Friday, March 15, 2013

जाणवेल इतका जवळ रहा...

असा कसा गेलास सोडून


सुजले डोळे लाल रडून

आता तुझे बोल नाही

जिवनाला मोल नाही



राहिल्या गप्पा अर्ध्या-वर्ध्या

पट उधळता कसल्या स्पर्धा



एक डाव मांडू पुन्हा

चल एकदा भांडू पुन्हा ....



निरोप पाठवून सुद्धा आता

तुला मिळणार नाही

कसा आहेस इतकं सुद्धा

आता कळणार नाही



राग येतो असा कसा

न सांगता सोडून गेलास

गृहित धरलं वचन तेवढं

न बोलता मोडून गेलास



शपथ घातली असती तर

थांबला असतास का रे?

खरच का रे माणुस जाता

होतात त्यांचे तारे?



खरच का रे दूर तार्‍यांत

बसला आहेस दडून?

तुझे देखिल डोळे लाल

झाले असतिल रडून



असा वाटत काल चक्र

पुन्हा मागे न्याव

तुझं माझं नशिब तेवढं

बदलता बदलून घ्यावं



बघ विज्ञानाने माणसाला

हेही साध्य होईल

तुझे माझे हरवले क्षण

काळ पुन्हा हाती देईल



सगळे म्हणतात तशी मला

सवय होईल का रे?

प्राणा शिवाय शरीर नुसत

हलत राहील ना रे



मी आवरुन येई

पर्यंत तिथेच थांब बरं

चालत बोलत असणं

म्हणजे जगणं नसत खरं



आता इथून पुढे मात्र

सोडून नको जाऊस

मागितलेलं वचन येवढं

तोडून नको जाऊस



मी आपलं बोलत राहीन

तू तेवढं ऐकत रहा

अदृष्यात असलास तरी

जाणवेल इतका जवळ रहा...



-सत्यजित.

1 comment: