Wednesday, October 2, 2019

पाऊस - सोवळा सोहळा.

जपे स्पर्शाचं पावित्र्य
असा सोवळा पाऊस
बांध आतुर थेंबांना
धुकं बनला पाऊस


मन इतकं आतुर
झाले विचार फितूर
धुकं धुकं नजरेला
पार क्षितिजापातूर


अशा पावसाचे गडी
वृक्ष लतावल्ली झाडी
त्यांच्या पानात लपून
चाले पावसाची खोडी


झरे धुकं पानावर
थेंब दाटुनिया आले
त्याचे आतुरले स्पर्श
दबा धरून बसले


सखा वारा खोडसाळ
बघा आला मदतीला
ओल्या थेंबांच्या मिठीत
घेई पाऊस धरेला


तिज स्पर्शता पाऊस
लव हिरवी शहारे
तेव्हा माना उंचावून
वृक्ष देतीया पहारे


फुले रानात पानात
छुपा मिलन सोहळा
तिचा तलम पदर
त्यात धुकं झालं गोळा


त्याची धुकधुक धुकं
धुकं चुंबन सोहळा
असा भामटा पाऊस
तरी किती गं सोवळा


असा भामटा पाऊस
तरी किती गं सोवळा
धुकं पाऊस पाऊस
धुकं सोवळा सोहळा..

नाजूक साजूक मेहेंदी गं

मुकुल फुलांचा भार व्हावा तू इतुकी नाजूक फांदी गं
पुष्पदलांच्या तळव्यांवरती नाजूक साजूक मेहेंदी गं
डोळ्यां मधले भाव भाबडे ओल्या कडा पाणावती गं
डवरलेल्या आम्र तरु तळी स्पंदन घटिका दुणावती गं
हळद लागल्या गालांवरली लज्जित लाली केसंर गं
बांध घातल्या नयनजळातील प्रतिमा झाली धुंसर गं
रिंगण सावळे डोळ्यां भवती ती माय कावरी हसते गं
दीली तुळस जगदीशा घरी तरी धुकधुक मनी असते गं
कोकरां परी कुशीत शिरून घे जावळ तुझे कुरवाळून घे
गंध मायेचा उरात भरून घे स्पर्श मलमली गोंजारून घे
जपेल तुझा ती सारा पसारा राहिल सारे तुझे आहे तसे
आंगण प्रांगण तुझेच सारे लेक परकी ना कधी होत असे...
-सत्यजित.

Saturday, January 27, 2018

👩‍❤‍👩 चौदा फेब्रुवारीची आरती 💑

#valentine
#happyvalentinesday
#valentinesday
भक्तांनो, संत वव्हॅलेंटाईन महाराज दिन जवळ आलेला आहे. तर ज्यांचा जुळलेलं आहे त्यांचं जुळलेलं राहावं आणि ज्यांना जुळयच आहे त्यांचं लवकर जुळवं म्हणून ही आरती रचिलेली आहे. तर चौदा फेब्रुवारी पर्यंत रोज नित्य नियमाने आरतीचे मनोभावे गायन केल्यास व पाच पन्नास लोकांना फोरवर्ड पाठविल्यास, संत व्हॅलेंटाईन महाराज यंदा तुमचा 'कलेजा ठार, बेडा पार' करतील.

कवीचे नाव खोडून आपले टाकून पाठविल्यास शाप लागून "कुकर्माची जोड, होईल काडीमोड"

👩‍❤‍👩 चौदा फेब्रुवारीची आरती 💑

आरती व्हॅलेंटाईन
यंदा मिळू दे लाईन||
जुळू दे फाईन
आरती व्हॅलेंटाईन || धृ ||

एकाला असो वा जोडी
तुझी सर्वांना गोडी ||
चौदा फेब्रुवारी दिवशी
तू रहा रे पाठीशी||

आरती व्हॅलेंटाईन...❤

कितीजण माझ्या सारखे
असे प्रेमाला पारखे||
त्यांचा कर विचार
त्यांची नौका कर पार ||

आरती व्हॅलेंटाईन...❤

वर्षभर होते लपून ||
आज आले उफाळून||
ज्यांचे प्रेमाचे हे कढ
त्यांची भागव तू नड ||

आरती व्हॅलेंटाईन...❤

वर्षभर नाही जमले
यत्न करूनीया दमले ||
त्यांचा आज निर्धार
त्यांना तुझाच आधार||

आरती व्हॅलेंटाईन...❤

प्रपोज करता तिला
तिने होकार जर दिला||
गुणगान तुझे गाईन
मोठा बुके हि देईन||

आरती व्हॅलेंटाईन...❤

म्हणाली ती नाही तर
तुझं नाही काही खर||
मनसे जॉईन करिन
अँटी व्हेलेंटाईन होईन||

आरती व्हॅलेंटाईन...❤

पोरींना ही मिळो वर
जर असेल चांगली तर||
लागो माझा नंबर
उभा कसुनी  कंबर||

आरती व्हॅलेंटाईन...❤

प्रेमाचा तू शिरोमणी
ऐक माझी आळवणी||
मिळू दे रे एक तरी
मस्त भारीतली परी||

आरती व्हॅलेंटाईन.. ❤

प्रेमास मिळे गती
गाता व्हॅलेंटाईन महती
सत्याचे हे सत्यवचन
येते प्रचिती पटकन

आरती व्हॅलेंटाईन...❤

बोला व्हॅलेंटाईन अशी लवर दे की भारी वाट्टल! 😍😍😍
संत प्रेमदेव भुका राम ...
बोला व्हॅलेंटाईन  महाराज की जय...❤❤❤💋

-जन हितार्थ में जारी, पण लय भारी 😻

- सत्यजित.

Sunday, June 26, 2016

माणूस माणसास पारखा

समुद्र होऊन जग किंवा जग कस्पटा सारखा
कुणाला न कुणाचा थांग माणूस माणसास पारखा..
कस्पटाची चाले फरफट उडत राहतं वाऱ्या वरती
आणि हजारो मैला वरचा चंद्र समुद्राला देतो भरती
कुणाला का कुणाची ओढ? सांगता येत नाही
कुणाला का कुणाचं वेड? जोखता येत नाही
चंद्र विलगता पृथ्वी पासून पृथ्वी इतकी रडली
समुद्र म्हणतो आपण ज्याला ती अश्रूंनी भरली खळगी
म्हणून तर समुद्राच पाणी आपण पिऊ शकत नाही
कितीही वाटलं तरी दुसऱ्याचं दुःख आपण घेऊ शकत नाही

मग समुद्र होऊन जग किंवा जग कस्पटा सारखा
कितीही आपलासं वाटलं तरी
माणूस असतो माणसास पारखा..

-सत्यजित. 

Tuesday, October 13, 2015

प्रिझम आणि कुर्म अवतार

जेंव्हा मी वाचातो काही कविता
तेंव्हा बुचकळ्यात टाकतात त्या मला
ह्या कविता असतात 'प्रिझम' सारख्या
आपल्या रोजच्याच जिवनातल्या
रोजच्याच घटना ह्यातुन पहाता
उलघडून दाखवता ह्या जिवनाचे
अनेक रंग, अनेक पैलू
एर्‍हवी कुर्म अवतारात जगणारे आम्ही
टाळत असतो त्याच्या कडे पहाणं
सारी इंद्रिय पोटाशी घेउन
विचारतो असतो स्वतःलाच
"कसं काय सुचत असेल ना ह्याना?"
इतकं अवघड नाही हो कविता लिहीण....

-सत्यजित.

Tuesday, August 26, 2014

प्रेमाच दुखणं

इतकी साधी सरळ गोष्ट
इतकी अवघड होउन बसते
रोजच तर बोलतो आम्ही
आजच का ती इतकी हसते?

सहजच हसता हसता
सहजच हाती देते हात
सहजच सहजच म्हणता म्हणता
वणवा पेटतो खोल आत

सहजच सहजच म्हणते ती
पण इतकं काही सहज नसतं
मेंदू, छाती, ह्रुदय याहून
मन काही तरी वेगळच असतं

का हा मनीचा नवा छंद
की हा मनीचा चाळा आहे
तिच्या आठवांच्या तरू खाली
स्वप्नांची भरली शाळा आहे

माझच मला कळतय की
हे माझ असं होऊ नये
आणि समजुन उमजुन झालं
तर प्रेम त्याला म्हणू नये

पण सांगाव तरी तिला कसं?
एकवार वाटतं होईल हसं
सांगुन टाकलं जरी कसं बसं
नाही म्हणाली तर होईल कसं?

"TO BE OR NOT TO BE?"
इतका का सोप्पा पेच आहे?
प्राजक्ताने भरली ओंजळ
वा भळभळणारी ठेच आहे....

-सत्यजित.

Tuesday, March 4, 2014

अजब सोहळा - Fall Colors

एक जीर्ण पोक्त पान
झाडावरुन कोसळलं
त्या पडत्या पानाला पाहून
झाडंही थोडं हळहळलं

हिरव्या कोवळ्या पालवीच्या
कडा तेंव्हा झाल्या ओल्या
वादळ तगल्या पानाचाही
कधीतरी होतो पाचोळा

वार्‍यावरती चालली होती
फरफट त्या पानाची
मृत्यू का ठरवतो किंमत
प्रत्येकाच्या जगण्याची?

वार्‍यावरती उडत पान
झाडाहून ही उंच गेलं
डवरलेलं झाड पाहुनी
पान मात्र हबकून गेलं

क्षणात साक्षात्कार झाला
जीवनाचा अर्थ कळाला
वार्‍या संगे फेर धरोनी
नाचू लागला पाचोळा

कुणी तरी ते पान
भगवद्गीतेत जपलं आहे
त्या जीर्ण पानाच्या जाळीत
जीवनसार लपलं आहे.

-सत्यजित.

Sunday, January 26, 2014

नयनामृत

आता फारसं जाणं होत नाही
की जाववत नाही कुणास ठाऊक?
पण गेलो की जाऊन बसतो
विहीरीवर तासंतास
ही विहीर बघितली की
आठवतात तुझे कथिल पाणेरी डोळे..

कधी दुथडी भरुन वाहणारे
तर कधी गहन खोल
आता विहीरीच्या काठावरती
तुझ्या डोळ्यांची आर्त ओल

दिसते मा़झी छबी खोल
पण आता थोडीशी अंधूक
विहीर होते डोळ्या देखत
ओल्या आठवणींची संदूक

इतक्यात कुणी माहेरवाशीण
विहीरीचे ओढते पाणी
मी ओंझळ पसरुन मागुन घेतो
तिच्या कळशीतले थोडे पाणी
.....
...
-सत्यजित.

Saturday, September 14, 2013

घोर

ती थांबली दचकली बिचकली सटकली
मी तिथेच उभा
ती का थांबली?
ती का दचकली?
ती का बिचकली?

जेव्हा कळले
तेव्हा सटकली
येवढेच सलले
पैंजणतले झूल
आडोशाशी हलले
हॄदयातुन कानात
बांधललेल्या तारा
गिटारच्या शेवटच्या तारे
सारख्या झनकारू लागल्या
आणि आडोशीच्या सावल्या
तेवढ्यातच भागल्या

खरच होत्या का सावल्या?
का ती खरच होती दचकली?
ती पुन्हा दिसे पर्यत
कल्पनेच्या कुरणात
अनेक स्वप्न फुलतिल
घोर घोंगावत राहील अधुन मधुन...

Friday, April 19, 2013

नाटक काय ? हम्म्म... (बालगीत)

मुसूमुसू मुसूमुसू रडतंय कोण ?
हातांमागे दडतंय कोण
दोन बोंटाचा झाला कोन
... गुपचुप बघतात डोळे दोन

कुठुनी आला राज कुमार
बोटां वरती होऊन स्वार
दुडुदुडु दुडुदुडु पळू लागता
खुदकन झाले रडू पसार

गुदुगुदु गुदुगुदु गुदगुल्या
खुदूखुदू खुदूखुदू खुदखुदल्या

नाटSSSक काय ? हम्म्म...

-सत्यजित.

Saturday, April 13, 2013

काचभर तडा....

काल पुस्तकांच्या कपाटातून
जुन्या पत्रांचा गठ्ठा पडला
काचेच्या तुकड्यां सारखी
विखुरली सारी पत्र
पण आवाज न करता...

कितीही सांभाळुन
वेचायच्या म्हंटल तरी
घुसतातच काही काचा
आणि ठुसठूसत रहातात बराच वेळ

वेदना सरावाच्या झाल्या की
मी पुन्हा त्या पत्रांचा गठ्ठा बांधतो
आणि जपून ठेवतो...

तडा गेलेल्या भांड्यालाही
फुटायच भय असतंच की

-सत्यजित.

Tuesday, April 2, 2013

एका शब्दाची अंगाई

"आई"

आई.... आई... आई
एका शब्दाची अंगाई

लहानपणी वाटायचं
कधी होईन मी मोठा
किती तरी असेल रुबाब
खिशामध्ये गच्च नोटा

खुप पैसे असले म्हणजे
किती किती मज्जा येईल
गोळ्या चिंचा बोरं चॉकलेटं
सारं काही घेता येईल

हट्ट सारे पुरवायचीस
कीती लाड करायचीस
शिंग अजुन छोटी आहेत
असं काहीस म्हणायचीस

तू कौतुकाने हसायचीस
कुशीत घेऊन बसायचीस
खुप मोठा हो रे राजा
कुरवाळत म्हणायचीस

कधी तरी शिंग फुटता
वाटलं मोठा झालो आता
मला सगळं कळतं बरं
काळजी करु नको आता

पंखा मध्ये बळ येता
पिल्लू घरटं सोडून उडतं
सुवर्ण कडांच्या नभांवर
त्याच तेंव्हा प्रेम जडतं

ढग म्हणजे नुसतं बाष्प
खरं काही असत नाही
इतके दुर जातो आपण
घरटं मागे दिसत नाही

तुझ्या कुशीत बघितलेली
सारी स्वप्न साकार झालीत
इतका मोठा झालो आई
शिंग कुठेशी पसार झालीत

त्या क्षणी कुशीत तुझ्या
खरं तर सगळं होत
आता जगतो आहे त्याहुन
स्वप्न ते काय वेगळ होतं

भीती वाटता आता तुझ्या
कुशीत शिरता येत नाही
आनंदात उडी मारुन
कडेवर चढता येत नाही

आई मला पुन्हा तसं
छोटं छोटं बाळ कर
आई माझे पुन्हा तसे
खरेखुरे लाड कर

बरं नसता उशापाशी
आई पुन्हा तशीच बस
घाबरुन तुला बिलगता
आई पुन्हा तशीच हस

तू हसलीस की कळायच
घाबरण्याच कारण नाही
तू घाबरलीस की म्हणायचीस
होशील तेंव्हा कळेल आई

अजुन जेंव्हा कुशीत तुझ्या
मी डोकं ठेऊन निजतो
तेंव्हा मी कुणीच नसतो
फक्त तुझ बाळ असतो

देवा मला शहाणा कर
देवा मला मोठा कर
देवा मला पुढल्या जन्मी
माझ्या आईची आई कर

आई... आई... आई
एका शब्दाची अंगाई
सार्‍या विश्वाची करुणाई
आई... आई... आई

-सत्यजित

Friday, March 29, 2013

तोतया

भावनांच्या भाऊगर्दीत
हरवतं जात माझं मन
आणि शोध घ्यावा
लागतो मलाच माझा
नाती धुंडाळावी लागतात
उपकारांचे हिशोब मांडावे लागतात
पालथे करावे लागतात
भुतकाळाचे अनेक खण
अनेक चाव्या लावुनही
न उघडणारे अनेक कप्पे तसेच..
नक्की कुठे दडलोय?
की हरवलोय मी?
काही सुगावा नाही
जुन्या अल्बमच्या ढिगात
शोधतो मी माझा फोटो
माझ्या सारख्या दिसणार्‍या
एका व्यक्तीच अस्तित्व जाणवतं
पण मी कुठेच नाही
तो तोतया का मी तोतया?
असा कसा काळाच्या ओघात
अख्खा माणुस हरवून जातो
आणि तो तोतया मलाच
त्याच घर करुन रहातो
आता मी सापडण्याची शक्यता नाहीच
ह्या तोतयाचा तोतया तरी सापडावा

-सत्यजित.

Saturday, March 16, 2013

डर की चिडीयां

शाम की दहलीज पर एक चिडिया


आके बैठी मेरे खिडकी पर

चिडीया जैसी चीडिया थी

सीधीसी पर बढिया थी

देख रही इधर-उधर डर के

कोई आ न जाये इस घर से

मैने सोचा कुछ दाने डालूं इसे

पर हिला तक नही बैठा रहा चुप से

शायद उसका डर मै ही था और मेरा भी

फिर एक ख़याल आया,

"बैठी होगी थक कर घर को लौटते हुवे"

मै झट से ऊठा और उसे डराया

'अंधेरा होने से है' कहके उसे भगाया

अब पहुंचही जायेगी अंधेरा होने से पहले

ऐसा कई बार हुवा है मेरे साथ भी पहले

-सत्यजित

Friday, March 15, 2013

जाणवेल इतका जवळ रहा...

असा कसा गेलास सोडून


सुजले डोळे लाल रडून

आता तुझे बोल नाही

जिवनाला मोल नाही



राहिल्या गप्पा अर्ध्या-वर्ध्या

पट उधळता कसल्या स्पर्धा



एक डाव मांडू पुन्हा

चल एकदा भांडू पुन्हा ....



निरोप पाठवून सुद्धा आता

तुला मिळणार नाही

कसा आहेस इतकं सुद्धा

आता कळणार नाही



राग येतो असा कसा

न सांगता सोडून गेलास

गृहित धरलं वचन तेवढं

न बोलता मोडून गेलास



शपथ घातली असती तर

थांबला असतास का रे?

खरच का रे माणुस जाता

होतात त्यांचे तारे?



खरच का रे दूर तार्‍यांत

बसला आहेस दडून?

तुझे देखिल डोळे लाल

झाले असतिल रडून



असा वाटत काल चक्र

पुन्हा मागे न्याव

तुझं माझं नशिब तेवढं

बदलता बदलून घ्यावं



बघ विज्ञानाने माणसाला

हेही साध्य होईल

तुझे माझे हरवले क्षण

काळ पुन्हा हाती देईल



सगळे म्हणतात तशी मला

सवय होईल का रे?

प्राणा शिवाय शरीर नुसत

हलत राहील ना रे



मी आवरुन येई

पर्यंत तिथेच थांब बरं

चालत बोलत असणं

म्हणजे जगणं नसत खरं



आता इथून पुढे मात्र

सोडून नको जाऊस

मागितलेलं वचन येवढं

तोडून नको जाऊस



मी आपलं बोलत राहीन

तू तेवढं ऐकत रहा

अदृष्यात असलास तरी

जाणवेल इतका जवळ रहा...



-सत्यजित.

Wednesday, March 13, 2013

जल्ला मेला फेसबुकच्या आवशी चो घो (मालवणी फोडणी)

गाव वाल्यान्नू फेसबूकान लई वात आणलेलो असा, ह्याचा काय कारुचा मका सुचाक न्हाय म्हणुन ह्या गाणा. ह्या कोळी गीताच्या (हिच काय गो) चालीवरचा मालवणी गीत असा, कसा वाटता ता नक्की कळवा बरे..


हाडलाय गो कुठुनशी मोबाईल, मारता मेलो स्टाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल

फोटोंका करता लाईक
टाकता फाल्तू कमेंट
मोबाईलचो माज इलो
व्हयी कशाक इतकी घमेंड?
लाळ गाळता बघुन आयटम चेडवांचे प्रोफाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल

काय करतंय देता हो
कशाक स्टेटस अपडेट?
परसाक गेल्यार थयसुन
केल्यान लोकेशन अपडेट
मित्रांनी इचारला ह्याका बरो असा का रे पाईल?
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल..... हाडलाय गो

बरा झाला असता जर
वाचली शाळयेची चार बूकं
इंग्लीश मेल्याक येणा नाय
नी करता फेसबूकं
सोड ह्यो नाद भलतो रे वाया जिंदगी ही जाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल.....हाडलाय गो

अंट्या सगल्या लावत्यात फोटू
चेडवांचे बारक्या बारक्या
फोटू बघान टाकताहा रिक्वेस्ट
अंटींका सारख्या सारख्या
गावातली निघाली अंटी तर चपलेन मार खाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल.....हाडलाय गो

म्हने शेतीयेची आवड ह्याका
म्हनून खे़ळताहा फार्मविल्ले
बापाशीक कळ्ळा तर ठोकतलो
ढूंगणात चार खिल्ले
बापाशीची ह्याच्या चल्ली वणवण मैलो-न-मैल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल.....हाडलाय गो.

आयफोन व्हया गॅलेक्सी व्हये
कशाक नसते फॅड
काय तरी बनान दाखव
कर्तली चेडवा स्वता:हुन अ‍ॅड
लायकी कुणाची ठरत नसता पाहुन फेसबुक प्रोफाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल.....हाडलाय गो

-सत्यजित.

* विषेश आभार: मालवणी सुधारणा केल्या बद्दल वैभव आयरे (vaibhavayare12345) यांचे खुप खुप आभार.

Wednesday, December 19, 2012

व्यसनी

अजुनही आपसूक वळते


नजर त्या खिडकी पाशी

फरक इतकाच की

आता प्रश्न पडतात

तेंव्हा वादळं उठायची



आता नकोशी उत्तरं असलेले

नको ते प्रश्न

तेंव्हा हवीहवीशी असणारी

नको ती वादळं...



तशी खिडकी सामान्यच

पण ह्या खिडकीत, "भुरळ" होती

पाडगावकरांच्या कवितेतला बकूळ होता

नाधोंच्या कवितांतला पाऊस होता

बोरकरांच्या कवितांतला 'पहिला' रोमांस होता

ग्रेसांच्या कवितांतली हुरहुर होती

त्या पलिकडे जाऊन

शब्दां शिवाय मनात रेंगाळत

रहाणारी 'एक' कविता होती



काही गोष्टी सवयीने

किती सवयीच्या होतात

तर काही गोष्टी

सवयी लावून जातात



मी इतकी वर्ष बघतो आहे

त्या खिडकी कडे

पण कधीच थांबलो नाही

पण...काल अचानक मनात विचार आला

की खिडकीतुनही कोणी बघत असेल का

इतकी वर्ष...?  मी थांबायची वाट पहातं...



मगाशी म्हंटलं ना..

नकोशी उत्तरं असलेले... नको ते प्रश्न



-सत्यजित.

Wednesday, December 12, 2012

सचिन तेंडूलकर- The God Of Cricket

सचिन ने शतकी शतक केलं होतं तेंव्हाची ही कविता... Sachin Ramesh Tendulkar -God of cricket...

आज महाराष्ट्राचा सह्याद्री
हिमालयाहून उंच झाला
फक्त पाच फूट पाच इंच
हाईट दिली आहे त्याला

तू टोलवलेला चेंडु जेव्हा
सीमेपार जातो
तुझं कौतूक पाहायला
प्रत्येक डोळा आई होतो

दुडूदूडू पावलांची चिंता
फक्त आईच्या मनाला
सारा देश तुझी आई होतो
तू लागलास की खेळायला

पदकांचेही शतक
शतकांचेही शतक
कौतूक तुझं पहातं रहावं
तू खेळत रहावस अथक

कुणी खुळे विचारतात
देव कधी का पाहीला?
अहो परवाच नाही का...
टीम इंडियाने त्याला विश्वचषक वाहीला

  -सत्यजित.

Tuesday, November 13, 2012

"शुभ दिपावली"



क्षितीजाच्या मुठी हळुवार उघडते
अन होते एक सकाळ
मुठीतला सूर्य हळूवार उधळते
अन होते एक सकळ

सूर्यही अजुन दवांना लपेटून
क्षितीजाच्या दुलईत लपतो
गुलाबी स्वप्नांची तुटलेली रे़कॉर्ड
मी पुन्हा प्ले होते का बघतो

ओल्या केसांनी वावरत असतं
कुंकवान भरल कपाळ
सूर्यही फिका चंद्रही फिका
नक्षत्रांनी उजळली सकाळ

शीळ घालता मस्तवाल वारा
माझ्या खिडकीशी येउन अडतो
त्यालाही ठाव ती सुकवताना केस
प्राजक्ताचा सडा पडतो

रंगानी सजली, रांगोळी भिजली
दिव्याची ज्योत न्हाऊन बसली
हिरवा चुडा अन हळद ओली
नववधूशी भासे झेंडूची माळ

नविन कपड्यात अवघडला कंदील
चूळबूळ करत असतो
आईची हाक आणि बांबाचा धाक
नसला तरीही मी ऊठतो

मी भरभर उठतो, सरसर आवरतो
हात जोडण्या आधी घरी फोन करतो
आई तितक्याच कौतूकाने बघते
अन हसते एक सकाळ

"शुभ दिपावली"
शब्द औक्षण करतात,
नभीचा सुर्य मुठीत कोंबते
पुन्हा हसते एक सकाळ..

-सत्यजित.

Friday, August 17, 2012

विडंबन - हाची सोनियाचा मनु

प्रेरणा : आजी सोनियाचा दिनु


हाची सोनियाचा मनु
वागे श्वानापरी जणू
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे

सहाय्य मड्डमकरी
चाले तिच्या हुकमावरी
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे.. हाची सोनियाचा..

मॅडमचे मन मोही
पाठीघाले देशद्रोही
हा ही वाहीला रे .. हा ही वाहीला रे

घडता भ्रष्ट उठाठेवी
कानावर हात ठेवी
नाही राहीला रे.. नर नाही राहीला रे.. हाची सोनियाचा

असला षंड सरदारु
आत्मघाती बुच मारु
नाही पाहीला रे... नाही पाहीला रे.. हाची सोनियाचा

कृपा करी भरणाभरु
पाप रक्कमा ठेवी करु
हा ही वाहीला रे .. हा ही वाहीला रे .. हाची सोनियाचा

हाची सोनियाचा मनु
वागे श्वानापरी जणू
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे

- सत्यजित.

नभव्याकुळ

लाडानं पोसणार्‍या

मायेच्या सुरकुत्या
आता भेगा झाल्या
आणि पाऊस फक्त
उरला कवितां पुरता


पदराचा ओचा आणि
धोतराचा सोगा
असतोच मुळी साऊंडप्रूफ
नभव्याकुळ डोळे
 झालेत आता वॉटरप्रूफ


अँटी व्रिंकल्स अन
मॉईश्चराईजर्स
वापरणार्‍यांचा दावा
भेगांच काय येवढं?
क्रॅक क्रीम लावा !


तुमच्या व्रिंकल्स येवढ्या
भेगा काही खोल नाहीत
बाटली शिवाय पाण्याला
नी कुंडी शिवाय मातीला
तसंही इथे मोल नाही


कोण म्हणतो पाणी नाही?
पंधरा रुपये लिटरने
अख्खा समुद्र कसा
काय घाण करतात
ही शहरातली गटारं?


पाऊस आता फक्त
कवितेचं पीक घेतो
कधी रोमँटीक तर
कधी ओलेत्या
कल्पनांची भीक देतो.



-सत्यजित.

Friday, June 15, 2012

अनावृत्त पाऊस

ती खिडकीतुन बघता पाऊस

पाऊस काचेवर रेंगाळला

नभ गुरगुरता त्याचे वरती

पाऊस किती बरं ओशाळला



नभास दिसते नुसती खिडकी

अन दिसते ना काही

स्पर्शावे तिने थेंबास म्हणोनी

पाऊस रेंगाळत राही



कोपे नभ ओढी पाठीवर

लकलकता आसूड

लखलखली ती विजेहून

पाऊस वेडा अल्लड हूड



नभास आले कळोनी सारे

तिरक्या केल्या धारा

काचेवरुनी थेंब झटकण्या

घोंगावत ये वारा



फरफरटले ते काचेवरती

तरी न सोडला धीर

वादळात त्या उभे ठाकले

ईवलेसे प्रेम वीर



काचेवरती आर्त थाप

पण तिला कसे कळावे?

थेंबांचे न दिसती अश्रू

मग कोणी कसे पुसावे?



काय भासले तिला कळे ना

ठेवले अधर काचेवरती

गहिवरला कोसळला पाऊस

पुलकित झाली धरती



-सत्यजित.



Monday, May 28, 2012

बादल के बंद लिफाफे में

बादल के बंद लिफाफे में
कहीं उसका खत तो नहीं
पता नही लब्स गिले है या सुखे?
भेजे होंगे उसने हजार सपने और कईं ख्वाईशे 
या भेजी होगी उसने झिलमिलाती हुयी धुप
या फीर आसूंओं की गिली बारीश
लिफाफा खोलतेही गिला होना तय है
बस सोच रहा हूं के किस को साथ ले लूं
दिल को या दिमाग को?

बादल के बंद लिफाफे में
कहीं उसका खत तो नहीं...


-सत्यजित.

Monday, May 14, 2012

मै कभी बतलाता नही....

'आई', आई म्हणजे उगम, आई म्हणजे निर्माण, आई म्हणजे ओळख, आई म्हणजे संरक्षण, आई म्हणजे जिवन, आई म्हणजे अभय.


जिच्याशी जोडलेली नाळ तुटली की बाकी नाती जन्माला येतात ती आई. प्रत्येक जन्मल्याला येणर्‍याला बाय डिफॉल्ट आई ही असतेच. कुठल्याही गोष्टीचा उगम किंवा निर्माण करण्याची शक्ती म्हणजे आई.

तुमच्या साठी मी 'माझी आई' ह्या वर मी एक निबंध लिहू शकेन पण माझ्या स्वतःसाठी म्हणुन माझ्या आई बद्दल लिहायच झाल तर मात्र एक प्रबंध लिहावा लागेल. माझी आई कशी आहे, माझ्या आई माझ्यासाठी काय करते कींवा तिने माझ्यासाठी काय केलं ह्याचा विचार करणं म्हणजे फुटपट्टी ने पृथ्वीच्या व्यास मोजायला निघण्या सारखं आहे. आई बद्दल काही लिहणं म्हणजे मला बाळबोध वाटतं. तिने माझ्यासाठी काय केलं ह्याची कल्पना करण देखिल माझ्या अवाक्या बाहेरच आहे, म्हणुन मी माझ्या आईला डिस्क्राईब करुच शकत नाही. माझ्या साठी आई म्हणजेच मी आहे, ती अंनतरुपी आहे, ती ह्या चराचरात आहे, ती माझं अस्तित्व आहे आणि मी तिच अस्तित्व. मी माझ्या आईच अस्तित्व आहे ह्या विचारानेच मला शद्बात न सांगता येणारा आनंदानुभव मिळतो. 'अहं ब्राम्हास्मी' मध्ये जो आनंद आहे किंवा जी भावना आहे त्यापेक्षा कईक पटीने मला आनंद मी माझ्या आईचच अस्तित्व आहे हे म्हणण्यात आहे. आई म्हणजे मीच, तिच्या पासून वेगळा झालेला मी एक भाग. माझं ब्रम्ह म्हणजे आई, ह्या ब्राम्हाच चलत बोलतं मुर्त रूप म्हणजे आई. आई म्हणजे नुसत ब्रम्ह नाहीतर ती विष्णू देखिल आहे, माझा सांभाळ करणारी तीच आहे. ह्या संपुर्ण विश्वाच एकसंघ रुप म्हणजे माझी आई, एक चालतं बोलतं विश्वरुप म्हणजे आई.

मी लहानपणा पासुनच आईवेडा आहे, मी तिच्या भोवतीच घोटाळायचो, अगदी मोठा होई पर्यत मी कधी आई शिवाय राहीलो नाही. अजुनही तिच्या पसुन दुर रहायचा विचार केला की ते अनसिक्यूर फिलींग मला अजुनही येत. पण आता मी मोठा झालो तेव्हा ते फिलींग हे पोरकटपणाचे द्योतक आहे आणि मी पोरकट नाही असे स्वतःला समजवतो. मी "आईचा लाडका" असं माझा भाऊ म्हणतो मला नेहमी चिडवायचा (अजुनही त्याला असच वाटतं) आणि मी "आहेच मुळी' म्हटल की स्वतःच रडवेला व्हायचा आणि हे सांगायला तो आईकडे जायचा. मग आईची जी तारांबळ उडायची ते पाहुन मला वाटयच की मीच खरा आईचा लाडका आहे आणि म्हणुनच तिची तारांबळ उडते. पण आता कळतं एकच सफरचंद दोघाना हवं तेही अख्ख, वाटणी नको म्हंतल्यावर मग आईची तारांबळ उडणारच. पण तेही साध्य करण्याची किमया ही आईच जाणो.

साला, पुरूष म्हणुन जन्माला आल्याच एकच दु:ख आहे की आपल्याला आई होता येत नाही, अभागी रे अभागी. म्हणुनच स्त्री म्हणजे आई, माझी अस नाही पण कोणची ना कोणाची आई होणं स्त्रीलाच शक्य आहे. किती ते भाग्य.. तरी स्त्री जन्माला दोष देतात स्त्रीया.

पण खरा प्रॉब्लेम ईथेच आहे. स्त्री म्हणजे 'आई', मग हट्ट पुरवायला, रागवायला, मला हे असच हवं म्हणुन त्रास द्यायला आईच असते, म्हणुन मग त्याग करावा तर स्त्रीने असा आम्हा पुरषांचा बाय डिफॉल्ट समज आहे, नाही पक्की धारणाच आहे.

मला लहान मुलं आवडतात कारण त्याना फक्त आई असते, आपण जसे मोठे होतो तसे बाकी ईतर गरजांसाठी आणि अनेक इतर नाती निर्माण होतात. पण मुलांना फक्त आई असते ती असली की आणि कुणाची गरज नाही. त्यात मला मुली जास्त अवडतात असं माझ्या 'सौ'च मत आहे. म्हणजे तशा अर्थाने नाही हो... आमच्या घरातल्या पिल्लावळी मध्ये मी मुलींचे जास्त लाड करतो अस तीच मत आहे. कदाचीत खरही असेल मुली जास्त बदमाश असतात, मुलं नुसती खोडकर आणि मस्तीखोर एकंदरीत, मुली लाघवी आणि मस्का मारु असतात. आपले लाड कसे करुन घ्यायचे हे मुलींना जस्त माहीत असतं, मुलं त्या मानाने साळसूद असतात. पण विचार करता मुली ह्या उद्याच्या "आई" असतात आणि उद्या त्यांना बरच सोसायच आहे, हट्ट करण्याच त्यांच हेच वय आहे, उद्या हट्ट पुरवण्याची जबाबदारी आपसुक त्याच्यावर येणार आहे. कदाचित म्हणुनच त्यांचे जास्त लाड करावेसे वाटत असतिल. उद्या लाड पुरवतो म्हटलं तरी, उद्या एका 'आई'चे हट्ट मी काय पुरवणार, बापरे तेवढ सामर्थ्य नाही रे आपल्यात. म्हणुन ह्या सर्व आयांचे हट्ट आताच पुरवायला हवेत. माझा एक हट्ट असतो त्यांच्या कडे की मनाने आणि शरीराने आत्ताच सक्षम आणि बलवान व्हा... माझा हा एक हट्ट पुरवा, मी तुमचे सगळे हट्ट पुरवायला तयार आहे.

मी हिटलरच्या एका गोष्टीचा प्रचंड चाहता आहे, त्यानी म्हणे रुल काढला होत की प्रत्येक तरूणीने एक वर्ष शेतात राबायला हवं. का तर त्या मुळे त्या सुदृढ होतीत आणि पण येणारी पिढी सुदृढ होईल.

'आई' ह्या शब्दाचा खरा अर्थ कळालेला येवढा देशवेडा आणि येवढा द्रष्टा राजकारणी कसा काय येवढा कूप्रसिद्धीस गेला हे कोडंच आहे. (त्याला कदाचीत जाणुनबुजुन कूप्रसिद्ध केलं असवा असा मला दाट संशय आहे)

बघा मी म्हंटल होत ना आई म्हणजे विश्वरुप आहे काय आणि किती लिहाव...

कीती काही लिहण्या सारख आहे, धरती, माती, नद्या ह्यांना आपण आई का संबोधतो? लागलं, पडलो की 'आई ग्ग' का म्हणतो? अजुन काय नी काय नी किती लिहावं...

आई म्हंटल की हळवं होता येतं पण बाबा म्हंटल की नाही होता येत असं का?.. आई म्हणजे धरती आणि बाबा म्हणजे आभाळ...

हॅप्पी मदर्स डे.. मातृदिनाच्या शुभेच्छा... हे ईग्रजी डें ना देखिल महत्व आहे. आज पहील्यांदाच मी मदर्स डे म्हणुन काही लिखाण केलं आहे. आईशी तर रोजच बोलतो आणि आई बद्दल काय वाटतं हे सांगायला मदर्स डे हवा कशाला..,? मी नाही विश केलं आईला, ना ग्रिटींग... हे लिहील आहे तुमच्यासाठी...

प्रसून जोशी ने काय पर्फेक्ट लिहीलं आहे ना?..

मै कभी बतलाता नही...
कितना प्यार तुझसे करता हूं मै मां..... तुझे सब है पता... है ना... मेरी माँ...

Tuesday, March 27, 2012

मै हूं जुग-जुग जुग-जुग जुगनू - सैल वेणीतल्या स्वैर त्रिवेण्या

सैल वेणीतल्या स्वैर त्रिवेण्या...

खिडकीच्या बारांवर दवबिंदूंच्या ओळी
किरणांनी गाठले पहाटेच्या वेळी
मला वाटलं काजवे थिजलेत...

==================================

आभाळभर लूकलूकते पसरले तारे
तारे नाहीत ते काजवेच सारे
काळ्या चिकट कागदाला रात्र समजले असतिल..

==================================

प्रभांगणी तारे
अंगणी प्राजक्त
मध्ये प्रचंड पो़कळी, आपला गंध आपल्या पाशी..

==================================

काही काजवे मुठीत धरावेत
काही भोकाच्या पेटीत बंद करावेत
तरी पहाट ती येणारच...

==================================

एक कोसळता तारा
इच्छा: वाचव रे त्याला
आणि काजवा उडू लागला...

==================================

सूर्य वाहतो तमाच्या पखाली
निशेचा मोर्चा, काजव्यांच्या मशाली
चंद्राने म्हणे बंद पुकारलाय...

==================================

काजव्यांची रात्र
चांदण्यांची रात्र
अवसेचा झगमगाट...

==================================

जुगनू म्हणजे काजवा ना रे?
काजवा म्हणजेच जुगनू
पण मला जुगनूच आवडतं....

==================================

-सत्यजित.

Wednesday, March 14, 2012

कागदाची चिता

माझी पत्र अजुन का
ठेवली असशील जपून
तुझा चेहरा बोलका होता
कुठवर ठेवशील लपून

कगदाचं काय येवढं
आठवणींच लख्तरं होईल
शाई उडुन जाता जाता
तिच देखिल अत्तर होईल

जर ठेवायची असतील जपुन
तर उत्तरांची तयारी कर
माझ्या पर्यंत प्रश्न पोहचतील
येवढं आत्ताच गृहीत धर

बघ त्या पत्रांतून मला
वगळता येतं का?
त्या पत्रांची चिता रचून
मला जाळता येतं का?

तुझ्या हातानी पाणी नाही
पण अग्नी तरी मिळेल
प्रत्येक पत्र जळताना
तुझे अशृ पाहून उजळेल.

-सत्यजित.

Saturday, March 10, 2012

वाद्यवृंद - बालकविता Audio स्वरुपात :)

वाद्यवृंद - विविधतेत एकता म्हणजेच Unity in Diversity

पेटी म्हणते सा रे ग
तबला म्हणतो धाक धिक ध
शिळ घाले बासुरी अन
ढोल म्हणतो धडाम ध

धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंना धिना

गिटार म्हणतं डिंग डींग डिंग
मेंडॉलीनची टींग टींग टींग
वायोलिन करे कूईं-कूईं कुई-कुई
तान घेते सतार गं

टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन
टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन

पैंजण करती छन छन छन
टाळ करती खण खण खण
घुंगरांची रुणझूण चाले
ताशा वाजे ढडाम ढं

ढींकचिका ढींकचिका ढींकचिका ढींकचिका
ए.. ए.. ए... ए.. ए.. ए.. ए... ए..

ट्रंपेट काढतो रे भोंगा
सेक्साफोनचा रे दंगा
शेहनाई ती सुरात गाते
नादस्वरम करे पॅप्याप प
पॅपॅप प्यां पॅपॅप प्या पॅपॅप प्या पॅपॅप प्या..
पॅपॅप प्यां पॅपॅप प्या पॅपॅप प्या पॅपॅप प्या..

ना एक सारखे जरी दिसती
ना एक सारखे स्वर देती
सुरां मध्ये सुर गुंफता
करती मग ते कंमाल रं
ढीपाडी डिपांग, डिचीपाडी डिपांग,
हेढीपाडी, डिचीपाडी, डिपांग कु...डु....

एक होऊनी गाऊया
धुंद होऊनी नाचूया
गोंगाट मस्ती कल्ला दंगा
चला करुया धामल हो

हम मैं है हीरो (2)
हम मैं हैं हीरो .. ओ ओ ओ ओ ...
हम हीं हैं हीरो.... आम्ही तर हीरो....

-सात्यजित

हे गाणं वाचण्यापेक्षा ऐकण्यात जास्त धमाल येईल. हे गाणं इथे ऐकता येईल


किंवा ईथे क्लिक करा

मी काही गायक नाही, तेंव्हा एका दमात गाणं म्हणताना माझी बरीच दमछाक झाली. मी प्रथमच ध्वनीरूपात सादर करतोय, त्यामुळे चुकांबद्द्ल क्षमस्व.

बच्चापार्टी तुम्हाला. हे गाणं कसं वाटल नक्की कळवा...

Monday, March 5, 2012

अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा...

थांबा बसू नका
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बाबा पाय दुखले
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

थांब उचलून घेतो हं,
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बाबा चला ना...
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बसलात काय?
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

दोघांना उचलून नाही हां जमणार..
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा...

-सत्यजित.

Sunday, February 5, 2012

फुले कागदी दरवळती

तू माळल्या गजर्‍यातल्या
दोन कळ्या सांडल्या
मी द्याव्या तुला म्हंटल तर
त्याही खुळ्या भांडल्या

प्लिज नको ना देऊस
आम्हा तिथे मोल नाही
पण तुम्ही फुलाल इथे
तितकी इथे ओल नाही

हिरमुसल्या बिचार्‍या
मग मलाही मन मोडवेना
निष्पर्ण वहीच्या पानात फुललं
मलाही फूल तोडवेना

जुन्या वहीच्या पानात
अजुनही गंध दरवळतो
घमघमता वेणीतला गजरा
निष्पर्ण वहीवर जळफळतो

ह्या वहीच्या पानांची
सुंदर फुले करीन म्हणतो
"कागदी फुलं गंधहीन"
सांगा असं कोण म्हणतो?

-सत्यजित.

डाव रडीचा

तू माझा एक प्यादी मारलास
मी रडलो चिडलो डाव उधळून दिला
तू तो डाव तसाच लावलास,
माझी खेळी खेळलास, डाव जिंकून दिलास...

Big cheater you are...

Sunday, January 29, 2012

Ifs 'n Buts

अयुष्यात जर-तर,
असायला नको खरतर
जर नसता, तर नसता
सुख असतं खरोखर

जर असं झालं
तर असं होईल
जर तसं झालं
तर कसं होईल?

जर असं झालं तर?
काढुन ठेवा विमा
जर लॉटरी लागली तर?
सुखाला ना सीमा

देवा देवा असं कर
देवा देवा तसं कर
देवा केलस असं तर
देवा केलस तसं तर

जर-तरनी तर
वाट लावलिय पूरी
आजच्या जगण्याला
उद्याची सुरी

एक जर सुखाचा
शंभर तर दु:खाचे
एक जर मौलाचा
शंभर तर फुकाचे

-सत्यजित.

Saturday, November 26, 2011

तुझे नी माझे नाते अनामिक

मायबोलीच्या २०११ च्या दिवाळी अंकाचा विषय होता, "नाते संबंध" आणि मित्रांच्या आग्रहा खातर काही तरी सुचतय का बघु म्हणून आचानक एक नातं मनात आलं.
नातं जे सर्वात पवित्र तरीही खुप नाजुक, जे अनेकांना कळालच नाही, अगदी संत महंत देखिल हे नातं समजवून सांगताना भरकटलेले दिसले. असं हे नातं म्हणजे मैत्रीच, नुसतं मैत्रीच नाही तर स्त्री आणि पुरुष यांच्यातिल मैत्रीच. काही करंटे तर असंही म्हणतात की स्त्री आणि पुरुषात निखळ मैत्री असुच शकत नाही. असं म्हणणार्‍याच्या लक्षातही येत नाही की तेही ह्याच नात्याची नकळत पुजा करतात. ह्याच मैत्रीच्या प्रतिक म्हणजेच "राधा-कृष्णा". आधी राधा मग कृष्ण...जे नातं मंदिरात पुजलं जातं ते निखळ आणि पवित्र असल्या शिवाय का?

कृष्ण समजायला जेवढा कठीण तेवढंच हे नातं सुद्धा. श्री कृष्णाच्या म्हणे सोळा सहस्त्र बायका होत्या पण देवळात मात्र हा राधे सोबत. काही लोक राधेला श्री कृष्णाची पत्नी मानतात (हींदी विकी वर कुणा महाभागाने ते तसं लिहील आहे) तर काही म्हणतात की ती त्याची प्रेयसी होती. राधा ही एक विवाहीत स्त्री होती आणि कान्हा हा तिच्या पेक्षा वयाने खुप लहान होता. ती कृष्णाची ना प्रेयसी होती ना पत्नी होती, ती होती त्याची प्राण प्रिय मैत्रीण, जिवश्य कंठश्य सखी.

स्त्री-पुरुषातली ही निखळ मैत्री काही लोकांना कळत नाही, कारण त्यांनी अयुष्यात निखळ मैत्री कधी केलीच नाही, आणि मैत्री केली नाही म्हणजेच त्यांनी कधी निस्सीम प्रेमही केलं नाही.

राधा-कृष्णतल नातं म्हणजे निखळ मैत्रीच नातं, एकमेकां वरील प्रेमाचं नातं, एकमेकां वरील विश्वासाच नातं, एकमेकां वरच्या भक्तीच नातं, जितकं जवळच असुन तितकच अंतर ठेवणारं हे नातं... हे नातं जितकं सोप तितकच अवघड.
मी जेंव्हा जेंव्हा राधेकृष्णाच्या नात्याला प्रियकर आणि प्रेयसीचं रुप दिलेल पाहतो तेंव्हा तेंव्हा मला ओरडुन सांगावस वाटतं की ह्या नात्याच्या असा अपमान करु नका, कृष्ण-राधेला असं कलंकीत करु नका. "मैत्री" अलौकीक आहे, मैत्री अनमोल आहे, पवित्र आहे, त्याचा असा विपर्यास करू नका...

कविता पुर्ण झाली... नावही दिलं आणि माझंच माझ्या लक्षात आलं की मैत्रीच नातंच मुळी अनामिक असतं. हे पाण्या सारखं असतं, कुठल्याही नात्याच रुप घेणारं, कुठला ही आकार घेणारं, सगळ्यांना आपल्यात सामावुन घेणारं. जेंव्हा पाणी वाहत तेंव्हा ती असते "धारा" आणि ते जेंव्हा स्थिर होतं तेंव्हा ती होते "राधा", स्थिर आणि अचल, मैत्री सारखी. आपलीच कविता आपल्याच विचारांना नव रुप देउन जाते, राधा होऊन जाते...
 राधेच हे मनोगत, माझ्या मैत्रीच मनोगत आहे...

पुसते जग हे मला
नाते अपुले कोणते
न बोलले कुणी जरी
प्रश्न नयनी जाणते

ओढ लागते मना
ऐकू येता पावरी
श्वास हे दुणावती
नजर होई बावरी

तुझाच रंग घेऊनी
कुणी आभाळ रंगले
तू तमास स्पर्शता
नभ चांदण्यांनी शिंपले

आसमंती तूच रे
आत्मछंदी तूच रे
अंतरंगी तूच रे
मर्मबंधी तूच रे

गोपिकांचे प्रेम हे
श्याम रास खेळतो
आर्जवास राधेच्या
चक्रधारी भाळतो

ऐकू येते स्पंदनी
साद घालती वेणू
मी अशी गं नाचते
न पाहते कुणी जणू

नाते हे निष्पाप रे
का कुणी न जाणते?
ह्या जगाच्या नीतीला
नाव द्यावे कोणते?

नाव देता नात्याला
बंधनात बंधते
नाते अनामिक हे
नात्यांची वेस लांघते

- सत्यजित.

जरुर वाचा मायबोली दिवाळी अंक : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2011/index.html

Saturday, September 10, 2011

एक रसग्रहण - भय इथले संपत नाही

मला ही कविता म्हणजे एक विरह गीत जाणवते...त्यात वेडं प्रेम जाणवतं. इतर रसग्रहणात गॅप आहेत .. बर्‍याचदा एक कडवं/ओळ आणि त्या नंतरच्या कडव्यात/ओळीत कवि ट्रॅक चेंज करतो असं लिहीलं आहे. पण ही एक कविता आहे, गझल नाही. कविता स्फुरताना असं होत नाही. कविता पहील्या ओळी पासुन शेवटच्या ओळी पर्यंत एक विचार उलघडत जाते.. त्यात भावनेचा ओघ असतो, त्या प्रत्येक कडव्यात प्रत्येक ओळीत भावनेची गुंफण असते. एका ओळी मागे किती मोठी कहाणी असते हे कवीच सांगु शकतो. प्रचंड एकवटलेल्या भावनांनी एक ओळ स्फुरते, ती तुमच्या पर्यंत पोहचली तर ठीक, नाहीतर ती निर्बोध होते. अशा एकवटलेल्या भावना उलगडुन सांगणं कवीला जड जातं, जे म्हणायच आहे ते पुर्ण एकाच वेळी सांगता येईल हे सांगता येणे अवघड. आणि येवढं उलगडुन सांगायचं होत तर मग कविता कशाला लिहीली असती? स्मित
कवि जे लिहितो ते त्याच्या अनुभवातुन, ती त्याची अनुभुती ती वाचकाच्या अनुभवाशी जुळेल का? आणि नाही जुळली तर तिची गोडी कमी होईल. जसं "गोड आवडतं" म्हंटल की तुम्हाला साखर सुचेल, कुणाला बासुंदी, तर कुणाला जिलेबी, इथे सगळेच गोड आवडणारे एकमत होतात, तरी प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या, पण "जिलेबी हे गोड आवडत" म्हटल की बाकी तुटले. म्हणुन कविने कविता उलगडुन सांगु नये म्हणतात ते ह्याच साठी.. मग ती काहीं साठी निर्बोध ठरते तर काहीं साठी अर्थपुर्ण पण मग तित अनुभुती नाही. ती कविता वाचणार्‍याची होत नाही ती कविचीच रहाते. जी ओळ अनुभुती देते ती कविता आणि जे अर्थ स्पष्ट करते ते गद्य... अस मला वाटतं. पण ज्यांना अनुभुती मिळत नाही आणि जेंव्हा इतर शहाणे त्यांना हेटाळतात तेंव्हा लोक कविते पासुन दुर जातात. म्हणुनच बरेच लोक मला कवितेतल काही कळत नाही, कविता माझा प्रांत नाही, म्हणत कविते पासुन दुर जातात, अशा साठी कविता दुसर्‍यांनी उलगडुन सांगण गरजेच असत. किंवा कविने हिंट देणं गरजेचं आहे. पण जो तो आपल्या अनुभवाने समृद्ध असतो, माझा अनुभव तुम्हाला द्यावा कसा? त्यात अध्यात्म हे असं आहे की ते सगळी कडे फिट होतं, पण अध्यात्म सगळ्यांन झेपत नाही आणि रुचतही नाही. आकाशा कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म जमिनी कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म.. जो देवाशी एकरुप झाला त्याला चोहीकडे तोच दिसतो. पण तो आम्हाला कसा दिसावा? .. तसंच कवितेच.. पण तरी काही ठिकाणी उलगडुन सांगणं गरजेच.. आपला आनंद शेअर करावा.. स्मित तोच मीही करतो आहे..

ही ग्रेसची कविता एका प्रियकराच मनोगत आहे... हे एक विरह गीत आहे. ज्यांना काहीच अनुभुती मिळाली नाही त्यांच्या साठी मी माझी अनुभुती प्रकट करण्याचा प्रयत्न करतो, कदाचीत इतर कविता वाचताना त्यांना अनुभुती कशी घ्यावी हे कळेल... स्मित

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

किती काळ लोटून गेला, किती वर्ष उलटुन गेली तरी तुझी आठवण आली की श्वासांचा वेग वाढतो, काळिज धडधडु लागत. माझ्या मनातल कुणाला कळेल का याची भीती वाटू लागते. ते क्षण डोळ्या समोर तसेच उभे रहातात. अजुन किती वर्ष मी हे ओझं घेउन जगायचं? आणि तू आताही समोर आलीस तर... छे.. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते.

किती संध्याकाळी आपण एकत्र घालवल्या. दिवस रेटारेटीत निघुन जातो पण सांज उतरलीकी त्या सार्‍या आठवणी सध्याकाळी एकवटतात. प्रेमाच खरा अर्थ तुच तर मला शिकवलास, तु नेहमी म्हणायचीस, प्रेम हे बंदीशी सारख आहे, एकदा का ती बंदिश आपण आळवू लागलो की मग कुणाच भान रहात नाही. गात रहावं आणि भान विसरुन एकरुप व्हाव. जे आळवलं ते प्रेम कसलं, जे एकरुप होऊन आळवलं जातं तेच प्रेम.. तेच तुझे शब्द मनात रेंगाळत रहातात एखाद्या बंदीशी प्रमाणे. मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

हा चंद्र म्हणजे तुच ना.. हे चांदण तुझा झरा होउन वाहतं आहे आणि हे तुझ्या जाणिवांचं स्नान मला घालतं आहे. ही माझ्या आजुबाजूची धरती, हे जग ही सारी माया आहे. तू सत्य आहेस, तू शास्वत आहेस... माझं जगण ही जगणं नसुन एक विरक्ती आहे. तू माझं सर्वस्व आहेस ....हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया

तुला आठवतंय किती तास झाडा खाली हातात हात गुंतवुन बसायचो, किती स्वप्न रंगावायचो. कधी मी तुझ्या मांडीवर डोकं ठेउन निजायचो तर कधी तू माझ्या, कधी डोळे मिटले जायचे, कधी मिठी विरघळायची, कधी अधरांना अधर मिळायचे..मग जाणवायची ती फक्त स्पंदन... मग तिही एकरुप होत विरघळून जायची. जगाच भान आणि स्वत:ची जाणिवच नाहीशी व्हायची, जशी योग्याची योग निद्राच.. असा किती वेळ निघुन जायचा कुणास ठाऊक पण भानावर येताच.. हाताच्या मुठी पुन्हा घट्ट व्हायच्या... विलगण्या साठी. उद्या पुन्हा इथेच भेटायचं वचन देत आपण पुन्हा मिठीत विरघळुन जायचो, नुसतं शरिराने वेगळं व्हायला.. झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

किती भोळे होतो आपण, सारी स्वप्नं खरी होतील असं वाटायच ना आपल्याला. हे जग आहे, त्याच्या प्रथा आहेत, त्या प्रथांची कुंपणं आहेत ह्याची जाणिवच नव्हती... ते क्षण नाजुक होते खरे पण ते नाजुक का ते आत्ता कळत आहे, लोकं नाजुक वय का म्हणायचे तेही आत्ता कळतय, त्या नाजुक वयातिल घाव खोल होतात हेच खरं.. . मन अस वार्‍या सारखं सैरभैर किंवा वार्‍या पेक्षाही चंचल की वार्‍यचीही खोडी काढुन पळुन जाता येईल इतकं चंचल, पण तितकच भोळं.. त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती

तारूण्यांचा जोश असा की क्षितीजं ही पदाक्रांत कराता येतिल असा विश्वास, आणि त्यातच हे वेडं वय प्रेमाची जाणिव घेउन येत. भरतीच पाणी जसं किनारे व्यापत खोलवर शिरतं तसच हे प्रेम तारुण्याच्या दारावर भरती होऊन येत आणि अयुष्य व्यापुन जातं.. क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

"माझं तुझ्यावर प्रेम आहे..." येवढ हे हळवं वाक्य सारं अयुष्य व्यापुन गेलं. "जे कधीच संपणार नाही, जे कधीच सरणार नाही अस आपलं प्रेम..सार्‍या जगाशी भांडुन, कुणाची पर्वा न करता मी तुझा/तुझी होईन" हे वचन त्या चार शब्दात होत. आता सारं सारं तू होतिस, श्वासातिल वारं तू होतिस....तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला

पण तेंव्हा समाजची भीती होती, रुढी आड येणार ह्याची कुठे ना कुठे जाणिव होतिच. परिस्थिती मुळे प्रभुरामा पासुन विलगलेल्या सितेला प्रभूरामांचा शेला हा विश्वास देत होता की , "राम येणार, सार्‍या विपदा पार करुन येणार, समुद्र लांधुन येणार, सार्‍या अडचणींवर मात करत येणार.. फक्त माझ्या साठी, आमच्या प्रेमासाठी.. राम येणार... याच विश्वासाने प्रभुरामाचा शेला तिने पांघरुन घेतला असेल, त्यात रामाच्या प्रेमाची उब तिला मिळाली असेल.. तसेच तुझे शब्द ... सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

जसं भाविकांस देवाच दर्शन होण्या पुर्वी देऊळ दिसत असतं, तेच त्याच ध्येय असतं. त्याला विश्वास असतो की देउळ गाठलं की देव हा भेटणारच. तस प्रत्येक प्रेम करणार्‍याच लग्न हे ध्येय असतं एक मंदिर असतं जेथे प्रेमाची पुर्ती होणार असते. ह्या मंदिराची वाट किती खडतर असली तरी एकमेकांच्या साथीने मंदिर गाठुच येवढा दृढ निश्चय होता पण आपण मंदिर गाठण्या पुर्वीच खांब फोडुन आलेल्या दानवाला तू देव समजुन बसलिस तो नृसिंह नाही गं, तो तुझा देव नाही तु जेथे जातेस ते तुझे देऊळ नाही.... देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब

तुझ्या ओंझळीत जे आहे तो देव नाही हे तुला ही माहीत आहे, तुझे कावरेबावरे डोळे, आक्रोश करते अश्रू मला सांगत आहेत की तू माझी आहेस आणि मी तुझा... हा आक्रोश, हा आवेग, हे तुफान परिस्थिती पुढे इतक हतबल झालं आहे की मी तुझ्या पापणी वरला एक उरला सुरला थेंब होउन राहीलो आहे. एकदा का तो पापणीवरुन घरंगळला की त्याचं त्या डोळ्यांशी काही नातं नाही, तो उरतो फक्त पाणी होऊन.. थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

तू नाहीस... तू माझी नाहीस म्हणजे मीही नाही. मला अस्थित्वच नाही. झाडापासुन विलगलेलं फुल, पाण्या पासुन विलगलेलं कमळ आता फक्त देवावर वाहण्या पुरतं उरतं आणि मग निर्माल्य होतं, मी तर संध्येच्या पुजेतल कमळ त्याच निर्माल्य होण्यास आता कितीसा वेळ, तरीही मी शृंगार केला आहे कुणाच्या चरणी वाहण्यासाठी... संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने

काय करणार? जगावं तर लागलच, मी ही लग्नाच्या बेडित अडकलो, मीही कुणाचा झालो.. पण फक्त देहाने.. मी मनाने तुझा होतो आणि तुझाच आहे. हे भोग, हा आनंद फक्त देहा पुरता, ह्या जाणिवा ही फक्त देहा पुरत्याच... देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

लग्न झालं, मुल झाली, संसार सुखात आहे.. पण ही पंचेंद्रीये आजुन तुझ्या जाणिवा कुरवाळत आहेत, तुझा स्पर्श, तुझा गंध, तुझ रुप, तुझ्या अधरांची चव, तुझा आवाज अजुनही ह्या इंद्रीयांत तसाच जिवंत आहे. छान गाणं संपल तरी मन ते गुणगुणत रहातं तशी माझी इंद्रिय तुझी संवेदना गुणगुणत आहेत तरीही दु:ख आहेच... स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे

मी काही केल्या तुला विसरु शकत नाही... हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

माझी कर्तव्यं मी पार पाडली आहेत, आता वाटतंय की पुरे झालं हे आता जिवन. पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तुझं होऊन जावं. बस झालं ना.. आता लवकर लवकर हे अयुष्य संपू दे, पुढल्या जन्मी मी तुझा होईन, तु माझी होशील.. हे खरच होईल? का कुणास ठाउक, सारं धुसर आहे.. पण मला परातायची घाई लागली आहे मला विश्वास आहे तू मला भेटशील, हे अवेळी असेल कदाचीत.. पण मला परतु दे..
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई

हे जिवन हे एक जंगल आहे, भरपुर झाडं आहेत इथे, पण तुझ्याविना ती सारी निष्पर्ण आहेत. तू नाही तर वंसत नाही फक्त आहे ती पानझड... मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

पुढल्या जन्मी आपण पुन्हा एकमेंकांचे होऊ कधीच न विलगण्या साठी..

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

-- ग्रेस

अपनी अनुभुती अपने पास.. नंथींग व्रॉंग इन इट.. हॅप्पी कविता रिडींग..!!!

खर तर ग्रेस यांच्या कवितेत 'आई' न शोधता सापडते ह्याही कवितेच तसच...  तरी मला जे सुचल ते लिहीलं

-सत्यजित.

Sunday, July 31, 2011

हॅप्पी गटारी....थर्रा देशी, आला बाबा... (विडंबन)

सलिल आणि संदिपची माफी मागुन.. दुर देशी गेला बाबा....

यू ट्युब मधील ह्या गाण्याच्या विडीओ मध्ये सलिल म्हणतो...
"अशीच एक गोष्ट आहे जी आपल्याला कळत नाही पण लहान मुलांना जाणवते."
अशीच बापाची व्यथा कळलेल्या मुलाचे मनोदय सांगणारं, मन पिळवटुन टकणार हे विडंबन आहे. हॅप्पी गटारी....!!!

थर्रा देशी, आला बाबा, घेई फैलावर आई
अख्खी बाटली पोटात, तरी घरी आला बाई

असा चकणा बेचव कसाबसा पचवला
बार भिंतीत बसुन अख्खा खंबा रिचवला
"आता पुरे रे बेवड्या" कुणी म्हणतच नाही

कशासाठी कोण जाणे देती ड्राय डेला सुट्टी ?
कोणी ढोसायाला नाही…कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
ग्लास ठेवले मांडून … परि बाटलीच नाही

दिसे खिडकीमधुन बार सारे, दिशा दाही
बार उघडले तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी – मुठीमध्ये नोट नाही

अख्खी बाटली पोटात, तरी घरी आला बाई....

आज घरोघरी गटारी झाली.. घरोघरी श्रावणाचे आगमन जोरात झाले.. आता एक महिना मन मारुन श्रावण पाळणार्‍यांना समर्पित.

-सत्यजित.

Friday, July 8, 2011

ग्लोबल वॉर्मींग ड्रावं-ड्रांव... ड्रूक... ( बालकविता )

एक बेडु़क होता करत ड्रांव ड्रावं
"बेडुक दादा असं काय करताय रावं?"

'पाऊस नाही आला, आलाय मला राग
जरा गाऊन बघतो, मी मेघ-मल्हार राग'

"अरे बेडुक दादा, असा चिडुन नको गाऊस
नाहीतर येणार नाही, कधीच पाऊस"

'ढग नाही, वारा नाही, पाऊस पडत नाही
तुमच्या घरी नळ आहे तुमच अडत नाही'

'अरे..
बघ जरा टीव्ही लाऊन, काही बातमी देतात काय?
मासा काल म्हणत होता ग्लोबल वॉर्मींग हाय'

'ग्लोबल वॉर्मींग, ग्लोबल वॉर्मींग....ग्लोबल वॉर्मींग
आता हे आणि काय?'
"अरे दादा, आभाळातला एसी बंद पडला हाय"

"म्हणुन बाबांनी नवा बसवुन घेतलाय एसी"
'पुन्हा तुम्ही तुमचं बघा, आमची ऐशी-तैशी'

"मग काय करू? सांगतो, एसी लाऊ नका"
' नको, आम्ही प्राणि कुणा त्रास देतो का?"

'येवढच एक निरोप जाउन बाबांना तू सांग
सगळ्या प्राण्यांची, आमची येवढीच आहे मांग

तळ्या मधे, नदी मधे टाकू नका कचरा
सगळ्या सांड पाण्याचा नीट करा निचरा

प्लास्टीकच्या पिशव्या तुम्ही वापरु नका
उघड्यावरती कचरा कधीच टाकू नका'

"आत्ताच जाउन सांगतो तुझा निरोप
पण बेडुक दादा तू रागावू नकोस"

पुन्हा बेडु़क करू लागला ड्रांव.. ड्रावं...
"आता काय झालं? असं काय करताय रावं?"

"अरे,खुप आनंद झाला म्हणुन गातो आहे गाणं
वेड्या सारखे वागतात मोठे, एक बाळ शहाणं'
आहे एक बाळ शहाणं...
निरोप सांगणार ना रे बाळांन्नो..? :) '

ड्रांव, ड्रावं, ड्रांव ड्रावं-ड्रांव ड्रावं-ड्रांव... ड्रूक..
ड्रांव, ड्रावं, ड्रांव ड्रावं-ड्रांव ड्रावं-ड्रांव... ड्रूक...

-सत्यजित.

Tuesday, July 5, 2011

आधारवड

कितीदा तपासुन पाहीली होती फांदी
या वेळी अख्ख झाडच उन्मळून पडलं आहे
गेल्या खेपेस वादळ तरी होत...
आता मात्र.. मी निरखून घेणार आहे
झाड, त्याची मुळं, त्याची फांदी
आजुबाजूची जमिन,
गेल्या दहा वर्षाचे हवामानाचे आराखडे
पण मग सहाशे फुट खोल पाण्याचा साठा?
शेवटी काय अजुन एक कारण राहुन जाईलच
There is nothing called stability,
it is just ability to survive.
एका पायावर तोल सांभाळायचा म्हंटलं
की दोन पायांवरही अस्थिर वाटायला लागतं

-सत्यजित.

Thursday, June 30, 2011

काळ देहासी आला खाऊ

कधी तरी बोलावं आपणच आपल्याशी
कधी तरी एक संवाद साधावा आतल्याशी

तेच व्याप, तेच शाप
तेच पुण्य, तेच पाप
माझ्याच विचारांना मीच होतो पारखा
खरच जगतो का मी आतल्या सारखा?
किती वेळा रेटत जातो मी उगाच आपला मुद्दा
माझ्याच विचारांचा माझ्याच पाठीत गुद्दा

निजताना असते स्वप्नांची भीती
जागताना स्वप्ने तुटण्याची भीती
भीती...? नुसती भीती नाही..
दबक्या पावलांच्या वाटांनी गाठता येणारे
महाल रचलेत मी...
या वाटेत लागतात काही उन्मळूंन पडलेले आधारवड
तर काही घट्ट पारंब्या रोवून उभे असलेले स्थितप्रज्ञ
त्यावरिल चिमण्यांची कधी किलबिल, तर कधी आक्रोश

आधारवड, किलबिल, आक्रोश, चिमण्या... सारे मी ठरवलेले : स्मित :
माझं घेणं ना देणं त्या चिमण्यांशी ना आधारवडांशी
मला हवाय म्हणून, मी केलेला आक्रोश
मला हवाय म्हणून, मी केलेली किलबिल

आता त्याच्याशी संवाद होत नाही, वाद होत जातात
तरिही अजुन एक दिवस काळ आणून ठेवतो हातात
म्हणतो... बघ जमलं तर अजून एक दिवस प्रयत्न कर
"अरे.. काळ आहे मी
प्राण घेतो, तुझ्या सारख्या मृतात्म्यांच काय करू मी?
मला साद हवी आहे तुझी, प्राण नको"
मी हसतो... "आज टळला ना, उद्या पाहू" म्हणतो...

-सत्यजित

Thursday, June 9, 2011

पाऊसमय कोकणसय

माझ्या कोकणची माती
जशी अत्तराची खाण
नभरस कोसळता
देते सुगंधाचं वाण

आला मेघराज नभी
धरा कुंकवाची डबी
हिरवं सोनं लेउनिया
दिसे नववधू छबी

गोड लागतो खायला
ऐन उन्हाचा व्यायला
बाळंतपण लेकीचं
लागे काळजी आयेला

आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
उफाळल्या दर्यासंगे
डोलू लागतील माड

हरवता पायवाटा
गावे तेरडा टाकळा
नाही कुणाचंच भय
रवळनाथाचा हा मळा

घेता पागोळ्या ओच्यात
त्यात मिळे पारिजात
मळा मेंदीभरले हात
त्यात तरारेल भात

नभं थेंबानी चुंबता
लाज लाजली लाजाळू
तिला छेडते आबोली
किती किती गं मायाळू

बघ सरेल श्रावण
मग येईल भादवा
माहेरवाशी गौवरया
बाळा गातील जोजवा

माझ्या मायेच्या डोळ्यात
कसा वाहू लागे झरा
असा पाउस पाउस
येतो कोकणच्या घरा...

-सत्यजित.

Saturday, June 4, 2011

संधीसाधू पाऊस

एक ओली छत्री,
बस मध्ये चढली
तशीच ओली निथळती
सीट वरती दुमडली
खिडकी बाहेर, दारावर
काचांवरल्या धारांवर
धावत्या तरुंच्या पारांवर
खाबांवरल्या तारांवर...
इथे तिथे पसरलेल्या नजरा
आल्या होत्या भानावर

सारे पारधी साव़ज झाले...
निवांत बसले सावध झाले
इतके सावध की...
कुणी सांगुन खिसा कापावा इतके बेसा­वध

पुढच्या माना अचानक
करु लागतात व्यायाम
किमान दोनशे अंशात फिरली नाही
तर मानेच काय काम?

मागचे पुढे, पुढचे मागे
एक ओझरती झलक... आणि उगाच त्रागे..

हा पाऊस काही पहीला नव्हता
तरी इतका मोहक पाहीला नव्हता
बावर्‍या सावळ्या नभांवर
ओघळताना पाहिला नव्हता

ओढणी इतकी सावधान
बिलगून बसली होती छान
हात तिला दाटवती ,
"अगं किती बिलगशील, आहे का भान?"

कुठून येतोय हा मृदगंध?
जो, तो पहात होता
तिच्या ओढणीला बिलगुन
वारा नकळत वहात होता

हळुवार पाऊसही
तिला पाहताच धावला असेल
पावसाला पाहुन असा
वाराही कावला असेल

त्यात छत्री होती तकलादू
पाऊस पाहतो संधी साधू
ढगांत ध्यानस्त बसलेला
विरघळुन जातो ढोंगीसाधू

मी तर एक साधा माणुस
पण नभांनी तरी सावरायच?
मा़झ्याकडे जर असता पाऊस
तर कठीणच होतं आवरायच...

आता मेलो तरी चालेल
पण एकदा मला वर जायचय
तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

- सत्यजित

Wednesday, June 1, 2011

पुन्हा कालचा पाउस

आत्ता पावसाळा येईल
मन पुन्हा ओलं होईल
छत्री उघडू उघडू म्हणता
चिंब चिंब होऊन जाईल

कुणी तरी पावसा कडे
डोळे लाउन पहातंय
मळभ दाटल्या डोळ्यांचं
मन मात्र गातय

पाउस कधी मुसळधार
पाउस कधी रिपरीप
पाउस कधी संततघार
पाउस कधी चिडीचीप

आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस

खोल आठवणीचं बीज
अंकुरून येतं मनावर
वसंतात छाटलं असलं
तरी मन नसतं भानावर !

-सत्यजित

Tuesday, April 19, 2011

रांगोळीशी नातं..

किती सवय असतेना आपल्या
नाती जोडत जाण्याची
एका ओळीत चार ठिपके दिसले
की त्यात रेघ पाहण्याची

ठिपक्यांची रांगोळी, ठिपक्यांची चित्र
न जोडलेले ठिपके, किती विचित्र?
कधी वाटतं, पुसाव्यात सगळ्या रेषा
पुन्हा करावेत ठिपके स्वतंत्र

पण स्वतंत्र ठिपक्यांमध्ये रंग भरता
येत नाहीत, असं मला उगा वाटतं
हातात घट्ट धरलेले हात आणि
ठिपके जोडण्याचा पुन्हा हट्ट

ओळीतले बगळे, ढगांचे आकार
असंबंधातुन होतं काहीसं साकार
एक अनामिक ओढ, एक वेडी उर्मी
जोडत जावे ठिपके पुन्हा एक आकार

खरचं का, ठिपक्यांच्या रांगोळी
सोपी असते म्हणुन शिकवलीस?
की रंगाची आणि नात्यांची समज
अलगद होती रुजवलीस?...
अलगद होती रुजवलीस...

-सत्यजित.

Thursday, April 7, 2011

तुकड्यांनाही महत्व आहे

सोडुन आले स्वप्ने सारी डोळ्यांच्या काठांवर
अजुनही फुलतिल वसंत काही सोडलेल्या वाटांवर

भळभळत्या जखमांतून अश्रू अखंड वाहत राहतात
ते भळभळणारे अश्रू पिउन जखमा भरत जातात

आणि, माझ्या वाटेवरती धरू लागतो मोहर
वसंत दारी थाप देतो, मागतो माझा बहर

डोळ्यांच्या तळी हळूच दाटू लागतात स्वप्ने
पुन्हा एक काचेचं घर, पुन्हा नशीबी जपणे

या वेळी मी निवडुन घेते फक्त रंगीत काचा
नव्या वाटेवर करीन म्हणते कॅलीडोस्कोप त्याचा

तुकड्यांनाही महत्व आहे फक्त रंगीत असायला हवेत
मोठे मोठे सोडुन देउन छोटे सोबत घ्यायला हवेत

-सत्यजित

Thursday, March 17, 2011

असतेस घरी तू जेंव्हा.. (विडंबन)

नसतेस घरी तू जेंव्हा ह्या अप्रतिम कलाकृतीची सदह्रुद्य क्षमा मागुन, संदीप आणि सलिल मला मोठ्या मनाने क्षमा करतिल येवढीच इच्छा.

असतेस घरी तू जेंव्हा
जिव विटका विटका होतो
रागातून उठती त्रागे
बनियान फाटका होतो

छत फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो,
मी जरा निद्राधीन होता
हा सांड घोरका होतो.

येतात मुली दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीतून पाहुन त्यांना
मी असाच अगतिक होतो.

तव मिठीत म़ळमळणाऱ्या
मज स्मरती घामट वेळा,
भासाविन भूत दिसावे
मी तसाच स्तंभित होतो

तू सांग अरे मग काय
मी तोडू या घरदारा?
विटलेला जीव उदास
कल्ईसम भुर्र्भुर्र उडतो.

ना अजुन झालो गोटा
ना भणंग अजुनी झालो,
तुजपाहुन तगमग होते
तुजपाहून जन्मच अडतो.


वरिल विडंबनातिल सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत, तरीही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास निव्वळ मुर्खपणा समजावा. :)

Monday, March 14, 2011

थोडासा बादल, थोडासा पानी, और इक कहानी...

तेच ठिकाण, तीच टेकडी... तो कधीचा तिथे पोहचला आहे, आणि तिला, उशीर झाला आहे. ती निघाली आहे... सारखा फोन, तिचं नक्की येण्याच वचन...आणि दाटून आलेला पाउस.

रंग उधळती संध्याकाळ, सोसाट्याचा वारा, पावसाची चाहुल, मिलनाची ओढ आणि चलबिचल मन... अजुन काय लागतं कविता सुचायला? ही ओळचं एक कविता आहे.
पण आता पाउस आला तर ती कशी येणार? ती येईल नक्की येईल, पण भिजेल ना ती.. इतकी कोमल, इतकी सुंदर... आणि तिला इतका त्रास? आणि इतका त्रास, कुणासाठी? फक्त माझ्यासाठी ...
प्लिज.... प्लिज... प्लिज... हे घनांनो आता बरसू नका, थोडा वेळ थांबा... तिला एकदा इथे येउ देत मग काय थयथयाट घालायचा आहे तो घाला.. पण थोडा वेळ थांबा... तू जगाचा पाउस असशील पण माझा पाउस तर तीचं आहे... माझी सखी...

तो मनातल्या मनात घनांना विनवणी करतो आहे, आळवणी करतो आहे आणि तेवढ्यात पावसाचा एकच थेंब त्याच्या गालावर पडतो... असहाय्य...अस्वस्थ मनाला तेवढसं पुरे आहे.
विनवणीचे सुर रागत बदलतात... तो त्या घनांनाच दोष देतो की माझी इतकी सुंदर प्रेयसी बघुन तुमचाही तोल ढळला आहे.. म्हणूनच इतके अधीर होताय... शोभत नाही हे तुम्हाला...

इतका राग, इतकी अस्वस्थता पण पाउस म्हणजे "रोमांस".. ज्याला पावसात रोमँटीक वाटतं नाही त्याला प्रेम तरी कसं होईल? हा तर प्रेमवेडा आहे.. मगास पासुन गुणगुणत असलेल्या गाण्याचे सुर तसेच तरंगतायत त्याच्या मनात... तुमने इश्क का नाम सुना है... हमने इश्क किया है... इमली से खट्टा इश्क..इश्क.. ( वाह रे रेहमान...!!)
सुरांचं आणि काळजातल्या भावनांच मिलन झालं की कविता आपसूकच उमलते... आणि अशीच गुणगुणलेली ही कविता...

कॄष्ण घनांनो बरसू नका रे
सखीस माझ्या भिजवू नका रे

माझा येणार साजण... रिमझीम
पायातील पैंजण... रिमझीम
हातातील कंकण... रिमझीम
ओठातील गुणगुण... रिमझीम... ... ...

सर सर येते तुझीच रे सर
सलतील तिज हे थेंबांचे शर
स्व:तास इतके रिझवू नका रे ... सखीस माझ्या...

झोंबेल तिज हा शितल वारा
कोमल कांती निळा शहारा
स्व:तास इतके झुकवू नका रे... सखीस माझ्या

माझ्याहूनही तुलाच हुरहूर
आवर तुझीही आतूर भुरभूर
दिलाचे चोचले पुरवू नका रे... सखीस माझ्या

तिचा पदर ना थेंबाचे घर
तिचे अधर ना फुलांचे दल
उगाच स्वप्ने उजवू नका रे... सखीस माझ्या

रंग उधळते तुझे नभांगण
भुलेल तुज हा माझा साजण
भास मनात हा रुजवू नका रे ... सखीस माझ्या

-सत्यजित.

Sunday, March 13, 2011

पाकीजा

उमराव शोधाताय की शोधताय नरगिस
इथे पाकीजा शब्दच मुळी खोटा आहे,
वेड्यांन्नो हा फक्त कोठा आहे

उदरात काय पेक्षा पदरात काय
इथे फायद्याच्या सौद्यातही तोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

चेहरा नाही ना मोहरा नाही
सारा बंद निनावि लखोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

कायद्याचा देव, वायद्याचा देव
पुजलेला देव देखिल थोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

न दिव्यात वात, ना मदतीचा हात
इथे पैसा फक्त मोठा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

अंगाला रंग रंगाला अंग
अंगाचा संग वांझोटा आहे
काय शोधतोस खुळ्या हा कोठा आहे

-सत्यजित.

’येते हं’

अजुनही ह्रुदयात गोंदली आहे तुझी नी माझी पहीली भेट
बावरलेली नजर तुझी ह्रुदयात शिरली होती थेट
मनात दाटल्या भावनांच ओठी येता झाल गाणं
ह्रुदयानी छेडल्या सुरांच मनात असच तरळत रहाणं
वाटल होत तेंव्हा तुझे हात हाती घ्यावेत
वाटल होत तेंव्हा तुझे हात मुठीत घट्ट धरावेत
मग म्हंटल जाउ दे!
नाहीच भरल हातानी मन तर ह्रुदयानी काय करावे?
माझं ह्रुदय म्हणता म्हणता उनाड पाखरु झालं
तुझ्या भाळी आठ्या बघताच पुन्हा भानावर आल
आता तुझी नजरही जरा सावरली
मीही माझी स्वप्न आवरली
तू 'येते हं' म्हणताच माझी स्वप्न बावरली!
’येते हं’ या शब्दांनी सारं आकाश भरुन गेलं
’येते हं’ या शब्दांना आज उभं तप सरुन गेलं
तू ’येते हं’ म्हणुन पुन्हा कधीच आली नाहीस
तुझी नी माझी राहीली भेट पुन्हा कधीच झाली नाही
आजुनही मनात सल आहे तुझी मला साथ नाही
मीही खुळ्या मनाला समजवतो
अरे वेड्या ... एकदा गोंदलं कधी जात नाही..


-सत्यजित

Friday, March 4, 2011

टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...

आई बाबांचं घड्याळ झालंय
टीक टीक, टीक टीक, टीक टीक
क्षणा क्षणाला चालली असते
कीट कीट, कीट कीट, कीट कीट

वाजले सात, चालवा हात
वाजले आठ, गृहपाठ
सहाला उठून शाळेत जायचं
सातच्या आत घरात यायचं

वाजणार म्हणुन आईचा गजर
वाजले म्हणुन बाबांचा गजर
कशाला हवाय घड्याळाला गजर
गजरा आधी हेच हजर

घड्याळ तेवढं चालत असतं
घड्याळा शिवाय चालत नाही
वेळे आधी, वेळे नंतर
काही सुद्धा मिळंत नाही

चंद्रावरती देखिल मजला
दिसतात दोन काटे
सूर्याचे देखिल केलेत ह्यांनी
मोजुन बारा वाटे

इतक्याच वाजता सुर्योदय
इतक्याच वाजता चंद्रोदय
मागे पुढे झालं तर
त्यांची देखिल नाही गय

जगणं म्हणजे सारखं
घड्याळ पहात राहणं
जगणं म्हणजे क्षणांचा
हिशोब घालत रहाणं

Success Is Life बेटा
Success म्हणजे खेळ नाही
Time is Money बेटा
घालवायला वेळ नाही

माझ्याशी बोलावं तर
वेळ फुकट जातो?
माझा वेळ जावा म्हणुन
खेळणी विकत घेतो

खेळणी नकोयत मला
आता पैसे हवे आहेत
आईबांबांचे थोडे क्षण
विकत घ्यायचे आहेत

माझ्यासाठी पैसे नको
थोडे क्षण इनवेस्ट करा
जीवना पुढे धावणारं
घड्याळ अ‍ॅडजेस्ट करा...

प्लिज तेवढं... तुमचं घड्याळ अ‍ॅडजेस्ट करा...

टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...
टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...

-सत्यजित.

Wednesday, February 16, 2011

साजन गये परदेस....

पापण्यांत जपले मी
मेघ तुझ्या डोळ्यातले
वाहू कधी दिले नाही
भाव तुझ्या मनातले

दारातून पाहते मी
पाऊस गं दूरातला
डोळ्यातून वाहू लागे
अबोल पाउस आतला

होऊ लागले पिवळे
पान गुलाबी कोवळे
पुसाया अश्रू माझे
मेघ गालावरती ढळे

सांग कितीदा आखू मी
तू लांधलेली वेस
वेशीच्या अल्याड माझा
आपलासा परदेस

कुठली ती वाट सांग
मज तुजपाशी नेई?
वाटाड्या वाटूलीशी
असं वैर का गं घेई?

आळले नाहीत मेघ
जरी भेगाळली धरा
माझा पाचोळा वाहण्या
तुझाच असावा वारा

-सत्यजित.

Saturday, January 8, 2011

सराईतपणे जगण्याच कसब मला दे..

सरल्या क्षणांना सराईतपणे विसरण्याचं कसब मला दे...
उरल्या क्षणांना सराईतपणे जगण्याचं कसब मला दे !

पाउस का पडतो? फुले का फुलतात? झूले का झुलतात?
दुःखा पलिकडे जगण्याची एकतरी सबब मला दे !

जरी झाली नाही थोर, दे पावलांत जोर, चालेन म्हणतो...
स्वप्नांना पावलं, पावलांना स्वप्न थोडी अजब जरा दे !

उरल्या क्षणांना सराईतपणे जगण्याच कसब मला दे

-सत्यजित.

Sunday, January 2, 2011

अगदी तस्सं...

जिवनमूल्यांच गाठोडं बांधुन
पाठीवर त्याचं ओझं वहात
अखंड चाललेली पायपिट
कुठल्याश्या टप्प्यावर
गाठोडं उलगडून बघायचं
आणि फक्त जमेच्या फुल्ल्या मारायच्या
टप्पा?...
ईप्सीत माहीत नसताना उगाच
विश्रांतीच्या क्षणांना टप्पा म्हणायचं
म्हणजे कसं जगल्या सारखं वाटतं

मग हे ओझं वहायचंच कशाला?
पालक म्हणुन मुलांच्या खांद्यावर द्यायला...
मन या नसलेल्या अवयवाला
काहीतरी दुखणं नको का ?... नसलेलं का असेना..
वयातही न आलेल्या मुलीला विचारतोच ना..
"सासरी जाउन कसं व्हायचं तुझं?"
अगदी तस्सं...

-सत्यजित.

आस्तिक की पराधीन

मी तुझ्या समोर हात जोडुन
जेंव्हा तुझ्या डोळ्यात पहातो
पहातो तू काही खुणावतोस का?
तूझे डोळे नेहमी सारखेच
प्रेमळ आणि निश्चल
मी तुझ्या डोळ्यात पहात रहतो
मला वाटतं तू हसलास
मला वाटतं तू फ़सलास
मग कधीतरी कुठेतरी
घडतं मना विरुद्ध
मी धावत येतो तुझ्या कडे
तुझ्या समोर हात जोडुन
तुझ्या डोळ्यात पहातो
तुझे डोळे नेहमी सारखेच
प्रेमळ आणि निश्चल
आणि मला वाटतं तू हसलास...

-सत्यजित.

Monday, December 13, 2010

भुर्र ...जायचय

माझ्याकडे आहे डॉल
निळे डोळे गोरे गाल

दुदू काही पित नाही
पप्पी कुणा देत नाही

आडवं करता झोपते
अंगठा सारखा चोखते

माझ्या मागे मागे करते
फिरायला ने मला म्हणते

बाहुली लागली रडायला
तिला जायचय फिरायला

मला देखिल रडू येतय
सांगा कोण फिरायला नेतय?

-सत्यजित.

Saturday, December 11, 2010

जेंव्हा बाप जन्माला येतो..

बाप झाल्यावर कळलं बाप होणं म्हणजे काय
जन्म दिल्यावर कळल जन्म घेणं म्हणजे काय

बाप म्हणजे पाऊस असतो बाप असतो हिरवळ
स्वतः जळत असताना, लेकराच्या चटक्यांची कळवळ

किती उशिरा कळू लागला खाल्ल्या फटक्यांचा अर्थ
काळजीला जनरेशन गॅप म्हणणं किती होतं व्यर्थ

समजवून सांगायला जाता, तो जातो चिडून निघून
रागातंही मला हसू येतं, समोर माझं बालपण बघून

समजवुन समजला नाहीच तर देतो चार फटके
आई-बाप ते आई-बापच ! कुणीच नसतं हटके

दु:ख खाल्ल्या फटक्यांचं नाही, दु:ख दिल्या फटक्यांचं नाही
मी जसा बाप बनलो तस त्याचंही त्याला कळेलच की नाही ?

दु:ख येवढच आहे अजुन कितीश्या चुका म्हातारपणी कळतील ?
तेंव्हा वळुन वळायचं म्हंटलं तरी, म्हातारी पावलं कीतीशी वळतील ?

आज किती सहज काढत जातो आपण त्यांच्या चुका
त्यांनाही आपले पाढे वाचता येतात, पण बाप राहतो मुका

उन्हात होरपळल्या शिवाय पाण्याची वाफ होत नाही
पाण्याची वाफ झाल्या शिवाय पाऊस होता येत नाही !

जळण्यामध्येही जगणं असतं येवढं आज ग्राह्य आहे
बाबा, तुमच बोट धरुन चालतोय म्हणुन सारं सुसह्य आहे !!

-सत्यजित.

Friday, September 24, 2010

सहिष्णुतेचे गोडवे गाऊ- जय श्री राम..!!!

आता हया कवितेत राम उरला नाही... 22 जानेवारी 2024... 😂

अमाचा राम आता अयोध्येत , जय श्री राम...

आज देवाचा खटला
मानवाच्या दरबारी
देवा तुझं खरं होत 
मानवा पेक्षा माकडं बरी

आता कसा काय कुणाला
अयोध्येत उरला नाही राम?
सत्ता उपभोगुन झाली
आता तुझं काय काम?

कुणी मस्जिद पाडुन जिंकुन येत
कुणी मस्जिद बांधुन येतील जिंकुन
ढूंगणं वर होताना तुलाही पाहतील डूंकुन

त्यांची मात्र खरी श्रद्धा
आमची सारी थेरं आहेत
तुझी वानरं वनात राहीली 
इथे धोब्याची पोरं आहेत

मंदिर बांधण सोप नाही
आता कायदा आड येतो
निधर्मी देशात आमच्या 
भगवा हीरव्या आड होतो

तेंव्हा चौदा वर्षांनी वनवास संपला
आता चौदा वर्षांनी करतात कोर्टात उभा
तुला पुन्हा वनवासात धाडण्याची
 कायद्या अंतर्गत आहे मुभा

तेव्हा पितृ वचनासाठी गेलास
आता आमच्यासाठी जा
इथे बंदी होऊन रहाण्या पेक्षा 
वनवासात सुखी रहा..

संकट येता आजही
आम्ही तुझचं स्तोत्र गाऊ
राम-रहीम एक म्हणतं 
सहिष्णुतेचे गोडवे गाऊ

-सत्यजित.

Monday, September 20, 2010

क्षणभर जिंदगी

उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं

तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ

चुके क्षणांचा मेळ
कधी येते सांजवेळ
दूर तारकांस मिळे
तुझा प्रकाश नितळ

जेंव्हा फुलारून येते
नभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ

माझ्या मनात उठले
भाव-विभोर तुफान
घाल थोडीशी फुंकर
बघ क्षमेल वादळ

-सत्यजित.


--------------------------------------------------------------------------------------
माझी कविता मलाच उलघडते तेंव्हा...


उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं

एका सुंदरश्या सकाळी नववधू प्रमाणे दवाचा घुंगटा ओढुन बसलेली धरा, तिचा घुंगटा उलघडण्यासाठी आतुर झालेली सुर्याची कोवळी किरण पुढे सरसावतात आणि तू दिसतेस. आत्ता न्हाउन निघालेली, ओले केस हळुवार बांधलेली. त्या सोनेरी किरणां पेक्षा तुझं रुप अधिक मोहक दिसतंय आणि वाटतंय...

तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ

तुझ्या केसातील पाण्याचा एक थेंब कुठे तरी लगबगीने निघालाय, आणि तुझे सुंदर डोळे पाहताच तुझ्या पापणीवर स्थिरावलाय, तुझ्या पापणीवर स्थिरावलेला हा थेंब गुलाबाच्या पाकळ्यांवरील दबबिंदू सारखा दिसतो आहे. त्याच्या ह्या धिटाईला दटावण्या साठी तू पापण्यांची उघडझाप करतेस आणि माझ्या अंतरंगात अनेक फुलपाखरं उडु लागतात....

चुके क्षणांचा मेळ
कधी येते सांजवेळ
दूर तारकांस मिळे
तुझा प्रकाश नितळ

वेळेचं भान राहीलं नाही, कितीसे क्षण एका क्षणात सामावुन गेले आहे "एक पल में जींली जिंदगी सारी", मी पार हरवुन गेलो आहे. हळुवार सांज कधी आली कळलं सुद्धा नाही. चांदण प्रकाशात तुझं रुप येवढं खुललं आहे की वाटतंय ह्या तारका तुझाच प्रकाश घेउन लखलखताहेत.

जेंव्हा फुलारून येते
नभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ

सांज मावळली, एक दोन तारकांचं आभाळ आता नक्षत्रांनी भरुन गेलं आहे. ही काळी रात्र तुझ्या डोळ्यांचं काजळ झाल्या सारखी भासते आहे. तुझ्या खोल अथांग डोळ्यात हरवुन जावसं वाटत आहे.

माझ्या मनात उठले
भाव-विभोर तुफान
घाल थोडीशी फुंकर
बघ क्षमेल वादळ

माझी मनस्थिती मला काही कळण्याच्या पलिकडे निघुन गेली आहे. मनात भावनांचं काहूर उठलं आहे. तू माझ्याशी बोलावंस असा माझा हट्ट नाही पण, एखादा कटाक्ष देखिल ह्या वेड्या मनाला स्वस्थ करील.

-सत्यजित. (Satyajit Malavde)

क्षणांचा पिंजरा

तुझ्या मुठीतील माझे हात
हे स्पर्शाचे इंद्रीय तुझ्याचसाठी

तुज साठी जागते सारी रात
हे स्वप्नांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

शहार्‍यांस जेंव्हा येते जाग
हे जाणिवांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

पापणी लांधून वाहते पाणी
हे भावनांचे इंद्रीय तुझ्याच साठी

तुझ्या क्षणांचा होतो पिंजरा
हे आठवांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

-सत्यजित.

Monday, July 19, 2010

जिवनसखा... पाउस..

पावसाची नी माझी मैत्री झाली दाट
हाती दिला पावसाने थेंबांचा हात
असा कसा मित्र तू? आत्ता सुकून जाशील
वार्‍यावरती झूलताना दिशा चुकून जाशील

मी सुकून जात नाही मित्रा! झिरपत जातो खोल
वरवरचा ओलावा, ती मैत्रीच असते फोल

नदी, नाले, ओढे, झरा तो सतत वहात राहतो
मैत्रीचा अंथांग समुद्र मी किनार्‍यावरुन पहातो
मी चालत जातो ओल्या वाळूत, पाय खोल रुततात
धावत येतात लाटा आणि खळखळून हसतात
मीही खळखळून हसतो, ओंजळीत घेतो त्याला
माझ्या वाचुन वाळला नाहीस? उगाच दाटवतो त्याला

तो म्हणतो वाळणं माझ्या नशिबी नाही
पण कीत्ती खारावलोय बघ...
आभाळ भरुन आलय इतका भारावलोय बघ

मी पुन्हा हात पसरतो, तो थेंबांचा देतो हात
पाउस झिरपत झिरपत, बरसत रहातो आतल्या आत...

माझा जिवनसखा.... पाउस..

-सत्यजित.

गोळा गोळा ..सुर्र सुर्र (बालकविता)

थंड थंड बर्फाला
किस किस किसला
किस किस किसता
खस खस हसला

पाण्यासारखा बर्फ झाला
गोरा गोरा पान
गोळेवाला त्याचा आता
मेकअप करणार छान

सुर्र... सुर्र....

सुर्र... भुरका मारत
मस्त गोळा खाऊ
रंगलेली जिभ मग
आरशात पाहू

-सत्यजित.

(Satyajit Malavde)

जिवन

माणसाच्या खरतर दोनच गरजा, आधी शारिरीक आणि मग मानसिक. तशा माणसाला व्याधीही दोनच शारिरीक आणि मानसिक. जिवनातला फोलपणा कळल्यावर देखिल जिवनाबद्दल तत्वज्ञान सांगणार्‍या संतांना तरी काय म्हणवं? त्यांना जिवन खरच कळलं असतं की नाही कुणास ठाउक? ना आगा, ना पिछा. जावं गप-गुमान जंगलात, हिमालयात रहावं. स्वतःचा काय नी दुसर्‍याचा काय, संसार तो संसारच, आणि संसार म्हंटला की गुरफटण आलच. पण काही संत मात्र समाधी घेतात तर काही संत लोक कल्याणाचा वसा उचलतात. हे तर तसच आहे ना, तुला माझं पटणार नाही "मी घर सोडुन गेलेला बरा" तर दुसरा म्हणतो "तुला माझं पटो न पटो, तुझ्या समजण्याच्या पलिकडे आहे सगळं". थोडक्यात काय तर, जिवनाच्या फोलपणातही फोलपणा आहेच. पण एक मात्र खरं प्रत्येकाला आपला व्हूव पॉइंट आहे, इथे निरर्थक असं काहीच नाही, एक जिवन सोडलतर... प्रजनन ह्या निव्वळ धेय्याला कीती फाटे फोडलेत आपण.

-सत्यजित.

भयभीत सावल्या

तू शांत समई सारखी तेवत असलिस
तरी भींतीवरच्या सावल्यां सतावतात
तुझ्या तेजा पेक्षा तुझ जळणं जाणवत राहतं
शेवटच्या धुराचा दर्प दरवळे पर्यंत
कोणाला कळणारही की तू जळत होतीस
"तेजासाठी कुणाच तरी जळणं अपरीहार्यच"
हे तुझ तत्वज्ञान मला कधीच पटलं नाही
प्रत्येकवेळी माझ्या विचाराना मुर्खात काढत तू म्हणतेस...
सावल्यांच अस्तित्वचमुळी ज्योतीने असतं
सावल्यांच तरी काय? आपलाच आभासतात त्या
जे दुसर्‍याला जाळतं ते जळणं आणि
जे दुसर्‍याला प्रकाशमान करत ते उजळणं
ज्योत कधीच जळत नही ती फक्त उजळतं असते
आता डोळे मिट आणि म्हण "तमसो मा ज्योतिर्गमय"

-सत्यजित.

Monday, February 1, 2010

अनाथांची माय

एक झोळी पाठीवरती
एक शिळीपाकी पोळी
भीक मागत्या हातावरती
मातृत्वाच्या ओळी

कुरवाळल्या रातीचा
अंधार मनाला जाळी
अंगावरचा पान्हा सुकला
सुकल्या पान्ह्याची होळी

माय असते बिना नखांची
ती वांझोटे कुरवाळी
दोन अश्रू स्तनातले
बाळाच्या ओठी ढाळी

केली उकीरडयात रिकामी
भरलेली झोळी
मातृत्व कुणाचे पोटी
दातृत्व कुणाच्या भाळी

माय! तिला फुटतो पान्हा
ऐकुन ती कींकाळी
कोण कुणाची खळगी भरतो?
परी तो मेघ तू हो आभाळी

कितीक तोंडे पाठीवरली
ह्रुदयाशी कवटाळी
घास नको घासातला
ती मागते शीळी पोळी.

-सत्यजित.

Friday, January 29, 2010

एक घास चंद्र ..

आई... तो का गं म्हणतो खेळायला एक चंद्र आण?
आई... मला नको चंद्र फक्त त्याचा एक तुकडा वाढ
आई... ह्या फुटक्या पत्र्याच्या डब्ब्यामध्ये
लाउया का गं एक स्वप्नाचं झाड?
स्वप्नाच्या झाडामागे तरी चंद्र लपेल का?...!!!
रात्र असली तरी अंधार कुठेच नसेल का?
त्या झाडाला लगतील ती स्वप्न मी पाहुन घेईन
माझ्यासाठी थोडी ठेवेन आणि...
थोडी आई तुला देईन..

-सत्यजित.

Tuesday, January 26, 2010

विडंबन : हा वास हा छळतो मला (आभास हा छळतो मला)

मुळ गाणे इथे ऐकता येईल: आभास हा.. http://kahigani.blogspot.com/2008/05/blog-post_6006.html - शेड्यां पासुन मुळां पर्यंत सर्वाची माफी मागुन.

खर तर ह्या विडंबना साठी आभास हा. चे "हा वास हा" येवढेच करणे पुरेसे होते. तरी इतर बदल भावना पुरेपुर उतरवण्या साठी केले आहेत.

विषेश टीपः हे विडंबन वाताचा त्रास , अपचन, बद्ध कोष्ठतेचा त्रास असताना ऐकल्यास विषेश आराम मिळतो. फिदीफिदी तरी प्रयोग अ‍ॅट ओन रीस्क करावा, त्रास वाढल्यास मी जबाबादार नाही.

कधी पूर पूर, कधी टूर टूर, पोट कळवळे आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कसा सावरू मी; आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे कुंथतानाही मला

हा वास हा, हा वास हा
छळतो तुला, छळतो मला !

क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तू ही, जवळ वाटे पण, काहीच नाही हाती

मी अशीच हासते; उगीच लाजते, पुन्हा तुला साठवते
मग मिटून डोळे तुला दाबते; तुझ्याचसाठी नाचते

तू नसताना असल्याची कळ का?;
दिसे स्वप्न का हे बसतानाही मला
हा वास हा, हा वास हा
छळतो तुला, छळतो मला !

मनात माझ्या हजार शंका, तुला मी ताणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस तू खरा कसा रे

तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे कुंथतानाही मला
हा वास हा, हा वास हा
छळतो तुला, छळतो मला !

-सत्यजित

Friday, December 4, 2009

वेड्या मनाचे श्लोक

मना वेड्या सारखा वागु नको रे
जे दिसे सर्व सुंदर मागु नको रे

जी इतकी सुंदर दिसते परिशी
तिचे आधी जुळले असते कुणाशी

आधी निरखावे, आधी पारखावे
आधी नोंदुन घ्यावे तिचे बारकावे

मनाचे मित्रांसी आधी सांगुन द्यावे
टाळावे मित्रांमधले फुका हेवे दावे

तिचे लक्ष वेधेल ते ते करावे
तिच्या कटाक्षासी जिवे मरावे

जसा फुला भोवती फिरतो रे भुंगा
तसा तिच्या भोवती घालावा पिंगा

फ्रेंडशीप डेला भले फ्रेंडशीप करावी
वॅलेंटाईन डेची मनी आस असावी

तिला एकटीला एकटेची गाठावे
धडकत्या मनाचे गाठोडे सोडावे

का ती नुसते नाक मुरडुन गेली?
वा तू दिले फुल चिरडुन गेली?

जर नाक मुरडता... पटली रे बेटा....
जर फुल चुरडता पुन्हा घाला खेटा

मना धीर कधी सोडु नये रे
न जुळलेले नाते तोडु नये रे

जरा रागवेल, जरा तिमतिमेल
जरा धीर धरता एकदा ती हसेल

शहाणपणाचे बहु सल्ले देतिल शहाणे
हे शहाणेच बसती चघळत चणे-दाणे

सत्या अंतिम सत्य सांगतो ऐक
"यत्न नी प्रयत्न" हाची मार्ग एक

जर ना पटली तरी तिच न होती एक
कर यत्न -प्रयत्न तुज मिळतिल कैक...

जय जय प्रेमविर समर्थ....!!!

-सत्यजित.

Friday, October 30, 2009

पाउसमयी...

धुक्यांच्या दुपारी
डोंगराच्या माथी
पाउस जाहली ती
देत हात हाती

मी चिंब चिंब ओला
पाउसही भिजलेला
चेतऊनी शहारा
मीठीत निजलेला

श्वासात मंद होता
मृद्गंध वेडावणारा
आवेग तुफान होता
नसांत रोरावणारा

विरघळून गेले माझे
तन मातीचे होते
खळखळत्या गिरीघारा
ओघळ प्रीतिचे होते

हळुवार उतरली सांज
इंद्रधनू नभात
पाउस मृण्मयी झाला
करीत प्रीतिची बरसात.

-सत्यजित.

Monday, October 19, 2009

कृत्रीम पाउस

तू आल्यावर पाहू म्हणून, छप्पर गळकंच सोडून दिलं
काल माझं छप्पर, सारं वार्‍यावर सोडून, उडून गेलं

बाबा म्हणाला होता....

आभाळातून बघेल तो, खाली वाकून बघत नाही
दोन-चार कवडशांनी कुणी जळून मरत नाही

बाबा, बघ तुला आधार देत वाशांना तडा गेला
वाशांचा आधार छप्पर सोडून उडून गेला

रहाटाचा कोरडा दोर टोचला असेल ना त्याला
कितीदा तुटला दोर.. कालच कसा तरून गेला ?

आभाळ पाहणारे डोळे आता आभाळातून पाहतात
आभाळातून रडतो बाबा तिथेही अश्रू कोरडे वाहतात

कृत्रिम पाऊस तलावांवर, शेत मात्र करपून जातं
करपलेलं जाळायला, सरकार दुष्काळी पॅकेज देतं !

-सत्यजित.

गीतोपदेश

पुन्हा भिक मागून भडवे
जिंकून येतील निवडणूका
उद्या साले हेच भडवे
करतील आपल्या अडवणूका
खरंच कुणास ठाउक
ह्या देशात कधी होतील का सोडवणूका ?

कुणाला दोष द्यायचा ?
साला... नागडेपणाची फॅशन आलिये
घोटाळे, फ्रॉड, रेप हीच आजची पॅशन झालिये
अगदी असेच नाही, पापभीरूही आहेत
लांब रांगा तासनतास
गंडे, महाराज, रुद्राक्ष, मंत्र तंत्र यंत्र
करा देवाचा धावा
देवही सैतानाच्या आधीन
फक्त पुजारीपणाचा कावा

पूर आला, मदत करा
कारगील झालं, मदत करा
रस्ता केला, टोल भरा
मग आम्ही भरल्या टॅक्सची
सुरळी केलीत कि काय ?
देश विकण्या आधी
तुमच्या आया-बहिणींची मुरळी केलीत कि काय ?

पण मी तरी काय करणार ?
प्रतिज्ञा केलीये लहानपणी
सारे भारतीय माझे बांधव आहेत
हाताबाहेर गेलेले कौरव
थोट्याचा बोटांएवढे पांडव आहेत

आयला ! कृष्णा ?
तू पण बाप आहेस
एवढ्या दिवस झेपलीच नव्हती बघ तुझी गीता !

-सत्यजित.

Wednesday, August 26, 2009

!!! ॐ श्री गणेशाय नमः !!!

उठ उठ रे उठ गणराया
तुज आवडता, मोदक घे खाया

पुर्वेस तिष्ठली सुर्याची किरणे
दव ओली झाली दुर्वांची कुरणे
तुझविन जास्वंदी रुसली रे फुलाया
उठ उठ रे उठ गणराया

बघ आकाशी चंद्र गेला विलयाला
तुझ ओवाळीत ये रवि उदयाला
उठ उठ रे उठ जगाचे तम साराया
उठ उठ रे उठ गणराया

तुज संगे खेळाया जमले बघ रे गण
भावे आनंदे उत्सवती तुझाच रे सण
ह्या भक्तांची दु:खे ने विलयाला
उठ उठ रे उठ गणराया

!!! ॐ श्री गणेशाय नमः !!!

Saturday, August 15, 2009

चिमुटभर

अंगोपांगी उठलेल्या व्रणांना
तू मिलन खुणा म्हणालास
मी प्रेम तर तू अधिकार म्हणालास
यातच सगळ आलं
चिमुटभर वाळु झालं..


-सत्यजित

Friday, August 14, 2009

आला आला माखन चोर रे...



माझ्या राहूटीत शिरला मोर रे...
आला आला माखन चोर रे...

निळं निळं तनू भाळी मोर पिसारा
दुध, तुप, लोणी खाउन केला पोबारा
त्याला बांधावा तर मिळेना गं दोर रे...
आला आला माखन चोर रे...

भरलेला घडा होता टांगला वर
एका वर एक त्यांनी रचले गं थर
वर नंदाच कार्ट पोरं रे....
आला आला माखन चोर रे...

ऐकेना पोरं हाती घेतली मी काठी
एक एक रट्टा दिला एकेका पाठी
माझ्या जिवालाच लागला घोर रे...
आला आला माखन चोर रे...

मैया म्हणुन डोळ्यातले पुसतो गं अश्रू
माझ्या कुशीत गं शिरलं अवखळ वासरु
कसं लबाड हे यशोदेच पोरं रे...
आला आला माखन चोर रे....

-सत्यजित

Monday, July 27, 2009

प्राण्यांचं सा रे ग म (बालकविता)

एकदा जंगलात प्राण्यांनी ठेवलं सा रे ग म
गाणी गात बसले सगळे सोडुन आपली कामं

पहीला राउंड होता पाळीव प्राण्यांचा
मनीला दिला चान्स पहिला गाण्याचा
मनी गायली मन लाउन म्यॅवं म्यॅवं म्यॅवं...
जज म्हणाले बंद करा हीची ट्यॅंव ट्यॅवं...
मनी खुप चिडली म्हणाली , मला माणसं म्हणतात 'मनी'
पहीला आहे 'म' बरं का? आणि दुसरा आहे 'नी'

नंतर आला कुत्रा, भाँव भाँव.. भूंSSSS....
करत लावली वरची तान
जज म्हणाले मित्रा किती गातोस रे छान..

नंतर गाढव गायलं करत हॅहूंS हॅहूंSS हॅहूंSS...
जज म्हणाले "गाढवा, हे काय गातोस तू?"
अहो.. हिंदी मध्ये मिळाला मला वरचा 'ग' आणि 'धा'
म्हणुन तर हींदी मध्ये मला सगळे म्हणतात 'गधा'

नंतर आला राऊंड जंगली प्राण्यांचा
वाघोबाचा डाव होता प्राणी खाण्याचा

पहीलं गाणं गायला आला एक जिराफ
येवढ्या वरती माईक ओढला झाला तो खराब
मग माईक न घेताच गायला आला एक हत्ती
सोंड वर करुन जोरात गायला तो कित्ती.... हॅऋंSSSS....

लाजत मुरडत मुरके घेत, होतं हरण गात
जज म्हणाले तुझ गाणं साजुक वरण भात

सिंह महाराज आले म्हणाले "दे पट्टी, चार काळी"
सगळे हसताच चिडुन त्यांनी फोडली रे डरकाळी

डरकाळी ऐकताच सगळ्या प्राण्यांनी ठोकली धुम
गाणंबीणं काहीच नाही, झाली सगळीच सामसुम.... झाली सगळीच सामसुम....

शूंSSSS..... इतना सन्नाट क्यूं है भाई?

आहे ना, आयडीया सारेगम?

-सत्यजित.

Thursday, July 16, 2009

तुझे हासणे काळजावरी....!!!!

तुझे हासणे झुले काळजावरी
जशी वार्‍यावरती झुले सावरी

नदिच्या किनारी हळुवार लाटा
तुझ्या लाजण्याच्या अलवार छटा
अन फेनफुले... माझ्या उरी....

तुला पाहता मी बेधुंद होतो
मनाच्या व्यथांचा जुई गंध होतो
झाली स्पंदने ही... फुलपाखरी...

कसे शब्दाविन गित साकारते
मनाची सितार झनकारते
कधी एकतारी... कधी बासरी...

ह्या जगण्याचे आता नवे पेच झाले
स्वन्पात जगणे... नित तेच झाले
अता मरणे नेतो हसण्यावरी

तुझे हासणे काळजावरी....!!!!

-सत्यजित.

Tuesday, July 7, 2009

मैत्री

मैत्री म्हणजे काय?
सांगता येत नाही
मैत्री कधी मैत्रीचा
पुरावा देत नाही

मैत्री मुळीच नातं नसतं
मैत्री नसते बंधन
मैत्री म्हणजे श्वास असतो
मैत्री असते स्पंदन

मैत्री राधीकेच गाणं
मैत्री सावळ्याचा पावा
मैत्री सारं सारं देउन
मिळाल्याचा दावा

मैत्री छोटं बाळ असतं
मैत्री असते पोक्त
मैत्री सुदाम्याचे पोहे
मैत्री मथुरेच तख्त

मैत्री असते सागर
मैत्री असते झरा
मैत्री असते अथांग खोल
मैत्री खळखळणारी धारा

मैत्री कधीच मरत नसते
मैत्री कधीच सरत नसते
मैत्री अमृताचे थेंब होऊन
रितेपण भरत असते

मैत्री सांगता येत नाही
मैत्री असते जाणीव
मैत्रीत मागता येत नाही
मैत्रीत नसते उणीव

मैत्री नसते स्वार्थ
मैत्री ना परमार्थ
मैत्री असते साधासरळ
जिवनाचा अर्थ

मैत्री गालावरचे
अश्रू पुसणारा हात
मैत्री आत आत खोल खोल
रुजलेली साथ

मैत्री असते घट्ट मिठी
मैत्री असते झप्पी
मैत्री थुईथूई आनंदात
गालावरची पप्पी

मैत्री असते कुणासाठी
अविरत कळकळ
मैत्री असते शब्दांवाचुन
व्यक्त होणारी तळमळ

मैत्री असते दोन श्वास
मैत्री दोन श्वासातलं अंतर
मैत्री श्वासांचाही श्वास
मैत्री श्वासांच्याही नंतर

मैत्रीवर लिहीता लिहीता
आकाश भरुन जाईल
समुद्राच्याही शाईचा
दौत रीता होईल

मित्र दुर होतात तरी
मैत्री कधीच विरत नाही
मैत्री आठवणींचा गंध
मैत्री कधीच झुरत नाही

-सत्यजित

Sunday, July 5, 2009

बडबड गित

एक मणी दोन मणी
मण्यांवरती ओवले मणी

मण्यांची झाली माळ
चिउला झालं बाळ

माळ दिली बाळाला
चोर घेउन पळाला

मग आले पोलिस
चोर लपला खोलित

खोली मध्ये नव्हतं कोणी
खोली मध्ये होती गोणी

गोणी मध्ये होतं झुरळं
चड्डी मध्ये शिरलं सरळं

चोराने झुरळाला मारलं
पोलिसांनी त्याला धरलं..

-सत्यजित

फाजिल लाड ( बालकविता )

मुर्खाचा घोडा
पायी सोन्याचा तोडा

तोडा होता जड
घोडा चालेना धड

मालकाला खटके
तो मारी त्याला फटके

सोन्याने मढविलं
चाबकाने बडविलं

काढुन घेतला तोडा
आणला नविन घोडा

तोडा होता जड
पुन्हा तिच रडरड...

-सत्यजित

चतुर कावळा (बालकविता)

एक होता कावळा
मुळीच नव्हता बावळा

कावळ्याला लागली तहान
मडके होते लहान

मडक्यात पाणी थोडे
कावळ्याने टाकले खडे

पाणी आले वरवर
कावळ्याने पिले भरभर

-सत्यजित.

Tuesday, June 23, 2009

शिवाजी महाराज की जय!!! (बालपोवाडा)

टप, टप, टप, टप चाले
घोडा शिवाजी राजांचा
शिवबांनी पार उडविला
धुव्वा रे मुघलांचा

बाळकडु स्वभिमानाचे
जिजा बाळ शिवाला पाजे
आईच्या गर्भात नसते
कुणीच कुठले राजे

स्वराज्य स्थापना करीन म्हणाला...
धरिली रायेश्वरावर रक्ताची धार
वय कोवळे ते हुंदडण्याचे
चौदा,पंधरा फार तर फार

मावळ्यांची फौज बनवली
हे वंशज प्रभू रामाचे
देश, देव अन धर्म रक्षिण्या
ठाकले उभे शिवाजी राजे

ते वाघांचे बछडे होते
अन एक सिंहाचा छावा
बलाढ्य शत्रूला नमविण्या
रचिला गनिमी कावा

रक्षण दिन दुबळ्यांचे
वर्तन माणुसकीला साजे
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
सांगती शिवाजी राजे

हर हर महादेव!!!

सत्यजित.

सांग का घडतो गुन्हा?

पाहणे माझे तुला,
सांग का घडतो गुन्हा?
खेळ ना नजरेचे असती,
निमिषी तू पुन्हा पुन्हा?

सांग मी मग काय पाहू?
काय असे नजरेस दावू?
मग अशी वळणार नाही
पाहण्या तुजला पुन्हा

मी पापण्यांना पांघरुनी
पाहणे जगास टाळले
अंतरंगी साठलेल्या
टाळु कसे कोवळ्या उन्हा?

पाहणे स्पर्षाने असते
पाहणे गंधाने असते
पाहणे पंचेद्रियांनी
छंद माझा का गुन्हा?

तेजोगोलाने न पहावे
तर चंद्र ही उरता सुना
पाहणे माझे तुला,
सांग का घडतो गुन्हा?

-सत्यजित.

पोळपाट आणि लाटणं (बालकविता)

लाटणं म्हणाल पोळपाटाला
कशास रे तुझी इतकी मिजास?
रोज रोज पोळ्या लाटुन
मीच का करावी तुला मसाज?

पोळपाट म्हणालं..
तुला लाटता यावं म्हणून
मी उपडा पडुन रहातो
पोळी नाही, तवा नाही,
मी तर जमिन पहात रहातो

लाटण्याला कळालं त्याच
चुकीचं होतं वागणं
कधीच नाही भांडत म्हणून
पोळपाट आणि लाटणं

-सत्यजित

Monday, June 22, 2009

मंत्रमुग्ध....

तुझ्या सवे घालवलेला प्रत्येक क्षण हा स्वप्ना सारखा असतो, पण म्हणुन स्वप्न थांबत नाहीत ना! तिथेही तुच असतेस सदैव.

अवेळी कधीही... अशी तुझी याद यावी
मी जगल्या स्वप्नांना... पुन्हा जाग यावी

तू नकळत माझा हात धरलास आणि लक्षात येताच... अलगद सोडवुन घेतलास हळुवार, अगदी पारिजात वेचावा ना... तसा. तू हात सोडवुन घेतलास पण तुझा स्पर्श ? तू तसाच गोंदवुन गेलीस...

माझी ती अवस्था न माझी मला कळावी
तू दिल्या पाकळ्यांची पुन्हा कळी व्हावी

माझ्या नजरेत गुंतलेली तुझी नजर... तू केसांत माळलेल्या गजर्‍या प्रमाणे हळुवार सोडवुन घेतलीस खरी....पण तुझ्या नजरेने कोरल्या कवितांच काय?

तुझे शांत डोळे मुक्या वासराचे
त्या नयनांची भाषा मला का कळावी ?

आपल्यातला हा अबोला कित्ती काही बोलतो नाही?... तुझ्याशीही आणि माझ्याशीही... माझ्या स्वगतावर तुझं असं दचकणं, मी माझ्या मनातल्या मनात केलेल्या धारिष्ट्यावरही तुझं जोवघेंण लाजणं... सारंच कसं अद्भुत... सारंच कसं अद्वैत...

आज कळे भावनांना कधी शद्ब नसतात
ह्या शब्दांनी भावनांची नुसती वकालत करावी

मग मनाच्या कोर्टात भावनांचा खटला चालू होतो. ह्रुदयाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केल जातं आणि विचारल जातं, की तू असा का वागतोस? तू असा का बहकतोस... ती येता? त्या वकिल शब्दांना आरोपी मन अबोल उत्तरं देत.. आणि हे शब्दच मग आरोपीच वकिलपत्र घेतात.. आणि अगदी तेंव्हाच एक कविता जन्म घेते...

तुझे ते इथे तिथे उगा काही बाही पहाणे
तू गुंतलेली अनंतात, मी वसंताच्या गावी

तुझ्या मनातली हुरहुर लपवण्यासाठी, तू कुठल्याश्या विचारात गुंतली आहेस असं भासवण्याची तुझी धडपड.... हातातल्या पुस्तकांवर तुझी नजर खिळलेली आणि हळुवार तुझ्या बटांना रागवणारे... तुझे प्रेमळ हात... तू डोळ्यांच्या कोनातुन माझ्या हलचाली निहाळत रहातेस, मी डोळ्यांतल्या मनातून तुला निहाळत रहातो. डोळ्यांना डोळे भिडले नाहीत तरी आपल्या नजरा सदैव जुळलेल्या...

तुझ्या पदरांवर होती, फुले फुलली गुलाबी
का वाटे माझ्या हातांची फुलपाखरे व्हावी?

तू डवरलेली जुई.... तू बहरलेला परिजात... तू अंग चोरुन बसलेली... दवओली श्रावण पहाट...
तू अशीच बसुन रहा मी असाच हरवत जाईन, तुझे हे नजरेचे खेळ.. असाच पिसा होउन पाहीन...

तू अबोला सोडत म्हणालीस... "निघुया?"

मी माझ्याशीच हसत म्हणालो, आत्ता?
मी तर कधीचाच निघालो कुठल्याश्या गावी...

अवेळी कधीही ... अशी तुझी याद यावी
मी जगल्या स्वप्नांना.. पुन्हा जाग यावी ....

-सत्यजित.

Tuesday, June 2, 2009

तुझी आठवण...

पाउस आतला
एकांती मातला
बरसती धारा
निरंतर

कोरडे भिजणे
वाळले रुजणे
फुलण्याची ओढ
अनामिक

बुद्वुदा जलाचा
अवनी तनुचा
उरतो कितीसा?
क्षणातीत

-सत्यजित.

Wednesday, May 13, 2009

चंद्रमौळी गटार

गटार...,
दिवसभर दुर्गंधी वहात वाहणारं गटार...
रात्र होताच कसलीही तक्रार न करता तेही होत निवांत, स्थिर
त्या काळ्याशार पाण्यात दिसतं
चांदण्याचं मोहक प्रतिबिंब,
अगदी तुमच्या निळ्याशार समुद्रात किंवा
नितळ गंगेच्या पाण्यात दिसणार नाही इतकं मोहक

उद्या पुन्हा हे गटार वाहु लागेल,
रात्रीची घाण धुऊन, न्हाऊन, पुसून, टापटिप निघालेली लोकं
नाकं मुरडतिल त्याला पाहुन,
अगदी तशीच जशी मला पाहुन मुरडतात
दिवसभराचा कोलाहल संपला की
मी जाउन निजतो त्याच्या शेजारी
आणि मग पुन्हा
त्याच्यात आणि माझ्यात तेच चांदण फुलतं..
उद्याच्या सुखवस्तू स्वप्नांचं...

टापटिप लोक नावं ठेवत रहातात
त्यांचा समुद्र खराब झाला म्हणुन
ह्याचं येड्यांचही माझ्या सारखंच
कुणाचं पाप कुणाच्या माथी...

मी आणि माझं चंद्रमौळी गटार

-सत्यजित.

Tuesday, April 21, 2009

पाउसपान्हा

घनन घनन घन
आला ओलाव्याचा सण
पुन्हा मोहरली धरा
तिचा येणार साजण

थेंब थेंब रानभर
थेंब थेंब अंगभर
अंग अंग ओलावलं
सरे विरहाच ज्वर

उठे आवेग तुफान
सुटे मिलनाचा गंध
कुठे रानात पानात
तुटे काचोळीचा बंध

तिच्या कण कण वाहे
त्याचा थेंब थेंब थेंब
तिच्या मायेच्या कुशीत
त्याचा रुजलेला कोंब

तिच्या माउलल्या कटी
उद्या दिसेल गं कान्हा
ती देईल त्याचे ओठी
त्याने दिलेला गं पान्हा.

-सत्यजित.

Thursday, April 2, 2009

झुंजुमुंजू

रात्र ओलावलि अन चंद्र ओलेता रहिला
सुकवताना केशसंभार मी पहाटेला पाहिला

विखुरल्या चांदण्या तिने सोनकोवळ्या उन्हात
ओल्या कुंतलातुन ओघळता पाहिला उल्काप्रपात

हळुवार गुंफले केस तिने रात्र विझवुन टाकली
ओल्या पदराआड तिच्या पहाट दवांची झाकली

ती मालवणारी रात्र होती की उमलणारी उषा?
तिचीच झुंजुमुंजू राहिली व्यापुन दाही दिशा

-सत्यजित.