Friday, August 17, 2012

विडंबन - हाची सोनियाचा मनु

प्रेरणा : आजी सोनियाचा दिनु


हाची सोनियाचा मनु
वागे श्वानापरी जणू
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे

सहाय्य मड्डमकरी
चाले तिच्या हुकमावरी
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे.. हाची सोनियाचा..

मॅडमचे मन मोही
पाठीघाले देशद्रोही
हा ही वाहीला रे .. हा ही वाहीला रे

घडता भ्रष्ट उठाठेवी
कानावर हात ठेवी
नाही राहीला रे.. नर नाही राहीला रे.. हाची सोनियाचा

असला षंड सरदारु
आत्मघाती बुच मारु
नाही पाहीला रे... नाही पाहीला रे.. हाची सोनियाचा

कृपा करी भरणाभरु
पाप रक्कमा ठेवी करु
हा ही वाहीला रे .. हा ही वाहीला रे .. हाची सोनियाचा

हाची सोनियाचा मनु
वागे श्वानापरी जणू
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे

- सत्यजित.

नभव्याकुळ

लाडानं पोसणार्‍या

मायेच्या सुरकुत्या
आता भेगा झाल्या
आणि पाऊस फक्त
उरला कवितां पुरता


पदराचा ओचा आणि
धोतराचा सोगा
असतोच मुळी साऊंडप्रूफ
नभव्याकुळ डोळे
 झालेत आता वॉटरप्रूफ


अँटी व्रिंकल्स अन
मॉईश्चराईजर्स
वापरणार्‍यांचा दावा
भेगांच काय येवढं?
क्रॅक क्रीम लावा !


तुमच्या व्रिंकल्स येवढ्या
भेगा काही खोल नाहीत
बाटली शिवाय पाण्याला
नी कुंडी शिवाय मातीला
तसंही इथे मोल नाही


कोण म्हणतो पाणी नाही?
पंधरा रुपये लिटरने
अख्खा समुद्र कसा
काय घाण करतात
ही शहरातली गटारं?


पाऊस आता फक्त
कवितेचं पीक घेतो
कधी रोमँटीक तर
कधी ओलेत्या
कल्पनांची भीक देतो.



-सत्यजित.

Friday, June 15, 2012

अनावृत्त पाऊस

ती खिडकीतुन बघता पाऊस

पाऊस काचेवर रेंगाळला

नभ गुरगुरता त्याचे वरती

पाऊस किती बरं ओशाळला



नभास दिसते नुसती खिडकी

अन दिसते ना काही

स्पर्शावे तिने थेंबास म्हणोनी

पाऊस रेंगाळत राही



कोपे नभ ओढी पाठीवर

लकलकता आसूड

लखलखली ती विजेहून

पाऊस वेडा अल्लड हूड



नभास आले कळोनी सारे

तिरक्या केल्या धारा

काचेवरुनी थेंब झटकण्या

घोंगावत ये वारा



फरफरटले ते काचेवरती

तरी न सोडला धीर

वादळात त्या उभे ठाकले

ईवलेसे प्रेम वीर



काचेवरती आर्त थाप

पण तिला कसे कळावे?

थेंबांचे न दिसती अश्रू

मग कोणी कसे पुसावे?



काय भासले तिला कळे ना

ठेवले अधर काचेवरती

गहिवरला कोसळला पाऊस

पुलकित झाली धरती



-सत्यजित.



Monday, May 28, 2012

बादल के बंद लिफाफे में

बादल के बंद लिफाफे में
कहीं उसका खत तो नहीं
पता नही लब्स गिले है या सुखे?
भेजे होंगे उसने हजार सपने और कईं ख्वाईशे 
या भेजी होगी उसने झिलमिलाती हुयी धुप
या फीर आसूंओं की गिली बारीश
लिफाफा खोलतेही गिला होना तय है
बस सोच रहा हूं के किस को साथ ले लूं
दिल को या दिमाग को?

बादल के बंद लिफाफे में
कहीं उसका खत तो नहीं...


-सत्यजित.

Monday, May 14, 2012

मै कभी बतलाता नही....

'आई', आई म्हणजे उगम, आई म्हणजे निर्माण, आई म्हणजे ओळख, आई म्हणजे संरक्षण, आई म्हणजे जिवन, आई म्हणजे अभय.


जिच्याशी जोडलेली नाळ तुटली की बाकी नाती जन्माला येतात ती आई. प्रत्येक जन्मल्याला येणर्‍याला बाय डिफॉल्ट आई ही असतेच. कुठल्याही गोष्टीचा उगम किंवा निर्माण करण्याची शक्ती म्हणजे आई.

तुमच्या साठी मी 'माझी आई' ह्या वर मी एक निबंध लिहू शकेन पण माझ्या स्वतःसाठी म्हणुन माझ्या आई बद्दल लिहायच झाल तर मात्र एक प्रबंध लिहावा लागेल. माझी आई कशी आहे, माझ्या आई माझ्यासाठी काय करते कींवा तिने माझ्यासाठी काय केलं ह्याचा विचार करणं म्हणजे फुटपट्टी ने पृथ्वीच्या व्यास मोजायला निघण्या सारखं आहे. आई बद्दल काही लिहणं म्हणजे मला बाळबोध वाटतं. तिने माझ्यासाठी काय केलं ह्याची कल्पना करण देखिल माझ्या अवाक्या बाहेरच आहे, म्हणुन मी माझ्या आईला डिस्क्राईब करुच शकत नाही. माझ्या साठी आई म्हणजेच मी आहे, ती अंनतरुपी आहे, ती ह्या चराचरात आहे, ती माझं अस्तित्व आहे आणि मी तिच अस्तित्व. मी माझ्या आईच अस्तित्व आहे ह्या विचारानेच मला शद्बात न सांगता येणारा आनंदानुभव मिळतो. 'अहं ब्राम्हास्मी' मध्ये जो आनंद आहे किंवा जी भावना आहे त्यापेक्षा कईक पटीने मला आनंद मी माझ्या आईचच अस्तित्व आहे हे म्हणण्यात आहे. आई म्हणजे मीच, तिच्या पासून वेगळा झालेला मी एक भाग. माझं ब्रम्ह म्हणजे आई, ह्या ब्राम्हाच चलत बोलतं मुर्त रूप म्हणजे आई. आई म्हणजे नुसत ब्रम्ह नाहीतर ती विष्णू देखिल आहे, माझा सांभाळ करणारी तीच आहे. ह्या संपुर्ण विश्वाच एकसंघ रुप म्हणजे माझी आई, एक चालतं बोलतं विश्वरुप म्हणजे आई.

मी लहानपणा पासुनच आईवेडा आहे, मी तिच्या भोवतीच घोटाळायचो, अगदी मोठा होई पर्यत मी कधी आई शिवाय राहीलो नाही. अजुनही तिच्या पसुन दुर रहायचा विचार केला की ते अनसिक्यूर फिलींग मला अजुनही येत. पण आता मी मोठा झालो तेव्हा ते फिलींग हे पोरकटपणाचे द्योतक आहे आणि मी पोरकट नाही असे स्वतःला समजवतो. मी "आईचा लाडका" असं माझा भाऊ म्हणतो मला नेहमी चिडवायचा (अजुनही त्याला असच वाटतं) आणि मी "आहेच मुळी' म्हटल की स्वतःच रडवेला व्हायचा आणि हे सांगायला तो आईकडे जायचा. मग आईची जी तारांबळ उडायची ते पाहुन मला वाटयच की मीच खरा आईचा लाडका आहे आणि म्हणुनच तिची तारांबळ उडते. पण आता कळतं एकच सफरचंद दोघाना हवं तेही अख्ख, वाटणी नको म्हंतल्यावर मग आईची तारांबळ उडणारच. पण तेही साध्य करण्याची किमया ही आईच जाणो.

साला, पुरूष म्हणुन जन्माला आल्याच एकच दु:ख आहे की आपल्याला आई होता येत नाही, अभागी रे अभागी. म्हणुनच स्त्री म्हणजे आई, माझी अस नाही पण कोणची ना कोणाची आई होणं स्त्रीलाच शक्य आहे. किती ते भाग्य.. तरी स्त्री जन्माला दोष देतात स्त्रीया.

पण खरा प्रॉब्लेम ईथेच आहे. स्त्री म्हणजे 'आई', मग हट्ट पुरवायला, रागवायला, मला हे असच हवं म्हणुन त्रास द्यायला आईच असते, म्हणुन मग त्याग करावा तर स्त्रीने असा आम्हा पुरषांचा बाय डिफॉल्ट समज आहे, नाही पक्की धारणाच आहे.

मला लहान मुलं आवडतात कारण त्याना फक्त आई असते, आपण जसे मोठे होतो तसे बाकी ईतर गरजांसाठी आणि अनेक इतर नाती निर्माण होतात. पण मुलांना फक्त आई असते ती असली की आणि कुणाची गरज नाही. त्यात मला मुली जास्त अवडतात असं माझ्या 'सौ'च मत आहे. म्हणजे तशा अर्थाने नाही हो... आमच्या घरातल्या पिल्लावळी मध्ये मी मुलींचे जास्त लाड करतो अस तीच मत आहे. कदाचीत खरही असेल मुली जास्त बदमाश असतात, मुलं नुसती खोडकर आणि मस्तीखोर एकंदरीत, मुली लाघवी आणि मस्का मारु असतात. आपले लाड कसे करुन घ्यायचे हे मुलींना जस्त माहीत असतं, मुलं त्या मानाने साळसूद असतात. पण विचार करता मुली ह्या उद्याच्या "आई" असतात आणि उद्या त्यांना बरच सोसायच आहे, हट्ट करण्याच त्यांच हेच वय आहे, उद्या हट्ट पुरवण्याची जबाबदारी आपसुक त्याच्यावर येणार आहे. कदाचित म्हणुनच त्यांचे जास्त लाड करावेसे वाटत असतिल. उद्या लाड पुरवतो म्हटलं तरी, उद्या एका 'आई'चे हट्ट मी काय पुरवणार, बापरे तेवढ सामर्थ्य नाही रे आपल्यात. म्हणुन ह्या सर्व आयांचे हट्ट आताच पुरवायला हवेत. माझा एक हट्ट असतो त्यांच्या कडे की मनाने आणि शरीराने आत्ताच सक्षम आणि बलवान व्हा... माझा हा एक हट्ट पुरवा, मी तुमचे सगळे हट्ट पुरवायला तयार आहे.

मी हिटलरच्या एका गोष्टीचा प्रचंड चाहता आहे, त्यानी म्हणे रुल काढला होत की प्रत्येक तरूणीने एक वर्ष शेतात राबायला हवं. का तर त्या मुळे त्या सुदृढ होतीत आणि पण येणारी पिढी सुदृढ होईल.

'आई' ह्या शब्दाचा खरा अर्थ कळालेला येवढा देशवेडा आणि येवढा द्रष्टा राजकारणी कसा काय येवढा कूप्रसिद्धीस गेला हे कोडंच आहे. (त्याला कदाचीत जाणुनबुजुन कूप्रसिद्ध केलं असवा असा मला दाट संशय आहे)

बघा मी म्हंटल होत ना आई म्हणजे विश्वरुप आहे काय आणि किती लिहाव...

कीती काही लिहण्या सारख आहे, धरती, माती, नद्या ह्यांना आपण आई का संबोधतो? लागलं, पडलो की 'आई ग्ग' का म्हणतो? अजुन काय नी काय नी किती लिहावं...

आई म्हंटल की हळवं होता येतं पण बाबा म्हंटल की नाही होता येत असं का?.. आई म्हणजे धरती आणि बाबा म्हणजे आभाळ...

हॅप्पी मदर्स डे.. मातृदिनाच्या शुभेच्छा... हे ईग्रजी डें ना देखिल महत्व आहे. आज पहील्यांदाच मी मदर्स डे म्हणुन काही लिखाण केलं आहे. आईशी तर रोजच बोलतो आणि आई बद्दल काय वाटतं हे सांगायला मदर्स डे हवा कशाला..,? मी नाही विश केलं आईला, ना ग्रिटींग... हे लिहील आहे तुमच्यासाठी...

प्रसून जोशी ने काय पर्फेक्ट लिहीलं आहे ना?..

मै कभी बतलाता नही...
कितना प्यार तुझसे करता हूं मै मां..... तुझे सब है पता... है ना... मेरी माँ...

Tuesday, March 27, 2012

मै हूं जुग-जुग जुग-जुग जुगनू - सैल वेणीतल्या स्वैर त्रिवेण्या

सैल वेणीतल्या स्वैर त्रिवेण्या...

खिडकीच्या बारांवर दवबिंदूंच्या ओळी
किरणांनी गाठले पहाटेच्या वेळी
मला वाटलं काजवे थिजलेत...

==================================

आभाळभर लूकलूकते पसरले तारे
तारे नाहीत ते काजवेच सारे
काळ्या चिकट कागदाला रात्र समजले असतिल..

==================================

प्रभांगणी तारे
अंगणी प्राजक्त
मध्ये प्रचंड पो़कळी, आपला गंध आपल्या पाशी..

==================================

काही काजवे मुठीत धरावेत
काही भोकाच्या पेटीत बंद करावेत
तरी पहाट ती येणारच...

==================================

एक कोसळता तारा
इच्छा: वाचव रे त्याला
आणि काजवा उडू लागला...

==================================

सूर्य वाहतो तमाच्या पखाली
निशेचा मोर्चा, काजव्यांच्या मशाली
चंद्राने म्हणे बंद पुकारलाय...

==================================

काजव्यांची रात्र
चांदण्यांची रात्र
अवसेचा झगमगाट...

==================================

जुगनू म्हणजे काजवा ना रे?
काजवा म्हणजेच जुगनू
पण मला जुगनूच आवडतं....

==================================

-सत्यजित.

Wednesday, March 14, 2012

कागदाची चिता

माझी पत्र अजुन का
ठेवली असशील जपून
तुझा चेहरा बोलका होता
कुठवर ठेवशील लपून

कगदाचं काय येवढं
आठवणींच लख्तरं होईल
शाई उडुन जाता जाता
तिच देखिल अत्तर होईल

जर ठेवायची असतील जपुन
तर उत्तरांची तयारी कर
माझ्या पर्यंत प्रश्न पोहचतील
येवढं आत्ताच गृहीत धर

बघ त्या पत्रांतून मला
वगळता येतं का?
त्या पत्रांची चिता रचून
मला जाळता येतं का?

तुझ्या हातानी पाणी नाही
पण अग्नी तरी मिळेल
प्रत्येक पत्र जळताना
तुझे अशृ पाहून उजळेल.

-सत्यजित.

Saturday, March 10, 2012

वाद्यवृंद - बालकविता Audio स्वरुपात :)

वाद्यवृंद - विविधतेत एकता म्हणजेच Unity in Diversity

पेटी म्हणते सा रे ग
तबला म्हणतो धाक धिक ध
शिळ घाले बासुरी अन
ढोल म्हणतो धडाम ध

धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंना धिना

गिटार म्हणतं डिंग डींग डिंग
मेंडॉलीनची टींग टींग टींग
वायोलिन करे कूईं-कूईं कुई-कुई
तान घेते सतार गं

टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन
टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन

पैंजण करती छन छन छन
टाळ करती खण खण खण
घुंगरांची रुणझूण चाले
ताशा वाजे ढडाम ढं

ढींकचिका ढींकचिका ढींकचिका ढींकचिका
ए.. ए.. ए... ए.. ए.. ए.. ए... ए..

ट्रंपेट काढतो रे भोंगा
सेक्साफोनचा रे दंगा
शेहनाई ती सुरात गाते
नादस्वरम करे पॅप्याप प
पॅपॅप प्यां पॅपॅप प्या पॅपॅप प्या पॅपॅप प्या..
पॅपॅप प्यां पॅपॅप प्या पॅपॅप प्या पॅपॅप प्या..

ना एक सारखे जरी दिसती
ना एक सारखे स्वर देती
सुरां मध्ये सुर गुंफता
करती मग ते कंमाल रं
ढीपाडी डिपांग, डिचीपाडी डिपांग,
हेढीपाडी, डिचीपाडी, डिपांग कु...डु....

एक होऊनी गाऊया
धुंद होऊनी नाचूया
गोंगाट मस्ती कल्ला दंगा
चला करुया धामल हो

हम मैं है हीरो (2)
हम मैं हैं हीरो .. ओ ओ ओ ओ ...
हम हीं हैं हीरो.... आम्ही तर हीरो....

-सात्यजित

हे गाणं वाचण्यापेक्षा ऐकण्यात जास्त धमाल येईल. हे गाणं इथे ऐकता येईल


किंवा ईथे क्लिक करा

मी काही गायक नाही, तेंव्हा एका दमात गाणं म्हणताना माझी बरीच दमछाक झाली. मी प्रथमच ध्वनीरूपात सादर करतोय, त्यामुळे चुकांबद्द्ल क्षमस्व.

बच्चापार्टी तुम्हाला. हे गाणं कसं वाटल नक्की कळवा...

Monday, March 5, 2012

अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा...

थांबा बसू नका
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बाबा पाय दुखले
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

थांब उचलून घेतो हं,
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बाबा चला ना...
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बसलात काय?
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

दोघांना उचलून नाही हां जमणार..
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा...

-सत्यजित.

Sunday, February 5, 2012

फुले कागदी दरवळती

तू माळल्या गजर्‍यातल्या
दोन कळ्या सांडल्या
मी द्याव्या तुला म्हंटल तर
त्याही खुळ्या भांडल्या

प्लिज नको ना देऊस
आम्हा तिथे मोल नाही
पण तुम्ही फुलाल इथे
तितकी इथे ओल नाही

हिरमुसल्या बिचार्‍या
मग मलाही मन मोडवेना
निष्पर्ण वहीच्या पानात फुललं
मलाही फूल तोडवेना

जुन्या वहीच्या पानात
अजुनही गंध दरवळतो
घमघमता वेणीतला गजरा
निष्पर्ण वहीवर जळफळतो

ह्या वहीच्या पानांची
सुंदर फुले करीन म्हणतो
"कागदी फुलं गंधहीन"
सांगा असं कोण म्हणतो?

-सत्यजित.

डाव रडीचा

तू माझा एक प्यादी मारलास
मी रडलो चिडलो डाव उधळून दिला
तू तो डाव तसाच लावलास,
माझी खेळी खेळलास, डाव जिंकून दिलास...

Big cheater you are...

Sunday, January 29, 2012

Ifs 'n Buts

अयुष्यात जर-तर,
असायला नको खरतर
जर नसता, तर नसता
सुख असतं खरोखर

जर असं झालं
तर असं होईल
जर तसं झालं
तर कसं होईल?

जर असं झालं तर?
काढुन ठेवा विमा
जर लॉटरी लागली तर?
सुखाला ना सीमा

देवा देवा असं कर
देवा देवा तसं कर
देवा केलस असं तर
देवा केलस तसं तर

जर-तरनी तर
वाट लावलिय पूरी
आजच्या जगण्याला
उद्याची सुरी

एक जर सुखाचा
शंभर तर दु:खाचे
एक जर मौलाचा
शंभर तर फुकाचे

-सत्यजित.

Saturday, November 26, 2011

तुझे नी माझे नाते अनामिक

मायबोलीच्या २०११ च्या दिवाळी अंकाचा विषय होता, "नाते संबंध" आणि मित्रांच्या आग्रहा खातर काही तरी सुचतय का बघु म्हणून आचानक एक नातं मनात आलं.
नातं जे सर्वात पवित्र तरीही खुप नाजुक, जे अनेकांना कळालच नाही, अगदी संत महंत देखिल हे नातं समजवून सांगताना भरकटलेले दिसले. असं हे नातं म्हणजे मैत्रीच, नुसतं मैत्रीच नाही तर स्त्री आणि पुरुष यांच्यातिल मैत्रीच. काही करंटे तर असंही म्हणतात की स्त्री आणि पुरुषात निखळ मैत्री असुच शकत नाही. असं म्हणणार्‍याच्या लक्षातही येत नाही की तेही ह्याच नात्याची नकळत पुजा करतात. ह्याच मैत्रीच्या प्रतिक म्हणजेच "राधा-कृष्णा". आधी राधा मग कृष्ण...जे नातं मंदिरात पुजलं जातं ते निखळ आणि पवित्र असल्या शिवाय का?

कृष्ण समजायला जेवढा कठीण तेवढंच हे नातं सुद्धा. श्री कृष्णाच्या म्हणे सोळा सहस्त्र बायका होत्या पण देवळात मात्र हा राधे सोबत. काही लोक राधेला श्री कृष्णाची पत्नी मानतात (हींदी विकी वर कुणा महाभागाने ते तसं लिहील आहे) तर काही म्हणतात की ती त्याची प्रेयसी होती. राधा ही एक विवाहीत स्त्री होती आणि कान्हा हा तिच्या पेक्षा वयाने खुप लहान होता. ती कृष्णाची ना प्रेयसी होती ना पत्नी होती, ती होती त्याची प्राण प्रिय मैत्रीण, जिवश्य कंठश्य सखी.

स्त्री-पुरुषातली ही निखळ मैत्री काही लोकांना कळत नाही, कारण त्यांनी अयुष्यात निखळ मैत्री कधी केलीच नाही, आणि मैत्री केली नाही म्हणजेच त्यांनी कधी निस्सीम प्रेमही केलं नाही.

राधा-कृष्णतल नातं म्हणजे निखळ मैत्रीच नातं, एकमेकां वरील प्रेमाचं नातं, एकमेकां वरील विश्वासाच नातं, एकमेकां वरच्या भक्तीच नातं, जितकं जवळच असुन तितकच अंतर ठेवणारं हे नातं... हे नातं जितकं सोप तितकच अवघड.
मी जेंव्हा जेंव्हा राधेकृष्णाच्या नात्याला प्रियकर आणि प्रेयसीचं रुप दिलेल पाहतो तेंव्हा तेंव्हा मला ओरडुन सांगावस वाटतं की ह्या नात्याच्या असा अपमान करु नका, कृष्ण-राधेला असं कलंकीत करु नका. "मैत्री" अलौकीक आहे, मैत्री अनमोल आहे, पवित्र आहे, त्याचा असा विपर्यास करू नका...

कविता पुर्ण झाली... नावही दिलं आणि माझंच माझ्या लक्षात आलं की मैत्रीच नातंच मुळी अनामिक असतं. हे पाण्या सारखं असतं, कुठल्याही नात्याच रुप घेणारं, कुठला ही आकार घेणारं, सगळ्यांना आपल्यात सामावुन घेणारं. जेंव्हा पाणी वाहत तेंव्हा ती असते "धारा" आणि ते जेंव्हा स्थिर होतं तेंव्हा ती होते "राधा", स्थिर आणि अचल, मैत्री सारखी. आपलीच कविता आपल्याच विचारांना नव रुप देउन जाते, राधा होऊन जाते...
 राधेच हे मनोगत, माझ्या मैत्रीच मनोगत आहे...

पुसते जग हे मला
नाते अपुले कोणते
न बोलले कुणी जरी
प्रश्न नयनी जाणते

ओढ लागते मना
ऐकू येता पावरी
श्वास हे दुणावती
नजर होई बावरी

तुझाच रंग घेऊनी
कुणी आभाळ रंगले
तू तमास स्पर्शता
नभ चांदण्यांनी शिंपले

आसमंती तूच रे
आत्मछंदी तूच रे
अंतरंगी तूच रे
मर्मबंधी तूच रे

गोपिकांचे प्रेम हे
श्याम रास खेळतो
आर्जवास राधेच्या
चक्रधारी भाळतो

ऐकू येते स्पंदनी
साद घालती वेणू
मी अशी गं नाचते
न पाहते कुणी जणू

नाते हे निष्पाप रे
का कुणी न जाणते?
ह्या जगाच्या नीतीला
नाव द्यावे कोणते?

नाव देता नात्याला
बंधनात बंधते
नाते अनामिक हे
नात्यांची वेस लांघते

- सत्यजित.

जरुर वाचा मायबोली दिवाळी अंक : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2011/index.html

Saturday, September 10, 2011

एक रसग्रहण - भय इथले संपत नाही

मला ही कविता म्हणजे एक विरह गीत जाणवते...त्यात वेडं प्रेम जाणवतं. इतर रसग्रहणात गॅप आहेत .. बर्‍याचदा एक कडवं/ओळ आणि त्या नंतरच्या कडव्यात/ओळीत कवि ट्रॅक चेंज करतो असं लिहीलं आहे. पण ही एक कविता आहे, गझल नाही. कविता स्फुरताना असं होत नाही. कविता पहील्या ओळी पासुन शेवटच्या ओळी पर्यंत एक विचार उलघडत जाते.. त्यात भावनेचा ओघ असतो, त्या प्रत्येक कडव्यात प्रत्येक ओळीत भावनेची गुंफण असते. एका ओळी मागे किती मोठी कहाणी असते हे कवीच सांगु शकतो. प्रचंड एकवटलेल्या भावनांनी एक ओळ स्फुरते, ती तुमच्या पर्यंत पोहचली तर ठीक, नाहीतर ती निर्बोध होते. अशा एकवटलेल्या भावना उलगडुन सांगणं कवीला जड जातं, जे म्हणायच आहे ते पुर्ण एकाच वेळी सांगता येईल हे सांगता येणे अवघड. आणि येवढं उलगडुन सांगायचं होत तर मग कविता कशाला लिहीली असती? स्मित
कवि जे लिहितो ते त्याच्या अनुभवातुन, ती त्याची अनुभुती ती वाचकाच्या अनुभवाशी जुळेल का? आणि नाही जुळली तर तिची गोडी कमी होईल. जसं "गोड आवडतं" म्हंटल की तुम्हाला साखर सुचेल, कुणाला बासुंदी, तर कुणाला जिलेबी, इथे सगळेच गोड आवडणारे एकमत होतात, तरी प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या, पण "जिलेबी हे गोड आवडत" म्हटल की बाकी तुटले. म्हणुन कविने कविता उलगडुन सांगु नये म्हणतात ते ह्याच साठी.. मग ती काहीं साठी निर्बोध ठरते तर काहीं साठी अर्थपुर्ण पण मग तित अनुभुती नाही. ती कविता वाचणार्‍याची होत नाही ती कविचीच रहाते. जी ओळ अनुभुती देते ती कविता आणि जे अर्थ स्पष्ट करते ते गद्य... अस मला वाटतं. पण ज्यांना अनुभुती मिळत नाही आणि जेंव्हा इतर शहाणे त्यांना हेटाळतात तेंव्हा लोक कविते पासुन दुर जातात. म्हणुनच बरेच लोक मला कवितेतल काही कळत नाही, कविता माझा प्रांत नाही, म्हणत कविते पासुन दुर जातात, अशा साठी कविता दुसर्‍यांनी उलगडुन सांगण गरजेच असत. किंवा कविने हिंट देणं गरजेचं आहे. पण जो तो आपल्या अनुभवाने समृद्ध असतो, माझा अनुभव तुम्हाला द्यावा कसा? त्यात अध्यात्म हे असं आहे की ते सगळी कडे फिट होतं, पण अध्यात्म सगळ्यांन झेपत नाही आणि रुचतही नाही. आकाशा कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म जमिनी कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म.. जो देवाशी एकरुप झाला त्याला चोहीकडे तोच दिसतो. पण तो आम्हाला कसा दिसावा? .. तसंच कवितेच.. पण तरी काही ठिकाणी उलगडुन सांगणं गरजेच.. आपला आनंद शेअर करावा.. स्मित तोच मीही करतो आहे..

ही ग्रेसची कविता एका प्रियकराच मनोगत आहे... हे एक विरह गीत आहे. ज्यांना काहीच अनुभुती मिळाली नाही त्यांच्या साठी मी माझी अनुभुती प्रकट करण्याचा प्रयत्न करतो, कदाचीत इतर कविता वाचताना त्यांना अनुभुती कशी घ्यावी हे कळेल... स्मित

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

किती काळ लोटून गेला, किती वर्ष उलटुन गेली तरी तुझी आठवण आली की श्वासांचा वेग वाढतो, काळिज धडधडु लागत. माझ्या मनातल कुणाला कळेल का याची भीती वाटू लागते. ते क्षण डोळ्या समोर तसेच उभे रहातात. अजुन किती वर्ष मी हे ओझं घेउन जगायचं? आणि तू आताही समोर आलीस तर... छे.. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते.

किती संध्याकाळी आपण एकत्र घालवल्या. दिवस रेटारेटीत निघुन जातो पण सांज उतरलीकी त्या सार्‍या आठवणी सध्याकाळी एकवटतात. प्रेमाच खरा अर्थ तुच तर मला शिकवलास, तु नेहमी म्हणायचीस, प्रेम हे बंदीशी सारख आहे, एकदा का ती बंदिश आपण आळवू लागलो की मग कुणाच भान रहात नाही. गात रहावं आणि भान विसरुन एकरुप व्हाव. जे आळवलं ते प्रेम कसलं, जे एकरुप होऊन आळवलं जातं तेच प्रेम.. तेच तुझे शब्द मनात रेंगाळत रहातात एखाद्या बंदीशी प्रमाणे. मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

हा चंद्र म्हणजे तुच ना.. हे चांदण तुझा झरा होउन वाहतं आहे आणि हे तुझ्या जाणिवांचं स्नान मला घालतं आहे. ही माझ्या आजुबाजूची धरती, हे जग ही सारी माया आहे. तू सत्य आहेस, तू शास्वत आहेस... माझं जगण ही जगणं नसुन एक विरक्ती आहे. तू माझं सर्वस्व आहेस ....हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया

तुला आठवतंय किती तास झाडा खाली हातात हात गुंतवुन बसायचो, किती स्वप्न रंगावायचो. कधी मी तुझ्या मांडीवर डोकं ठेउन निजायचो तर कधी तू माझ्या, कधी डोळे मिटले जायचे, कधी मिठी विरघळायची, कधी अधरांना अधर मिळायचे..मग जाणवायची ती फक्त स्पंदन... मग तिही एकरुप होत विरघळून जायची. जगाच भान आणि स्वत:ची जाणिवच नाहीशी व्हायची, जशी योग्याची योग निद्राच.. असा किती वेळ निघुन जायचा कुणास ठाऊक पण भानावर येताच.. हाताच्या मुठी पुन्हा घट्ट व्हायच्या... विलगण्या साठी. उद्या पुन्हा इथेच भेटायचं वचन देत आपण पुन्हा मिठीत विरघळुन जायचो, नुसतं शरिराने वेगळं व्हायला.. झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

किती भोळे होतो आपण, सारी स्वप्नं खरी होतील असं वाटायच ना आपल्याला. हे जग आहे, त्याच्या प्रथा आहेत, त्या प्रथांची कुंपणं आहेत ह्याची जाणिवच नव्हती... ते क्षण नाजुक होते खरे पण ते नाजुक का ते आत्ता कळत आहे, लोकं नाजुक वय का म्हणायचे तेही आत्ता कळतय, त्या नाजुक वयातिल घाव खोल होतात हेच खरं.. . मन अस वार्‍या सारखं सैरभैर किंवा वार्‍या पेक्षाही चंचल की वार्‍यचीही खोडी काढुन पळुन जाता येईल इतकं चंचल, पण तितकच भोळं.. त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती

तारूण्यांचा जोश असा की क्षितीजं ही पदाक्रांत कराता येतिल असा विश्वास, आणि त्यातच हे वेडं वय प्रेमाची जाणिव घेउन येत. भरतीच पाणी जसं किनारे व्यापत खोलवर शिरतं तसच हे प्रेम तारुण्याच्या दारावर भरती होऊन येत आणि अयुष्य व्यापुन जातं.. क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

"माझं तुझ्यावर प्रेम आहे..." येवढ हे हळवं वाक्य सारं अयुष्य व्यापुन गेलं. "जे कधीच संपणार नाही, जे कधीच सरणार नाही अस आपलं प्रेम..सार्‍या जगाशी भांडुन, कुणाची पर्वा न करता मी तुझा/तुझी होईन" हे वचन त्या चार शब्दात होत. आता सारं सारं तू होतिस, श्वासातिल वारं तू होतिस....तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला

पण तेंव्हा समाजची भीती होती, रुढी आड येणार ह्याची कुठे ना कुठे जाणिव होतिच. परिस्थिती मुळे प्रभुरामा पासुन विलगलेल्या सितेला प्रभूरामांचा शेला हा विश्वास देत होता की , "राम येणार, सार्‍या विपदा पार करुन येणार, समुद्र लांधुन येणार, सार्‍या अडचणींवर मात करत येणार.. फक्त माझ्या साठी, आमच्या प्रेमासाठी.. राम येणार... याच विश्वासाने प्रभुरामाचा शेला तिने पांघरुन घेतला असेल, त्यात रामाच्या प्रेमाची उब तिला मिळाली असेल.. तसेच तुझे शब्द ... सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

जसं भाविकांस देवाच दर्शन होण्या पुर्वी देऊळ दिसत असतं, तेच त्याच ध्येय असतं. त्याला विश्वास असतो की देउळ गाठलं की देव हा भेटणारच. तस प्रत्येक प्रेम करणार्‍याच लग्न हे ध्येय असतं एक मंदिर असतं जेथे प्रेमाची पुर्ती होणार असते. ह्या मंदिराची वाट किती खडतर असली तरी एकमेकांच्या साथीने मंदिर गाठुच येवढा दृढ निश्चय होता पण आपण मंदिर गाठण्या पुर्वीच खांब फोडुन आलेल्या दानवाला तू देव समजुन बसलिस तो नृसिंह नाही गं, तो तुझा देव नाही तु जेथे जातेस ते तुझे देऊळ नाही.... देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब

तुझ्या ओंझळीत जे आहे तो देव नाही हे तुला ही माहीत आहे, तुझे कावरेबावरे डोळे, आक्रोश करते अश्रू मला सांगत आहेत की तू माझी आहेस आणि मी तुझा... हा आक्रोश, हा आवेग, हे तुफान परिस्थिती पुढे इतक हतबल झालं आहे की मी तुझ्या पापणी वरला एक उरला सुरला थेंब होउन राहीलो आहे. एकदा का तो पापणीवरुन घरंगळला की त्याचं त्या डोळ्यांशी काही नातं नाही, तो उरतो फक्त पाणी होऊन.. थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

तू नाहीस... तू माझी नाहीस म्हणजे मीही नाही. मला अस्थित्वच नाही. झाडापासुन विलगलेलं फुल, पाण्या पासुन विलगलेलं कमळ आता फक्त देवावर वाहण्या पुरतं उरतं आणि मग निर्माल्य होतं, मी तर संध्येच्या पुजेतल कमळ त्याच निर्माल्य होण्यास आता कितीसा वेळ, तरीही मी शृंगार केला आहे कुणाच्या चरणी वाहण्यासाठी... संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने

काय करणार? जगावं तर लागलच, मी ही लग्नाच्या बेडित अडकलो, मीही कुणाचा झालो.. पण फक्त देहाने.. मी मनाने तुझा होतो आणि तुझाच आहे. हे भोग, हा आनंद फक्त देहा पुरता, ह्या जाणिवा ही फक्त देहा पुरत्याच... देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

लग्न झालं, मुल झाली, संसार सुखात आहे.. पण ही पंचेंद्रीये आजुन तुझ्या जाणिवा कुरवाळत आहेत, तुझा स्पर्श, तुझा गंध, तुझ रुप, तुझ्या अधरांची चव, तुझा आवाज अजुनही ह्या इंद्रीयांत तसाच जिवंत आहे. छान गाणं संपल तरी मन ते गुणगुणत रहातं तशी माझी इंद्रिय तुझी संवेदना गुणगुणत आहेत तरीही दु:ख आहेच... स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे

मी काही केल्या तुला विसरु शकत नाही... हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

माझी कर्तव्यं मी पार पाडली आहेत, आता वाटतंय की पुरे झालं हे आता जिवन. पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तुझं होऊन जावं. बस झालं ना.. आता लवकर लवकर हे अयुष्य संपू दे, पुढल्या जन्मी मी तुझा होईन, तु माझी होशील.. हे खरच होईल? का कुणास ठाउक, सारं धुसर आहे.. पण मला परातायची घाई लागली आहे मला विश्वास आहे तू मला भेटशील, हे अवेळी असेल कदाचीत.. पण मला परतु दे..
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई

हे जिवन हे एक जंगल आहे, भरपुर झाडं आहेत इथे, पण तुझ्याविना ती सारी निष्पर्ण आहेत. तू नाही तर वंसत नाही फक्त आहे ती पानझड... मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

पुढल्या जन्मी आपण पुन्हा एकमेंकांचे होऊ कधीच न विलगण्या साठी..

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

-- ग्रेस

अपनी अनुभुती अपने पास.. नंथींग व्रॉंग इन इट.. हॅप्पी कविता रिडींग..!!!

खर तर ग्रेस यांच्या कवितेत 'आई' न शोधता सापडते ह्याही कवितेच तसच...  तरी मला जे सुचल ते लिहीलं

-सत्यजित.

Sunday, July 31, 2011

हॅप्पी गटारी....थर्रा देशी, आला बाबा... (विडंबन)

सलिल आणि संदिपची माफी मागुन.. दुर देशी गेला बाबा....

यू ट्युब मधील ह्या गाण्याच्या विडीओ मध्ये सलिल म्हणतो...
"अशीच एक गोष्ट आहे जी आपल्याला कळत नाही पण लहान मुलांना जाणवते."
अशीच बापाची व्यथा कळलेल्या मुलाचे मनोदय सांगणारं, मन पिळवटुन टकणार हे विडंबन आहे. हॅप्पी गटारी....!!!

थर्रा देशी, आला बाबा, घेई फैलावर आई
अख्खी बाटली पोटात, तरी घरी आला बाई

असा चकणा बेचव कसाबसा पचवला
बार भिंतीत बसुन अख्खा खंबा रिचवला
"आता पुरे रे बेवड्या" कुणी म्हणतच नाही

कशासाठी कोण जाणे देती ड्राय डेला सुट्टी ?
कोणी ढोसायाला नाही…कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
ग्लास ठेवले मांडून … परि बाटलीच नाही

दिसे खिडकीमधुन बार सारे, दिशा दाही
बार उघडले तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी – मुठीमध्ये नोट नाही

अख्खी बाटली पोटात, तरी घरी आला बाई....

आज घरोघरी गटारी झाली.. घरोघरी श्रावणाचे आगमन जोरात झाले.. आता एक महिना मन मारुन श्रावण पाळणार्‍यांना समर्पित.

-सत्यजित.

Friday, July 8, 2011

ग्लोबल वॉर्मींग ड्रावं-ड्रांव... ड्रूक... ( बालकविता )

एक बेडु़क होता करत ड्रांव ड्रावं
"बेडुक दादा असं काय करताय रावं?"

'पाऊस नाही आला, आलाय मला राग
जरा गाऊन बघतो, मी मेघ-मल्हार राग'

"अरे बेडुक दादा, असा चिडुन नको गाऊस
नाहीतर येणार नाही, कधीच पाऊस"

'ढग नाही, वारा नाही, पाऊस पडत नाही
तुमच्या घरी नळ आहे तुमच अडत नाही'

'अरे..
बघ जरा टीव्ही लाऊन, काही बातमी देतात काय?
मासा काल म्हणत होता ग्लोबल वॉर्मींग हाय'

'ग्लोबल वॉर्मींग, ग्लोबल वॉर्मींग....ग्लोबल वॉर्मींग
आता हे आणि काय?'
"अरे दादा, आभाळातला एसी बंद पडला हाय"

"म्हणुन बाबांनी नवा बसवुन घेतलाय एसी"
'पुन्हा तुम्ही तुमचं बघा, आमची ऐशी-तैशी'

"मग काय करू? सांगतो, एसी लाऊ नका"
' नको, आम्ही प्राणि कुणा त्रास देतो का?"

'येवढच एक निरोप जाउन बाबांना तू सांग
सगळ्या प्राण्यांची, आमची येवढीच आहे मांग

तळ्या मधे, नदी मधे टाकू नका कचरा
सगळ्या सांड पाण्याचा नीट करा निचरा

प्लास्टीकच्या पिशव्या तुम्ही वापरु नका
उघड्यावरती कचरा कधीच टाकू नका'

"आत्ताच जाउन सांगतो तुझा निरोप
पण बेडुक दादा तू रागावू नकोस"

पुन्हा बेडु़क करू लागला ड्रांव.. ड्रावं...
"आता काय झालं? असं काय करताय रावं?"

"अरे,खुप आनंद झाला म्हणुन गातो आहे गाणं
वेड्या सारखे वागतात मोठे, एक बाळ शहाणं'
आहे एक बाळ शहाणं...
निरोप सांगणार ना रे बाळांन्नो..? :) '

ड्रांव, ड्रावं, ड्रांव ड्रावं-ड्रांव ड्रावं-ड्रांव... ड्रूक..
ड्रांव, ड्रावं, ड्रांव ड्रावं-ड्रांव ड्रावं-ड्रांव... ड्रूक...

-सत्यजित.

Tuesday, July 5, 2011

आधारवड

कितीदा तपासुन पाहीली होती फांदी
या वेळी अख्ख झाडच उन्मळून पडलं आहे
गेल्या खेपेस वादळ तरी होत...
आता मात्र.. मी निरखून घेणार आहे
झाड, त्याची मुळं, त्याची फांदी
आजुबाजूची जमिन,
गेल्या दहा वर्षाचे हवामानाचे आराखडे
पण मग सहाशे फुट खोल पाण्याचा साठा?
शेवटी काय अजुन एक कारण राहुन जाईलच
There is nothing called stability,
it is just ability to survive.
एका पायावर तोल सांभाळायचा म्हंटलं
की दोन पायांवरही अस्थिर वाटायला लागतं

-सत्यजित.

Thursday, June 30, 2011

काळ देहासी आला खाऊ

कधी तरी बोलावं आपणच आपल्याशी
कधी तरी एक संवाद साधावा आतल्याशी

तेच व्याप, तेच शाप
तेच पुण्य, तेच पाप
माझ्याच विचारांना मीच होतो पारखा
खरच जगतो का मी आतल्या सारखा?
किती वेळा रेटत जातो मी उगाच आपला मुद्दा
माझ्याच विचारांचा माझ्याच पाठीत गुद्दा

निजताना असते स्वप्नांची भीती
जागताना स्वप्ने तुटण्याची भीती
भीती...? नुसती भीती नाही..
दबक्या पावलांच्या वाटांनी गाठता येणारे
महाल रचलेत मी...
या वाटेत लागतात काही उन्मळूंन पडलेले आधारवड
तर काही घट्ट पारंब्या रोवून उभे असलेले स्थितप्रज्ञ
त्यावरिल चिमण्यांची कधी किलबिल, तर कधी आक्रोश

आधारवड, किलबिल, आक्रोश, चिमण्या... सारे मी ठरवलेले : स्मित :
माझं घेणं ना देणं त्या चिमण्यांशी ना आधारवडांशी
मला हवाय म्हणून, मी केलेला आक्रोश
मला हवाय म्हणून, मी केलेली किलबिल

आता त्याच्याशी संवाद होत नाही, वाद होत जातात
तरिही अजुन एक दिवस काळ आणून ठेवतो हातात
म्हणतो... बघ जमलं तर अजून एक दिवस प्रयत्न कर
"अरे.. काळ आहे मी
प्राण घेतो, तुझ्या सारख्या मृतात्म्यांच काय करू मी?
मला साद हवी आहे तुझी, प्राण नको"
मी हसतो... "आज टळला ना, उद्या पाहू" म्हणतो...

-सत्यजित

Thursday, June 9, 2011

पाऊसमय कोकणसय

माझ्या कोकणची माती
जशी अत्तराची खाण
नभरस कोसळता
देते सुगंधाचं वाण

आला मेघराज नभी
धरा कुंकवाची डबी
हिरवं सोनं लेउनिया
दिसे नववधू छबी

गोड लागतो खायला
ऐन उन्हाचा व्यायला
बाळंतपण लेकीचं
लागे काळजी आयेला

आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
उफाळल्या दर्यासंगे
डोलू लागतील माड

हरवता पायवाटा
गावे तेरडा टाकळा
नाही कुणाचंच भय
रवळनाथाचा हा मळा

घेता पागोळ्या ओच्यात
त्यात मिळे पारिजात
मळा मेंदीभरले हात
त्यात तरारेल भात

नभं थेंबानी चुंबता
लाज लाजली लाजाळू
तिला छेडते आबोली
किती किती गं मायाळू

बघ सरेल श्रावण
मग येईल भादवा
माहेरवाशी गौवरया
बाळा गातील जोजवा

माझ्या मायेच्या डोळ्यात
कसा वाहू लागे झरा
असा पाउस पाउस
येतो कोकणच्या घरा...

-सत्यजित.

Saturday, June 4, 2011

संधीसाधू पाऊस

एक ओली छत्री,
बस मध्ये चढली
तशीच ओली निथळती
सीट वरती दुमडली
खिडकी बाहेर, दारावर
काचांवरल्या धारांवर
धावत्या तरुंच्या पारांवर
खाबांवरल्या तारांवर...
इथे तिथे पसरलेल्या नजरा
आल्या होत्या भानावर

सारे पारधी साव़ज झाले...
निवांत बसले सावध झाले
इतके सावध की...
कुणी सांगुन खिसा कापावा इतके बेसा­वध

पुढच्या माना अचानक
करु लागतात व्यायाम
किमान दोनशे अंशात फिरली नाही
तर मानेच काय काम?

मागचे पुढे, पुढचे मागे
एक ओझरती झलक... आणि उगाच त्रागे..

हा पाऊस काही पहीला नव्हता
तरी इतका मोहक पाहीला नव्हता
बावर्‍या सावळ्या नभांवर
ओघळताना पाहिला नव्हता

ओढणी इतकी सावधान
बिलगून बसली होती छान
हात तिला दाटवती ,
"अगं किती बिलगशील, आहे का भान?"

कुठून येतोय हा मृदगंध?
जो, तो पहात होता
तिच्या ओढणीला बिलगुन
वारा नकळत वहात होता

हळुवार पाऊसही
तिला पाहताच धावला असेल
पावसाला पाहुन असा
वाराही कावला असेल

त्यात छत्री होती तकलादू
पाऊस पाहतो संधी साधू
ढगांत ध्यानस्त बसलेला
विरघळुन जातो ढोंगीसाधू

मी तर एक साधा माणुस
पण नभांनी तरी सावरायच?
मा़झ्याकडे जर असता पाऊस
तर कठीणच होतं आवरायच...

आता मेलो तरी चालेल
पण एकदा मला वर जायचय
तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

- सत्यजित