोर हात जोडुन
तुझ्या डोळ्यात पहातो
तुझे डोळे नेहमी सारखेच
प्रेमळ आणि निश्चल
आणि मला वाटतं तू हसलास...

-सत्यजित.