Saturday, November 26, 2011

तुझे नी माझे नाते अनामिक

मायबोलीच्या २०११ च्या दिवाळी अंकाचा विषय होता, "नाते संबंध" आणि मित्रांच्या आग्रहा खातर काही तरी सुचतय का बघु म्हणून आचानक एक नातं मनात आलं.
नातं जे सर्वात पवित्र तरीही खुप नाजुक, जे अनेकांना कळालच नाही, अगदी संत महंत देखिल हे नातं समजवून सांगताना भरकटलेले दिसले. असं हे नातं म्हणजे मैत्रीच, नुसतं मैत्रीच नाही तर स्त्री आणि पुरुष यांच्यातिल मैत्रीच. काही करंटे तर असंही म्हणतात की स्त्री आणि पुरुषात निखळ मैत्री असुच शकत नाही. असं म्हणणार्‍याच्या लक्षातही येत नाही की तेही ह्याच नात्याची नकळत पुजा करतात. ह्याच मैत्रीच्या प्रतिक म्हणजेच "राधा-कृष्णा". आधी राधा मग कृष्ण...जे नातं मंदिरात पुजलं जातं ते निखळ आणि पवित्र असल्या शिवाय का?

कृष्ण समजायला जेवढा कठीण तेवढंच हे नातं सुद्धा. श्री कृष्णाच्या म्हणे सोळा सहस्त्र बायका होत्या पण देवळात मात्र हा राधे सोबत. काही लोक राधेला श्री कृष्णाची पत्नी मानतात (हींदी विकी वर कुणा महाभागाने ते तसं लिहील आहे) तर काही म्हणतात की ती त्याची प्रेयसी होती. राधा ही एक विवाहीत स्त्री होती आणि कान्हा हा तिच्या पेक्षा वयाने खुप लहान होता. ती कृष्णाची ना प्रेयसी होती ना पत्नी होती, ती होती त्याची प्राण प्रिय मैत्रीण, जिवश्य कंठश्य सखी.

स्त्री-पुरुषातली ही निखळ मैत्री काही लोकांना कळत नाही, कारण त्यांनी अयुष्यात निखळ मैत्री कधी केलीच नाही, आणि मैत्री केली नाही म्हणजेच त्यांनी कधी निस्सीम प्रेमही केलं नाही.

राधा-कृष्णतल नातं म्हणजे निखळ मैत्रीच नातं, एकमेकां वरील प्रेमाचं नातं, एकमेकां वरील विश्वासाच नातं, एकमेकां वरच्या भक्तीच नातं, जितकं जवळच असुन तितकच अंतर ठेवणारं हे नातं... हे नातं जितकं सोप तितकच अवघड.
मी जेंव्हा जेंव्हा राधेकृष्णाच्या नात्याला प्रियकर आणि प्रेयसीचं रुप दिलेल पाहतो तेंव्हा तेंव्हा मला ओरडुन सांगावस वाटतं की ह्या नात्याच्या असा अपमान करु नका, कृष्ण-राधेला असं कलंकीत करु नका. "मैत्री" अलौकीक आहे, मैत्री अनमोल आहे, पवित्र आहे, त्याचा असा विपर्यास करू नका...

कविता पुर्ण झाली... नावही दिलं आणि माझंच माझ्या लक्षात आलं की मैत्रीच नातंच मुळी अनामिक असतं. हे पाण्या सारखं असतं, कुठल्याही नात्याच रुप घेणारं, कुठला ही आकार घेणारं, सगळ्यांना आपल्यात सामावुन घेणारं. जेंव्हा पाणी वाहत तेंव्हा ती असते "धारा" आणि ते जेंव्हा स्थिर होतं तेंव्हा ती होते "राधा", स्थिर आणि अचल, मैत्री सारखी. आपलीच कविता आपल्याच विचारांना नव रुप देउन जाते, राधा होऊन जाते...
 राधेच हे मनोगत, माझ्या मैत्रीच मनोगत आहे...

पुसते जग हे मला
नाते अपुले कोणते
न बोलले कुणी जरी
प्रश्न नयनी जाणते

ओढ लागते मना
ऐकू येता पावरी
श्वास हे दुणावती
नजर होई बावरी

तुझाच रंग घेऊनी
कुणी आभाळ रंगले
तू तमास स्पर्शता
नभ चांदण्यांनी शिंपले

आसमंती तूच रे
आत्मछंदी तूच रे
अंतरंगी तूच रे
मर्मबंधी तूच रे

गोपिकांचे प्रेम हे
श्याम रास खेळतो
आर्जवास राधेच्या
चक्रधारी भाळतो

ऐकू येते स्पंदनी
साद घालती वेणू
मी अशी गं नाचते
न पाहते कुणी जणू

नाते हे निष्पाप रे
का कुणी न जाणते?
ह्या जगाच्या नीतीला
नाव द्यावे कोणते?

नाव देता नात्याला
बंधनात बंधते
नाते अनामिक हे
नात्यांची वेस लांघते

- सत्यजित.

जरुर वाचा मायबोली दिवाळी अंक : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2011/index.html

1 comment: